DNA मराठी

राजकीय

bmc election

BMC Election: आरक्षणाची चिठ्ठी ठरवणार मुंबईचा महापौर; नेमकं घडणार काय?

BMC Election: मुंबई महापौरपदाची निवड आता फक्त निवडणुकीनंतरची औपचारिक बाब राहिलेली नाही. आरक्षणाच्या सोडतीने सत्तेची दिशा बदलण्याची वेळ आली आहे. गुरुवारी मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात सकाळी ११ वाजता २९ महानगरपालिकांच्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत होणार असून, या एका प्रक्रियेवर मुंबईच्या सत्तासमीकरणाचा भविष्यातील आराखडा अवलंबून असल्याचे चित्र आहे. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सोडतीकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. याचे कारण स्पष्ट आहे. मुंबई महापौरपदाचे आरक्षण जर अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात गेले, तर सत्ताधारी भाजप–शिवसेना महायुतीकडे बहुमत असूनही महापौरपदासाठी योग्य उमेदवार उरणार नाही. याच वेळी, सत्तेबाहेर असलेले उद्धव ठाकरे यांच्या गटाला अनपेक्षित राजकीय संधी मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. एसटी आरक्षण आणि महायुतीची कोंडी महापालिकेतील विद्यमान संख्याबळ पाहता, भाजप–शिवसेना महायुतीकडे एसटी प्रवर्गातील एकही निवडून आलेला नगरसेवक नाही. याउलट, एसटीसाठी राखीव असलेल्या प्रभाग क्रमांक ५३ आणि १२१ मधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)चे जितेंद्र वळवी आणि प्रियदर्शनी ठाकरे विजयी झाले आहेत. त्यामुळे एसटी आरक्षण पडल्यास ठाकरे गटाचा महापौर बिनविरोध निवडून येण्याची शक्यता बळावते. हीच शक्यता सध्या सत्ताधाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. सत्तेचे अंकगणित हाताशी असतानाही महापौरपद विरोधकांकडे जाण्याची भीती महायुतीच्या अंतर्गत चर्चांना धार देत आहे. चक्राकार पद्धत: नियम की राजकीय कवच? सरकारकडून दिलासा देणारा मुद्दा म्हणजे महापौरपदाचे आरक्षण चक्राकार पद्धतीने काढले जाणार आहे. या प्रक्रियेनुसार, सुरुवातीला खुला प्रवर्ग निश्चित केला जाईल आणि त्यानंतर पुढील आरक्षणे ठरतील. त्यामुळे यंदा लगेचच एसटी आरक्षण येण्याची शक्यता कमी असल्याचा दावा महायुतीकडून केला जात आहे. मात्र, राजकीय जाणकार वेगळे चित्र मांडतात. त्यांच्या मते, “नियम जरी स्पष्ट असले, तरी सोडतीचा क्रम बदलला तर राजकीय समीकरणे एका क्षणात उलटू शकतात.” एससी–ओबीसी आरक्षणात फारसा संघर्ष नाही अनुसूचित जाती (एससी) किंवा इतर मागासवर्गीय (ओबीसी) आरक्षण पडल्यास मात्र सत्तासंघर्षाची तीव्रता कमी राहील. भाजप–शिवसेना महायुती, ठाकरे गट, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) — सर्वच आघाड्यांकडे या प्रवर्गांतील नगरसेवक उपलब्ध आहेत. त्यामुळे या दोन प्रवर्गांमध्ये महापौरपदाबाबत फारसा राजकीय पेच निर्माण होणार नाही. तथापि, एससी प्रवर्गातील प्रभावी नगरसेवकांची संख्या ठाकरे गटाकडे अधिक आहे, ही बाब त्यांच्या आत्मविश्वासात भर घालणारी ठरत आहे. संयमित भाषा, पण स्पष्ट संकेत अलीकडच्या काळात उद्धव ठाकरे यांच्या भाषणांत दिसणारी संयमित पण सूचक भाषा अनेक अर्थांनी घेतली जात आहे. “देवाच्या मनात असेल तर…” अशा वाक्यांमागे दडलेली राजकीय अपेक्षा आजच्या घडीला अधिक ठळकपणे जाणवते आहे. सत्तेपासून दूर असतानाही महापौरपदाची संधी चालून येणे, हे ठाकरे गटासाठी केवळ पदप्राप्ती नसून राजकीय पुनरुज्जीवनाचे संकेत मानले जात आहेत. एक सोडत, अनेक शक्यता गुरुवारची सोडत म्हणजे केवळ नावांची चिठ्ठी नाही, तर मुंबईच्या सत्तेचा कौल आहे. महायुतीला चक्राकार पद्धतीचा आधार आहे, तर ठाकरे गटाची आशा एसटी आरक्षणाच्या शक्यतेवर टिकून आहे. शेवटी प्रश्न तोच राहतो कि महापौरपदाचा निर्णय लोकशाही बहुमत ठरवणार की आरक्षणाची चिठ्ठी? उत्तर काही तासांत समोर येईल; पण या उत्तराचे पडसाद मुंबईच्या राजकारणात दीर्घकाळ घुमत राहणार, हे नक्की.

