DNA मराठी

राजकीय

maharashtra government

Maharashtra Government: उमेदवारी अर्जाबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

Maharashtra Government: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी अर्जाबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम असेल असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. यासाठी निवडणूक अधिनियम, 1961 मध्ये सुधारणेचा अध्यादेश देखील काढण्यात येणार आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अधिनियम, 1961 च्या कलम 14 (2) मध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका वेळेत आणि कालबध्द रितीने व्हाव्यात या दृष्टीने हा निर्णय महत्वपूर्ण आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अधिनियमातील कलम 14 मध्ये, पोट-कलम (2) अंतर्गत उमेदवारी अर्ज (नामनिर्देशनपत्रे) स्वीकारणाऱ्या किंवा स्वीकारण्यास नकार देणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्याच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायालयासमोर अपील दाखल करता येत होते. मात्र विविध जिल्हा न्यायालयांमध्ये वेगवेगळ्या कालावधीसाठी अशी अनेक अपीले प्रलंबित राहत असल्याने निवडणुका कालबद्धरित्या घेणे शक्य होत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला. याबाबत राज्य निवडणूक आयोगाने शासनास या तरतुदी वगळण्याबाबतचा प्रस्ताव शासनास पाठविला आहे. त्या अनुषंगाने राज्य शासनास अशा निवडणुकांबाबत नियम करता येतील, तसेच उमेदवारी अर्ज (नामनिर्देशनपत्रे) स्वीकारणाऱ्या किंवा स्वीकारण्यास नकार देणाऱ्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा निर्णय अंतिम असेल, अशी कलमे यात समाविष्ट करण्यात आली आहे. याबाबत महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या (सुधारणा) अध्यादेश, 2025 काढण्यास बैठकीत मंजूरी देण्यात आली. तर दुसरीकडे गड-किल्ल्यांप्रमाणेच राज्य संरक्षित स्मारक परिसरातील अतिक्रमणे रोखण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार असल्याचा निर्णय ही घेण्यात आला आहे. राज्यातील गड-किल्ल्यांप्रमाणेच राज्य संरक्षित स्मारकांच्या ठिकाणांवरील अतिक्रमणे रोखण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयानुसार सांस्कृतिक कार्य विभागाच्या यापुर्वीच्या (दि. 20 जानेवारी 2025) शासन निर्णयातील गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणे काढण्याबाबतच्या तरतूदींची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. यामध्ये आता राज्य संरक्षित स्मारकांचाही समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सर्व गड-किल्ले तसेच राज्य संरक्षित स्मारकांवरील अतिक्रमणे काढून टाकण्यासाठी व भविष्यातील अतिक्रमणे रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती गठीत करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. समितीचे सांस्कृतिक कार्य मंत्री अध्यक्ष असतील. तर समितीमध्ये महसूल मंत्री, ग्रामविकास मंत्री, पर्यटन मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, वन मंत्री, बंदरे व विकास मंत्री तसेच संबंधित विभागांचे सचिव, प्रधान सचिव किंवा अपर मुख्य सचिव यांचा समावेश असणार आहे. राज्यस्तरीय समितीमध्ये चार निमंत्रित सदस्यांचा समावेश करण्यास तसेच प्रत्येक जिल्ह्यात गठीत करण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय समितीमध्ये चार अशासकीय सदस्यांचा समावेश करण्यासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. हे अशासकीय सदस्य गड-किल्ले व राज्य संरक्षित स्मारकांचे अभ्यासक असावेत किंवा संरक्षण व संवर्धनाच्या क्षेत्रात कार्यरत असलेली व्यक्ती अथवा स्वयंसेवी संस्था असावी, अशी अट ठेवण्यात आली आहे. जिल्ह्यातील गड-किल्ले व राज्य संरक्षित स्मारकांवरील अतिक्रमणे रोखणे व ती काढून टाकण्याची कारवाई संबंधित जिल्हाधिकारी यांना त्या-त्या जमिनीच्या मालकीच्या विभागाच्या समन्वयाने करावी लागणार आहे. तसेच यासाठीचा खर्च जिल्हा नियोजन व विकास निधीमधून करता येणार आहे.

Maharashtra Government: उमेदवारी अर्जाबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय Read More »

ram sutar

Eknath Shinde on Ram Sutar Death : ‘महाराष्ट्र भूषण’ राम सुतार यांच्या निधनाने ‘शिल्पकलेचा कोहिनूर’ काळाच्या पडद्याआड

Eknath Shinde on Ram Sutar Death : आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ शिल्पकार महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्या निधनाने शिल्पकलेच्या क्षेत्रातील एक महान पर्व आणि ‘शिल्पकलेचा कोहिनूर’ काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या. शिल्पकलेतील उत्तुंग व्यक्तिमत्व असलेल्या राम सुतार यांनी आपल्या कलेच्या जोरावर भारतीय संस्कृती आणि महापुरुषांचे विचार जगभर पोहोचवले. त्यांच्या प्रदीर्घ योगदानासाठी त्यांना केंद्र सरकारतर्फे ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. राम सुतार यांनी महाराष्ट्राच्या मातीतून आपल्या कलेला सुरुवात केली आणि जागतिक स्तरावर स्थान मिळवले. महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार त्यांना प्रदान करण्यासाठी काही महिन्यांपूर्वीच आम्ही त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी गेलो होतो. त्यावेळी झालेली त्यांची भेट शेवटची ठरली, असे उपमुख्यमंत्र्यांनी शोक संदेशात म्हटले आहे. नर्मदा तीरावरील सरदार वल्लभभाई पटेल यांचा ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’, संसदेतील महात्मा गांधींचा पुतळा अशा अनेक अजरामर कलाकृतींच्या माध्यमातून ते सदैव आपल्यात जिवंत राहतील. वयाच्या 101 व्या वर्षापर्यंत कलेची साधना करणाऱ्या सुतार यांनी नवीन पिढीतील हजारो कलाकारांना मार्गदर्शन केले. त्यांच्या जाण्याने शिल्पकलेचे विद्यापीठच हरपल्याची भावना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

Eknath Shinde on Ram Sutar Death : ‘महाराष्ट्र भूषण’ राम सुतार यांच्या निधनाने ‘शिल्पकलेचा कोहिनूर’ काळाच्या पडद्याआड Read More »

pradnya satav

Pradnya Satav : काँग्रेसला मोठा धक्का, आमदार प्रज्ञा सातवांचा भाजप प्रवेश ठरला

Pradnya Satav : राज्य निवडणूक आयोगाने मोठी घोषणा करत राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केले आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात 15 जानेवारी रोजी 29 महानगर पालिकांसाठी मतदान होणार आहे तर 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. निवडणुकांची घोषणा होताच प्रत्येक पक्ष कामाला लागलं असून जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. तर दुसरीकडे राज्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. विधान परिषदेच्या आमदार आणि दिवंगत माजी खासदार राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव काँग्रेसला रामराम करत पक्षाची साथ सोडणार आहे. आमदार प्रज्ञा सातव 18 डिसेंबर रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोराने सुरू आहे. आमदार प्रज्ञा सातव 2021 पासून काँग्रेसकडून विधानपरिषदेच्या आमदार आहे. पक्षात सुरू असणाऱ्या गटबाजीच्या राजकारणामुळे प्रज्ञा सातव पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याची माहिती त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे. तर दुसरीकडे हिंगोलीचे दिवंगत माजी खासदार राजीव सातव लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे विश्वासू सहकारीपैकी एक मानले जात होते. त्यामुळे काँग्रेसला मोठा हा मोठा धक्का मानला जात आहे.