BMC Election: आरक्षणाची चिठ्ठी ठरवणार मुंबईचा महापौर; नेमकं घडणार काय? Read More »

jaykumar gore on praniti shinde

Jaykumar Gore on Praniti Shinde : प्रणिती शिंदेंवर जयकुमार गोरे यांची वादग्रस्त टीका; राजकीय वाद पेटणार?

Jaykumar Gore on Praniti Shinde : सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर भाजपमधील नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पंचतारांकित हॉटेल ‘बालाजी सरोवर’ येथे खासदार प्रणिती शिंदेंबाबत वादग्रस्त आणि आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. प्रणिती शिंदें यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी एक भावनिक पत्र लिहिले होते. त्या पत्राच्या शेवटी हिंदीतून “झुकना हमारी फितरत नहीं। दो कदम पीछे हटे हैं, पर सिर्फ अगली छलांग लगाने” असे म्हटले होते. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी, “दो कदम पीछे नहीं हटे… 50 कदम नीचे गिरे हैं, वो भी टांग ऊपर” अशा शेलक्या आणि आक्षेपार्ह शब्दांत प्रणिती शिंदेंवर टीका केली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीबाबत आत्मविश्वास व्यक्त करताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी “अब की बार सोलापूर जिल्हा परिषदेवर भाजप सरकार” असा नारा दिला. यानंतर त्यांनी खासदार प्रणिती शिंदेंच्या भावनिक पत्रावर वादग्रस्त टिप्पणी केली. “दो कदम पीछे नहीं हटे… 50 कदम नीचे गिरे हैं, वो भी टांग ऊपर” अशा वक्तव्यामुळे काँग्रेस पक्ष आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोलापूर महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असून विरोधी पक्ष म्हणून एमआयएम भूमिका बजावणार आहे.

Jaykumar Gore on Praniti Shinde : प्रणिती शिंदेंवर जयकुमार गोरे यांची वादग्रस्त टीका; राजकीय वाद पेटणार? Read More »

sanjay raut

Sanjay Raut on BMC Election : भाजपचा महापौर होऊ द्यायचा नाही, खासदार राऊत असं का म्हणाले?