Pradnya Satav : काँग्रेसला मोठा धक्का, आमदार प्रज्ञा सातवांचा भाजप प्रवेश ठरला Read More »

election

Maharashtra Election: 29 महापालिकेसाठी निवडणुका जाहीर; 15 मतदान अन् 16 जानेवारीला निकाल

Maharashtra Election : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी आज राज्य निवडणूक आयोगाने घोषणा केली आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे तर 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. मुंबईत राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली आहे. राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आजपासून आचारसाहित लागू करण्यात आली असून महानगर पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात 23 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अंतिम मुदत 30 डिसेंबर असून उमेदवारी अर्जांची छाननी 31 डिसेंबर रोजी होणार आहे. उमेदवारी माघारीसाठी अंतिम मुदत 2 जानेवारी 2026 असणार आहे. तर उमेदवारांना 3 जानेवारी रोजी चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. तर 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून राज्यातील 29 महापालिकांचे निकाल 16 जानेवारी रोजी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली. असा आहे निवडणूक कार्यक्रम उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात – 23 डिसेंबर 2025 उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अंतिम मुदत – 30 डिसेंबर 2025 उमेदवारी अर्जांची छाननी – 31 डिसेंबर 2025 उमेदवारी माघारीसाठी अंतिम मुदत – 2 जानेवारी 2026 उमेदवारांना चिन्ह वाटप – 3 जानेवारी 2026 मतदान – 15 जानेवारी 2026 मतमोजणी – 16 जानेवारी 2026

Maharashtra Election: 29 महापालिकेसाठी निवडणुका जाहीर; 15 मतदान अन् 16 जानेवारीला निकाल Read More »

maharashtra election comission

Maharashtra Election: 29 महापालिकेसाठी आज जाहीर होणार निवडणूक कार्यक्रम; निवडणूक आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद

Maharashtra Election : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी आज कार्यक्रम जाहीर होणार आहे. राज्य निवडणूक आयोग आज 4 वाजता पत्रकार परिषद घेत महापालिका निवडणुकांची घोषणा करणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे मुंबईत आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. तर दुसरीकडे आज दुपारी होणाऱ्या पत्रकार परिषदेनंतर राज्यात महानगर पालिकांसाठी आचारसाहित लागू होणार आहे. तसेच या पत्रकार परिषदेत नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीदरम्यान आरक्षणावरून झालेल्या घोटाळ्यावर देखील राज्य निवडणूक आयोग स्पष्टीकरण देऊ शकतो. राज्यात 2 डिसेंबर रोजी 264 नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती तर काही नगरपरिषदांमध्ये 50 टक्के आरक्षणाची मर्यादा पेक्षा जास्त गेल्याने राज्य निवडणूक आयोगाने 24 नगरपरिषदांसाठी निवडणूक प्रक्रिया 20 डिसेंबर रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. तसेच 21 डिसेंबर रोजी राज्यातील सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

Maharashtra Election: 29 महापालिकेसाठी आज जाहीर होणार निवडणूक कार्यक्रम; निवडणूक आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद Read More »

uddhav thackeray and eknath shinde

Eknath Shinde on Uddhav Thackeray: तिजोरीवर दरोडा टाकणारे ‘रेहमान डकैत’ कोण..? उपमुख्यमंत्री शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला

Eknath Shinde on Uddhav Thackeray: नागपूर येथे 8 डिसेंबरपासून सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानपरिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता जोरदार निशाणा साधला आहे. मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे ‘रेहमान डकैत’ कोण..? असं एकनाथ शिंदे म्हणाले. विधानपरिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही विकासकामांचा आणि कल्याणकारी योजनांचा धडाका सुरू ठेवला असून विरोधकांना मात्र बिनबुडाचे आरोप करण्यावाचून काहीही काम शिल्लक राहिलेले नाही असे सांगितले. काही जण अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ.. असे वागत आहेत..फक्त पर्यटनासाठी नागपुरात येतात, ते आले पण अधिवेशात एकही प्रश्न विचारला नाही, एकाही विषयावर सभागृहात बोलले नाहीत, त्यामुळे जनतेच्या प्रश्नासाठी ते किती जागरूक आहेत तेच यातून दिसून आले असल्याचे शिंदे यांनी सांगितले. लोकांचे प्रश्न सोडून फक्त विरोधी पक्षनेतेपद द्या यासाठीच त्यांचा प्रयत्न सुरू होता. मात्र विरोधी पक्षनेता होण्यासाठी निदान तेवढे उमेदवार निवडून यावे लागतात तुम्हाला जनतेनेच विरोधी पक्षनेतेपदापासून दूर ठेवले असल्याचे सांगितले. उपमुख्यमंत्रीपद रद्द करा अशी मागणी करत त्यांनी माध्यमांमध्ये आदळ आपट केली, मात्र स्वतः मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना आपल्या मंत्रीमंडळात उपमुख्यमंत्रीपद ठेवले होते याचा त्यांना सोयीस्कररित्या विसर पडला असे सांगितले. माझ्याविषयी असलेल्या मळमळ आणि जळजळ यातूनच हे आरोप होत असल्याचे आवर्जून नमूद केले. मुंबईकरांसाठी आम्ही ऐतिहासिक निर्णय घेतले, मुंबईतील ओसी नसलेल्या 20 हजार इमारतींना दिलासा दिला, मुंबईला पागडीमुक्त करण्याचा निर्णय घेतला, त्यातून 13 हजार इमारतीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला. नॅशनल पार्क मधील 25 हजार कर्मचाऱ्यांना 5 किमी परिसरात पर्यायी घरे देण्याची योजना आणली, मुंबईतील गिरण्यांच्या जागेवरील चाळींच्या पुनर्विकासासाठी नियमावलीमध्ये बदल केले, सिडकोचा घरांच्या किंमती कमी करून 10 टक्क्यांनी या किंमती कमी केल्या, 50 एकरापेक्षा मोठ्या भूखंडावर क्लस्टर पुनर्विकास योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पहिल्या टप्यात 17 प्रकल्पांची निवड केली आहे. सर्वसामान्य लोकांना दिलासा मिळावा असे अनेक निर्णय घेतले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या 40 लक्ष झोपडपट्टीवासीयांना घरे उपलब्ध करून देण्याचे स्वप्न आम्ही पूर्ण करत आहोत असे सांगितले. या निर्णयाद्वारे 23 जानेवारी रोजी सुरू होणाऱ्या बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त या योजना सुरू करून आम्ही त्यांच्या चरणी ही योजनापुष्पे वाहिली आहेत असे शिंदे यांनी स्पष्ट केले. मात्र एवढी वर्षे मुंबईत ज्यांची सत्ता होती त्यांनी नक्की काय केले..? मुंबई तोडणार तोडणार एवढेच तुणतुणे कायम वाजवले. मिठी असो वा कोविड कुठेही डाका टाकायचे सोडले नाही. तिजोरीला वेटोळे घालून प्रत्येक कामात घोटाळे करण्याचे काम केले. त्यामुळे मुंबईच्या तिजोरीवर डाका घालून स्वतःची तिजोरी भरणारा खरा रेहमान डकैत कोण आहे..? ते लोकांसमोर यायला हवे. अशा रेहमान डकैतना पाणी पाजणारी ‘धुरंधर’ महायुतीच असेल असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

Eknath Shinde on Uddhav Thackeray: तिजोरीवर दरोडा टाकणारे ‘रेहमान डकैत’ कोण..? उपमुख्यमंत्री शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला Read More »

devendra fadnavis

Maharashtra Government: महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक 2025 विधानसभेत मंजूर

Maharashtra Government: महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक 2025 गुरुवारी विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा अधिनियम 2025 दोन्ही सभागृहांनी एकमताने मंजूर केला होता. त्यानंतर तो राष्ट्रपतींच्या परवानगीकरिता केंद्र सरकारकडे पाठवला होता. आपण एक क्रांतिकारी अधिनयम तयार केला होता ज्यामध्ये लोकायुक्त कायद्याच्या अंतर्गत एक लोकायुक्त, एक अध्यक्ष आणि चार सदस्य अशी व्यवस्था आपण केली होती. पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांनाही लोकायुक्तांच्या अंतर्गत आणण्याचा निर्णय आपण घेतला होता. या कायद्याला राष्ट्रपतींची मान्यता मिळाली आहे. परंतू, त्यांनी यात दोन-तीन सुधारणा सुचवल्या आहेत. या कायद्याची नियुक्त तारीख निश्चित करण्याआधी लोकायुक्तांची नियुक्ती तारीख घोषीत करा, त्यानुसार लोकायुक्त निवडा आणि मग कायदा अस्तित्वात आणा, असे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आधी निवड प्रक्रिया होईल आणि त्यानंतर ती संस्था अस्तित्वात येईल. आपण कायदा केला तेव्हा केंद्रीय कायदे झाले नव्हते. त्यामुळे आपल्या कायद्यात जुन्या केंद्रीय कायद्यांचा उल्लेख आहे. त्यामुळे आता तीन कायद्याच्या नवीन स्वरुपात नावात बदल करतो आहोत. केंद्राने केलेल्या कायद्यातील एखाद्या प्राधिकरणावर राज्य सरकारने अधिकारी नेमला असल्यास तो लोकायुक्तांच्या अखत्यारित येईल आणि लोकायुक्त त्यांची चौकशी करू शकतील. असे तीन बदल करून हा कायदा अस्तित्वात आणण्यास राष्ट्रपतींनी मान्यता दिली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Maharashtra Government: महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक 2025 विधानसभेत मंजूर Read More »