Sanjay Raut on BMC Election: मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने 89 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला असून त्यामुळे आता मुंबई महापालिकेत भाजपचा पहिल्यांदा महापौर होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोराने सुरू आहे. तर दुसरीकडे भाजपाचा महापौर होऊ द्यायचा नाही हे सर्व गटांनी ठरवले असल्याची प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे कोणत्या पदासाठी आग्रही हा त्यांचा प्रश्न त्यांचा पक्ष भाजपचा अंगवस्त्र आहेत, अमित शहा त्यांचे प्रमुख, ते त्यांच्याकडे जाऊन मागणी करतील, मात्र फडणवीस ऐकणार नाही अशी माझी माहिती आहे. त्यांनी आपले नगरसेवक बंद ठेवलेत, त्यांनी आमदार फोडले, त्यांना नगरसेवक कोंडून ठेवावे लागतात, ते आमदार सुरतला घेऊन गेले होते. एकनाथ शिंदे स्वतः उपमुख्यमंत्री तरी त्यांना वाटत आपले नगरसेवक पळवले जातील अशी भीती ही किती मोठी हस्यजत्रा आहे. भाजपचा महापौर होऊ द्यायचा नाही हे सर्वांनी ठरवलं आहे बघू काय होईल. जे नगरसेवक आहेत त्यात बरेच नवे चेहरे, ते शिवसैनिक आहेत, त्यांना वाटत भाजपचा महापौर होऊ नये त्यांना कितीही कोंडला तरी खूप साधन आहे. दळणवळणाची साधन आहे, संदेश काही जाऊ शकते. देवाची इच्छा असेल तर शिवसेनेचा महत्व महापौर बसू शकतो. पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडत आहे, आम्ही तथास्थ होउन पाहतोय, राज ठाकरे उद्धव ठाकरे यांचा फोन झाला आहे असं खासदार संजय राऊत म्हणाले. तर दुसरीकडे यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील जोरदार टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले की, राज्य त्यांचे तरी नगरसेवकांना कोंडून ठेवले, स्वतःला भाई म्हणून घेणारे एकनाथ शिंदेंनी नगरसेवक कोंडून ठेवले. महापौर शिवसेनेचा असतो, डूब्लिकेट शिवसेनेचा नाही, ती अमित शाह यांची सेना आहे. बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीला महापौर शिवसेनेला पाहिजे, असायला हवा ते आम्ही पाहू, मात्र शिंदेंनी मुंबई भाजपला दिली. 29 नगरसेवक कोंडले तो मराठी अस्मितेचा कोंडमारा, एकनाथ शिंदे सोडले तर हे कोणालाच फरक पडणार नाही.

Sanjay Raut on BMC Election : भाजपचा महापौर होऊ द्यायचा नाही, खासदार राऊत असं का म्हणाले? Read More »

nana patole

Nana Patole : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका EVM ऐवजी बॅलेट पेपरवर घ्या; नाना पटोलेंची मागणी

Nana Patole: राज्यात नुकत्याच झालेल्या 29 महानगरपालिका निवडणुकांनी निवडणूक व्यवस्थेचा बुरखा पुर्णतः फाटलेला आहे. शहरातील अत्यल्प मतदानाची टक्केवारी ही केवळ मतदार उदासिन नसून निवडणूक प्रक्रियेवरचा जनतेचा विश्वास कमी होत असल्याचे निर्दशक आहे. देशातील अनेक राज्यांनी जनतेचा विश्वास टिकवण्यासाठी तसेच वाद टाळण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका EVM ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. मग महाराष्ट्रातच EVM चा हट्ट का? व कोणाच्या फायद्यासाठी? असे प्रश्न मतदार विचारात आहेत. या जनभावनेचा आदर करत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात, अशी मागणी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केली आहे. राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात नाना पटोले पुढे म्हणाले की, मतदार यादीतील घोळ, मतदान केंद्र शोधण्यासाठी मतदारांना दोन-तीन तास करावी लागणारी वणवण, हजारो मतदारांना मतदान न करताच परत जाण्याची येणारी वेळ, या साऱ्या बाबी निवडणूक आयोगाच्या अकार्यक्षमतेचे गंभीर निदर्शक आहेत, ही परिस्थिती लोकशाहीसाठी घातक आहे. अत्यंत गंभीर बाब म्हणजे पालिका निवडणुकीत VVPAT प्रणालीचा वापर करण्यात आला नाही, त्यामुळे आपल्या मतदानाची खात्री करण्याचा मतदाराचा अधिकारच हिरावून घेण्यात आला, त्यात भर म्हणजे मतदारांच्या बोटाला लावलेली शाई हात धुतल्यानंतर पुसली जात होती. या साऱ्या प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेतीला पारदर्शकता, विश्वासार्हता आणि आयोगाची निष्पक्षता यावर गंभीर प्रश्न चिन्ह उभे राहिले आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका लोकशाहीच्या कणा आहेत, या निवडणुकीबाबत जर संशय, अविश्वास आणि गैरव्यवस्थेचे वातावरण राहिले तर ते लोकशाहीच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करणारे आहे म्हणून जनभावनेचा विचार करून या निवडणुका EVM ऐवजी बॅलेट पेपरवर घ्याव्यात, असे नाना पटोले या पत्रात म्हणाले आहेत.