shrirang barge on msrtc

Shrirang Barge on MSRTC : शासनाची मंजूरी मिळत नसल्याने एसटी मधील 500 चालक, वाहक वर्षानुवर्षे हंगामी वेतन श्रेणीवर; श्रीरंग बरगे आक्रमक

Shrirang Barge on MSRTC : राज्य परिवहन महामंडळात चालक तथा वाहक हे पद काही वर्षापूर्वी निर्माण करण्यात असून व या पदातील कर्मचाऱ्यांना चालकाच्या मंजुरीत समाविष्ट करण्यात आल्याने चालक पदात अतिरिक्त कर्मचारी झाले असल्याने चालक व वाहक या दोन्ही पदातील ५००० कर्मचाऱ्यांना त्याचा फटका बसला असून शासनाची मंजुरी नसल्याने अनेक चालक व वाहनांना वर्षानुवर्षे हंगामी वेतन श्रेणीत काम करावे लागत आहे.व त्यांची आर्थिक पिळवणूक होत असून या तीनही पदांना शासनाने एकत्रित मंजुरी देऊन वर्षानुवर्षे हंगामी वेतन श्रेणीवर काम करणाऱ्या या पदातील कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून केली आहे. या संदर्भातील एक निवेदन आज नागपूर येथील विधानभवनात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संघटनेच्या वतीने प्रत्यक्ष भेटून देण्यात आले असून चालक, चालक तथा वाहक व वाहक या तीनही पदातील कर्मचाऱ्यांची पदे वेगवेगळी न दाखवता या पदांचे एकत्रीकरण करण्यात यावे अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. नवीन पदांना मंजुरी देण्याचा अधिकार शासनाचा एसटी हा राज्य सरकारचा अंगीकृत उपक्रम असल्याने व राज्य शासनाच्या कुठल्याही उपक्रमांमध्ये नवीन पदांना मंजुरी देणे किंवा पद एकत्रीकरण करणे हा अधिकार शासनाचा असल्याने तांत्रिक अडचणी मुळे हा प्रश्न सुटला नसून या पदाना एकत्रित मंजुरी दिल्यास हा प्रश्न चुटकीसरशी सुटू शकेल असे ही बरगे यांचे म्हणणे आहे. एसटीच्या स्थापने पासून चालक व वाहक या पदासाठी वेगवेगळी भरती केली जात असून सन २०१६ मध्ये “वाहक” हे पद गोठविण्यात आले असून चालक तथा वाहक हे नवीन पद निर्माण करण्यात आले आहे. नवीन पद निर्माण करण्यात आल्या नंतर ते चालकाच्या मंजुरीत समाविष्ट करण्यात आल्याने त्याचा फटका ५००० चालक व वाहक कर्मचाऱ्यांना बसला आहे. चालकाच्या मंजुरीत चालक तथा वाहक समाविष्ट करण्यात आल्याने चालक पदात अतिरिक्त कर्मचारी झाले असून त्यामुळे चालक व वाहक या दोन्ही पदातील कर्मचाऱ्यांना त्याचा फटका बसला असून या दोन्ही पदांचे एकत्रीकरण करण्यात आल्यास हा प्रश्न सुटू शकेल असेही बरगे यांनी निवेदनात म्हटले आहे. बढती मिळण्यात अन्याय हंगामी वेतन श्रेणीतील कर्मचाऱ्यांचे नाव ज्येष्ठता सुचित सुद्धा खाली टाकले जाते , व नोकरी मध्ये तीन वर्षे पूर्ण झाल्यावरच बढती परीक्षेस पात्र ठरविण्यात येते. त्यामुळे त्यांच्यापेक्षा नवीन भरती झालेले कनिष्ठ कर्मचारी बढती परीक्षेस पात्र ठरतात.व हंगामी वेतन श्रेणीतील कर्मचाऱ्यांना बढती उशिरा मिळाल्याने सुद्धा त्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याचेही बरगे यांनी निवेदनात म्हटले आहे.