Nana Patole : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका EVM ऐवजी बॅलेट पेपरवर घ्या; नाना पटोलेंची मागणी Read More »

maharashtra government

Maharashtra Government: फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; पद्मावती देवी मंदिरासाठी दिलेल्या भुखंडासाठीचे शुल्क माफ

Maharashtra Government: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाच्या बैठकीत तिरूपती देवस्थानास पद्मावती देवी मंदिरासाठी दिलेल्या उलवे येथील भुखंडासाठीचे शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त) अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या १ हजार ९०१ पदांच्या आकृतीबंधास व संचालनालयाचे नाव अर्थ व सांख्यिकी आयुक्तालय करण्यास मान्यता. जिल्हा नियोजन समित्या, सहआयुक्त (नियोजन), विभागीय आयुक्त कार्यालय, मानव विकास कार्यक्रम, वैधानिक विकास मंडळ, तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रम, नक्षलवाद विशेष कृति आराखडा कक्ष यांच्या कार्यालयांसाठी आवश्यक, अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सुधारित आकृतीबंध. (नियोजन विभाग) अटल बिहारी वाजपेयी शिवडी- न्हावाशेवा अटल सेतूच्या पथकरात आणखी एक वर्षभर सवलत देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय. वाहनधारकांना दिलासा (नगर विकास विभाग) मुंबई नागरी परिवहन प्रकल्प टप्पा – २ (एमयुटीपी -२) साठी सुधारित खर्चास व शासन हिस्सा उचलण्यास मंजुरी. (नगर विकास विभाग) तिरूपती देवस्थानास पद्मावती देवी मंदिरासाठी दिलेल्या उलवे येथील भुखंडासाठीचे शुल्क माफ (नगर विकास विभाग) पीएम – ई ड्राईव्ह योजनेंतर्गत पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या एक हजार ई- बस सुविधेसाठी निधी वळता करण्याच्या थेट प्रणालीस मान्यता. पेमेंट सिक्युरिटी मेकॅनिझम अंतर्गत पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकांच्या खात्यातून डायरेक्ट डेबीट मॅन्डेंट (डीडीएम) द्वारे संबंधित कंपन्यांना खर्चाची रक्कम मिळणार ( नगर विकास विभाग) भाजीपाला निर्यातीकरिता शेतकऱ्यांसाठी ठाणे जिल्ह्यातील मौजे बापगांव (ता. भिंवडी ) येथे सर्वोपयोगी – मल्टी मॉडेल हब व टर्मिनल मार्केटची उभारणी. त्यासाठी राज्य कृषि पणन महामंडळाला ७ हेक्टर ९६.८० आर जमीन उपलब्ध करून देणार. व्हेपर हिट ट्रीटमेंट, प्लॅंट विकीरण, पॅक हाऊस सुविधा तसेच फळे- भाजीपाला साठवणुकीकरिता सुविधांची उभारणी (महसूल विभाग) यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा नदी प्रकल्पासाठी ४ हजार ७७५ कोटींची मान्यता. प्रकल्पामुळे पाच तालुकयातील ५२ हजार ४२३ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार. अमरावती जिल्ह्यातील मौजा धामकच्या पुनवर्सनाचा प्रश्न मार्गी (जलसंपदा विभाग) मुंबईतील पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना शासकीय निवासस्थाने उपलब्ध होणार. मुंबई पोलिस हाऊसिंग टाऊनशिप प्रकल्पास मंजुरी. मुंबई शहर व उपनगरातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी ४५ हजार शासकीय निवासस्थाने बांधली जाणार. ( गृह विभाग) राज्यातील युवकांना परदेशातील रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र व्यापक आंतरराष्ट्रीय गतीशिलता आणि क्षमता संस्था (महाराष्ट्र एजन्सी फॉर होलिस्टिक इंटरनॅशनल मोबिलीटी अँण्ड अँडव्हान्समेंटस् – महिमा) स्थापन करण्यास मंजुरी. प्रशिक्षित, कुशल युवकांना जगभरातील रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रभावी समन्वय व अमंलबजावणीसाठी संस्था काम करणार. (कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग) अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळास पनवेल (पश्चिम) येथील भूखंड देण्यास मान्यता. महामंडळाला मुख्यालयाची व बहुउद्देशीय इमारत उभी करता येणार. ( नगर विकास विभाग)

Maharashtra Government: फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; पद्मावती देवी मंदिरासाठी दिलेल्या भुखंडासाठीचे शुल्क माफ Read More »

Pune Election: पुण्यात भाजपने दिला अनेकांना धक्का.., 119 जागा जिंकत मारली बाजी

Pune Election: संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या पुणे महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून या निवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे. तर दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुणेकरांनी मोठा धक्का दिला आहे. भाजपने या निवडणुकीत तब्बल 119 जागा जिंकत स्वबळावर बहुमत मिळवला आहे. आमही या निवडणुकीत 120-125 जागा जिंकणार असा दावा पुण्यात भाजपकडून करण्यात येत होता. तर दुसरीकडे अजित पवार यांच्या पक्षाला अवघ्या 27 जागांवर समाधान मानावे लागले आहे. पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अजित पवार यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला होता मात्र त्याचा काहीच फायदा पक्षाला झाला नसल्याने आता स्पष्ट झाले आहे. तर दुसरीकडे पुण्यात युतीसाठी अनेक प्रयत्न करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पुण्यात खात देखील उघडता आलं नाही. तर शिवसेना ठाकरे गटाने एका जागेवर बाजी मारली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने देखील या निवडणुकीत अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करत 15 जागा जिंकल्या आहे. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करणारे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त 3 जागा मिळाले आहे. शरद पवार पक्षाची कामगिरी या निवडणुकीत खराब राहिल्याने येणाऱ्या दिवसात पुण्यातील राजकारणात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससमोर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे. कधीकाळी बालेकिल्ला असणाऱ्या पुण्यात शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे. एकूण जागा 165 भाजप- 119 शिवसेना -0 ऊबाठा-1 राष्ट्रवादी शरद पवार -3 राष्ट्रवादी अजित पवार – 27 काँग्रेस -15 एमआयएम-0 अपक्ष-0

Pune Election: पुण्यात भाजपने दिला अनेकांना धक्का.., 119 जागा जिंकत मारली बाजी Read More »

jalna election

Jalna Election: पहिल्याच निवडणुकीत जालना महापालिकेवर भाजपचा झेंडा; 41जागांवर मारली बाजी