Shrirang Barge on MSRTC : शासनाची मंजूरी मिळत नसल्याने एसटी मधील 500 चालक, वाहक वर्षानुवर्षे हंगामी वेतन श्रेणीवर; श्रीरंग बरगे आक्रमक Read More »

sonia gandhi

Sonia Gandhi  : काँग्रेसच्या अडचणीत वाढ, नागरिकत्व प्रकरणात सोनिया गांधींना नोटीस

Sonia Gandhi : बिहार विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला एकामागे एक मोठे धक्के मिळत आहे. यातच आता काँग्रेसच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना दिल्लीच्या एका न्यायालयाने त्यांच्या वाढदिवसानिमित्त नोटीस बजावली आहे. भारतीय नागरिक होण्यापूर्वी मतदार यादीत नाव नोंदवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. मंगळवारी, दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि दिल्ली पोलिसांना त्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्यास नकार देण्याच्या मॅजिस्ट्रेट कोर्टाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर नोटीस बजावली. सोनिया गांधी यांनी भारतीय नागरिक होण्यापूर्वी तीन वर्षे मतदार यादीत नाव नोंदवल्याचा आरोप आहे. बार अँड बेचच्या वृत्तानुसार, विशेष न्यायाधीश विशाल गोगणे यांनी फौजदारी सुधारणा याचिकेवरील वरिष्ठ वकील पवन नारंग यांच्या सुरुवातीच्या युक्तिवाद ऐकल्यानंतर सोनिया गांधी आणि दिल्ली पोलिसांना नोटीस बजावून त्यांचे उत्तर मागितले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 6 जानेवारी 2026 रोजी होईल असे न्यायालयाने सांगितले. याचिकाकर्ता विकास त्रिपाठी यांनी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी वैभव चौरसिया यांच्या 11 सप्टेंबरच्या आदेशाला आव्हान देणारी ही फौजदारी सुधारणा याचिका दाखल केली आहे. त्रिपाठी यांचा दावा आहे की सोनिया गांधी यांचे नाव 1980 मध्ये नवी दिल्ली संसदीय मतदारसंघाच्या मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले होते, तर त्या एप्रिल 1983 मध्ये भारतीय नागरिक झाल्या. त्यांनी सांगितले की सोनिया गांधी यांचे नाव 1980 मध्ये मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले होते, 1982 मध्ये काढून टाकण्यात आले होते आणि नंतर 1983 मध्ये पुन्हा समाविष्ट करण्यात आले होते. न्यायाधीश वैभव चौरसिया यांनी याचिका फेटाळताना म्हटले की, याचिकाकर्त्याने मागणी केल्याप्रमाणे न्यायालय चौकशी सुरू करू शकत नाही. त्यांनी म्हटले की, एखाद्या व्यक्तीच्या नागरिकत्वाशी संबंधित बाबी केंद्र सरकारच्या अधिकारक्षेत्रात येतात. मतदार यादीतून एखाद्या व्यक्तीचा समावेश किंवा वगळण्याची पात्रता निश्चित करण्याचा अधिकार भारतीय निवडणूक आयोगाला आहे. न्यायाधीशांनी पुढे म्हटले की, या प्रकरणाची चौकशी करणे संवैधानिक अधिकाऱ्यांच्या अधिकारक्षेत्रात अनावश्यक हस्तक्षेप करेल. हे भारतीय संविधानाच्या कलम 329 चे देखील उल्लंघन करेल. याचिकाकर्ता विकास त्रिपाठी यांचे प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ वकील नारंग यांनी आज न्यायालयात सांगितले की, सोनिया गांधी यांचे नाव नागरिक होण्यापूर्वी नवी दिल्ली संसदीय मतदारसंघाच्या मतदार यादीत होते, त्यामुळे काही कागदपत्रे बनावट असू शकतात. त्यांनी सांगितले की, मतदार यादीत त्यांचे नाव समाविष्ट करण्यासाठी काही कागदपत्रे बनावट, बनावट किंवा खोटी असू शकतात. त्यांनी पुढे सांगितले की, त्रिपाठी यांनी या तथ्यांची चौकशी करण्यासाठी पोलिसांशी संपर्क साधला होता, परंतु त्यांनी एफआयआर दाखल केला नाही. वकील नारंग यांनी युक्तिवाद केला की, “मी आरोपपत्र दाखल करण्याचे सुचवत नाही, परंतु या पैलूची चौकशी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.”

Sonia Gandhi  : काँग्रेसच्या अडचणीत वाढ, नागरिकत्व प्रकरणात सोनिया गांधींना नोटीस Read More »

vijay wadettiwar

Vijay Wadettiwar: जागा घ्या अन् ओबीसी विद्यार्थ्यांसाठी 72 वसतिगृह बांधा; विजय वडेट्टीवरांची सभागृहात मोठी मागणी

Vijay Wadettiwar : राज्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह आणि अभ्यासिका उभारण्यात येत आहे. पण सध्या ही वसतिगृह भाड्याच्या इमारतीत आहे. त्याऐवजी सरकारने जमीन विकत घेऊन विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधावी अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी केली. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या काळात ओबीसी विद्यार्थ्यांचे वस्तीगृहाच्या प्रश्नावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले की या वसतिगृहात प्रवेश मिळण्याच्या अटी आणि नियम हे अडचणीचे आहे.त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळत नाही.त्यामुळे या अटी शिथिल कराव्या आणि सरसकट विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावा अशी मागणी वडेट्टीवर यांनी केली. तसेच राज्यात 72 वसतिगृह शासनाने बांधावी आणि त्यासाठी बजेट मध्ये तरतूद करावी अशी भूमिका मांडली. यावर उत्तर देतना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाड्याच्या इमारतीत वसतीगृह सुरू ठेवायची नसून ओबीसी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी जमीन संपादन करण्यात येत आहे. प्रत्येक जिल्ह्यात जागा ठरल्या की मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होऊन विभागाला जागा हस्तांतरीत करण्यात येईल,अस स्पष्ट केले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले पुणे, जालना, बुलढाणा, भंडारा, वर्धा, गडचिरोली आणि रत्नागिरी या जिल्ह्यात जागा घेण्यात आल्या आहेत. महसूल विभागाने जागा घेतल्या ते जिल्हे सोलापूर सांगली धुळे धाराशिव अमरावती अकोला यवतमाळ वाशिम चंद्रपूर गोंदिया हे आहेत. काही जिल्ह्यात जागा निश्चित झाली आहे तिथे जागा हस्तांतरण बाकी आहे,ते जिल्हे नागपूर ,कोल्हापूर , सातारा , नाशिक जळगाव, नंदुरबार लातूर, नांदेड हिंगोली, बीड परभणी सिंधुदुर्ग, पालघर, छत्रपती संभाजीनगर,अहिल्यानगर असे आहेत. राज्यातील फक्त चार जिल्ह्यात ओबीसी वसतिगृह साठी जागा मिळालेल्या नाही. रायगड, ठाणे, मुंबई आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यात जागा मिळवून देण्यासाठी सरकार विशेष प्रयत्न करेल असं ही मुख्यमंत्री म्हणाले.

Vijay Wadettiwar: जागा घ्या अन् ओबीसी विद्यार्थ्यांसाठी 72 वसतिगृह बांधा; विजय वडेट्टीवरांची सभागृहात मोठी मागणी Read More »