Jalna Election : नव्याने झालेल्या जालना शहर महानगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि या महापालिकेवर तब्बल 41 जागा मिळवत भाजपने इतिहासात पहिल्यांदाच आपला झेंडा रोवला आहे. जालना शहर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष स्वबळावर लढले होते तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने मनसेची युती करत 55 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे सेना यांनी महाविकास आघाडी कायम ठेवत निवडणूक लढविली. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेससह उद्धव ठाकरे सेनेला या महापालिकेत आपले खातेही उघडता आलेले नाही तर मनसेची ही अवस्था यापेक्षा वेगळे राहिलेली नाही. या संपूर्ण जालना शहर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना तसेच काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये मुख्य लढती झाल्याचे दिसून आले. काही ठिकाणी चुरशीच्या लढती झाल्या त्यात भाजपाच्या उमेदवारांची सरशी झाली. जालना महापालिकेचा पहिला महापौर भाजपाचा होणार असल्याने जालन्यातील माजी आमदार कैलास गोरंट्याल, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री बबनराव लोणीकर, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष भास्करराव दानवे यांचे वजन पक्षश्रेष्ठींकडे आपसुकच वाढले आहे. या निवडणुकीत भाजपला 41 जागा, शिवसेनेला 12 काँग्रेसला 09, एमआयएमला 02 आणि अपक्ष 01 जागी निवडून आला आहे. या निवडणुकीत एकूण स्थिती पाहता भाजपने महापालिकेत एक हाती सत्ता मिळविल्याचे दिसून येत आहे.

Jalna Election: पहिल्याच निवडणुकीत जालना महापालिकेवर भाजपचा झेंडा; 41जागांवर मारली बाजी Read More »

fb img 1768476069352

Ahilyanagar Municipal Corporation Elections: अहिल्यानगर आनंद विद्यालय मतदान केंद्रावर बनावट ओळखपत्रांचा स्फोट

Ahilyanagar Municipal Corporation Elections: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर शहरात लोकशाहीवर थेट घाला घालणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रभाग क्रमांक ३ मधील आनंद विद्यालय मतदान केंद्रावर बनावट निवडणूक ओळखपत्रांच्या आधारे मतदान करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले, त्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. आता या प्रकाराची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. संबंधित संशयित इसमांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, या प्रकरणाची सखोल पोलीस चौकशी सुरू असल्याची माहिती प्रभाग क्रमांक ३ चे निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील यांनी दिली आहे. प्रभाग क्रमांक ३ मधील आनंद विद्यालय येथील केंद्रावर काही व्यक्तींकडे बनावट आधार कार्ड आणि मतदान ओळखपत्रे आढळल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी पाटील यांनी स्पष्ट केले की, संबंधित इसमांना तातडीने तोफखाना पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. सध्या पोलिसांमार्फत या प्रकरणाची कसून चौकशी सुरू आहे. या चौकशीत निष्पन्न होणाऱ्या तथ्यांच्या आधारे पुढील योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचेही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Ahilyanagar Municipal Corporation Elections: अहिल्यानगर आनंद विद्यालय मतदान केंद्रावर बनावट ओळखपत्रांचा स्फोट Read More »

maharashtra election comission

BMC Election: टपाली मतदान प्रक्रियेत गोंधळ; निवडणूक आयोगाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह

BMC Election: बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ अंतर्गत प्रभाग क्रमांक २०० ते २०६ साठी टपाली मतदानाची जबाबदारी निवडणूक आयोगावर होती. आयोगाने टपाली मतदानासाठी परेल भोईवाडा मराठी उ. प्रा. शाळा संकुल, परेल, मुंबई या ठिकाणी केंद्र ठरवले, तरी व्यवस्थापन अपूर्ण असल्याचे दिसून आले. मतदानाचा काळ १०, ११ व १२ जानेवारी ठरला होता, तरीही आयोगाने मतदारांसाठी स्पष्ट सूचना देण्यास दुर्लक्ष केले. टपाली मतपत्रिका संबंधित प्रभागाच्या मतदान पेटीत टाकणे अपेक्षित होते, पण आयोगाच्या देखरेखीअभावी काही लिफाफे चुकून अन्य प्रभागात पडले. या घाईगडबडीमुळे मतमोजणीच्या दिवशी गोंधळ होण्याची शक्यता निर्माण झाली, ज्यासाठी आयोगाने तपासणी करावी लागली. टपाली मतपत्रिकांच्या पेट्या स्ट्रॉंगरूममधून बाहेर काढून प्रभागनिहाय तपासणी करणे ही आयोगाच्या पूर्व नियोजनातील त्रुटी दर्शवते. आयोगाच्या अपूर्ण नियोजनामुळे उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना तातडीने उपस्थित राहण्याचे आवाहन करावे लागले, जे अनावश्यक गोंधळाचे कारण ठरले. मतमोजणी प्रक्रियेची पारदर्शकता आणि अचूकता सुनिश्चित करण्यासाठी आयोगाने अतिरिक्त उपाययोजना करावी लागली. आयोगाने घाईगडबडी व नियोजनाच्या कमतरतेमुळे तयार झालेल्या परिस्थितीचा योग्य तो आढावा घेणे आवश्यक होते. या त्रुटींमुळे निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न निर्माण झाले असून, आयोगाच्या नियोजन व देखरेखीवर टीका होत आहे.

BMC Election: टपाली मतदान प्रक्रियेत गोंधळ; निवडणूक आयोगाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह Read More »

maharashtra politics

Maharashtra Politics: राज्यात राजकीय भूकंप, शरद पवार अजित पवार एकत्र येणार? CM फडणवीसांनी दिले संकेत

Maharashtra Politics : उद्या होणाऱ्या 29 महापालिका निवडणुकीसाठी महायुती मधील घटक पक्षांनी स्वयबळावर निवडणूक लढवण्याचे निर्णय अनेक महापालिकेत घेतल्याने या निवडणुकीनंतर राज्यात महायुती तुटणार का? याबाबत अनेक चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे या निवडणुकीनंतर शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊ शकतात असे संकेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. एका मुलाखतीमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भविष्यात दोन्ही पवार गट एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही असं म्हटलं आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शरद पवार आणि अजित पवार फक्त दोन पक्ष म्हणून युती करून निवडणुका लढवत आहेत. ते अधिकृतपणे विलीन झालेले नाहीत. ही स्थानिक घडामोड आहे. दोन्ही पक्षांचे नेते त्यांच्या समर्थकांना एकजूट ठेवण्यासाठी एकत्र लढत आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाचा उल्लेख करत फडणवीस म्हणाले की कोणतीही शक्यता नाकारता येत नाही. त्यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर स्थापन झालेल्या महाविकास आघाडीचे उदाहरण दिले, जेव्हा शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार स्थापन केले. मुख्यमंत्री म्हणाले, 2019 चा अनुभव लक्षात घेता, मी कोणतीही राजकीय शक्यता नाकारत नाही. जर ते भविष्यात एकत्र आले तर आम्ही त्यावेळी त्याचा विचार करू. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील दोन्ही पवार गट अलिकडेच एकत्र आल्याने अंतर्गत समीकरणे बदलत असल्याचे संकेत मिळाले आहेत. जरी दोन्ही गट राज्य पातळीवर कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असले तरी, स्थानिक निवडणुकांमधील ही युती अनेक राजकीय प्रश्न उपस्थित करत आहे. फडणवीस यांनी संकेत दिले की ही युती मोठ्या राजकीय बदलाचे संकेत देणारी नसून स्थानिक पातळीवर पक्ष समर्थकांना एकत्र ठेवण्याची रणनीती असू शकते. महायुतीवर विश्वास निवडणूक प्रचारानंतर, मुख्यमंत्र्यांनी सांगितले की भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांचा समावेश असलेली सत्ताधारी महायुती मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नाशिक यासारख्या प्रमुख महानगरपालिका जिंकण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. त्यांनी मान्य केले की महाराष्ट्रात युतीचे राजकारण नेहमीच अप्रत्याशित राहिले आहे आणि भविष्यात, विशेषतः प्रमुख राज्य आणि राष्ट्रीय निवडणुका जवळ येत असताना, नवीन समीकरणे उदयास येऊ शकतात.

Maharashtra Politics: राज्यात राजकीय भूकंप, शरद पवार अजित पवार एकत्र येणार? CM फडणवीसांनी दिले संकेत Read More »