DNA मराठी

ताज्या बातम्या

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ माजी आमदाराने सोडली साथ, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Ajit Pawar: येत्या काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणार आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष आतापासूनच जोरदार तयारीला लागला आहे. तर दुसरीकडे या निवडणुकांपूर्वी उद्धव ठाकरे यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. हडपसरचे माजी आमदार महादेव बाबर यांनी पक्षाला रामराम करत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे पुण्यात उद्धव ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जात आहे. माजी आमदार महादेव बाबर यांनी आपल्या असंख्य पदाधिकाऱ्यांसह पक्षात प्रवेश केला आहे. याशिवाय पुणे, सांगली, हिंगोली, रत्नागिरी, नांदेड, हडपसर येथील विविध पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी जाहीर प्रवेश केला. महादेव बाबर यांनी पक्षात येण्याचा चांगला निर्णय घेतला आहे. त्यांनी माझ्यासोबत काम केले आहे. त्यांच्या येण्याने पक्षाची ताकद शहरात वाढली आहे असं या वेळी अजित पवार म्हणाले. तसेच लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. अधिवेशन संपल्यानंतर महाराष्ट्राचा दौरा करणार असून त्याअगोदर प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे दौरा करतील असे जाहीर करतानाच आपल्याला बेरजेचे राजकारण करायचे आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेबांनी आपल्याला ते शिकवले आहे. त्यामुळे आपल्याकडे असलेल्या वेगवेगळ्या खात्यातून जनसामान्यांची कामे आपण करत आहोत असे अजित पवार यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. पक्ष प्रवेश करणार्‍यांनी संघटना बळकट करण्यासाठी अधिकचे प्रयत्न करायचे आहे. याशिवाय सभासद नोंदणीही मोठया प्रमाणात करायची आहे. आपल्याला राष्ट्रवादीचा परिवार म्हणून काम करायचे आहे. राज्यातील प्रत्येक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमय करायचा आहे असेही अजित पवार म्हणाले. पक्षात घेताना कुणाचे वेडेवाकडे धंदे असू नये. त्यांची प्रतिष्ठा चांगली असली पाहिजे. महिला भगिनींचा अनादर होणार नाही याची काळजी घ्यावी. संबंधितांनी कुठेही उर्मटपणे वागता कामा नये असे बजावतानाच शून्यातून विश्व निर्माण करता येते. कुठल्याही गोष्टीचा किंवा कामाचा कमीपणा वाटून घेता कामा नये असा सल्लाही अजित पवार यांनी दिला.

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ माजी आमदाराने सोडली साथ, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश Read More »

Maharashtra News: एसटी महामंडळ तोट्यात; आर्थिक संकटावर श्वेतपत्रिका जाहीर

Maharashtra News: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) आपल्या आर्थिक संकटावर एक श्वेतपत्रक जाहीर केले असून, या श्वेतपत्रकात सध्याच्या आर्थिक स्थितीची स्पष्ट मांडणी करत संभाव्य उपाययोजनांची रूपरेषा दिली आहे. गेल्या ४५ आर्थिक वर्षांपैकी केवळ ८ वर्षांमध्येच महामंडळाने नफा मिळवला असून, उर्वरित वर्षांमध्ये सातत्याने तोटा झालेला असल्याचे श्वेतपत्रिकेतून समोर आला आहे. हे श्वेतपत्रक सर्वसामान्य नागरिक, शासन, कर्मचाऱ्यांसह इतर भागधारकांना MSRTC ची आर्थिक स्थिती पारदर्शकपणे समजावून देण्याच्या हेतूने प्रसिद्ध करण्यात आले आहे. यात आगामी धोरण निर्णय, खर्चकपात योजना, तसेच महसूल वाढ व प्रवासी सेवांमध्ये सुधारणा करण्याचे नियोजन नमूद करण्यात आले आहे. महामंडळाच्या शाश्वत प्रगतीसाठी श्वेतपत्रकात महसूल वाढवणे, खर्च कमी करणे व प्रवाशांच्या सुरक्षिततेसह सोयी-सुविधा वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. महसूल वाढीच्या उपाययोजना श्वेतपत्रकानुसार, महसूल वाढवण्यासाठी MSRTC दरवर्षी ५,००० नवीन बस आपल्या ताफ्यात समाविष्ट करणार आहे. यामध्ये उच्च दर्जाच्या व्होल्वो बस भाडे तत्त्वावर घेतल्या जाणार आहेत. महामंडळाच्या मालकीच्या जागांवर खाजगी वाहनांसाठी इंधन पंप उभारण्यात येणार असून, त्यासाठी इंधन पुरवठादारांशी महसूल वाटप करार केले जाणार आहेत. तसेच, महामंडळाच्या मालमत्ता BOT (Build-Operate-Transfer) किंवा PPP (Public-Private Partnership) मॉडेलवर विकसित केल्या जाणार आहेत. सी-कॅटेगरी मार्गांचे बी-कॅटेगरीत व बी-कॅटेगरीचे ए-कॅटेगरीत रूपांतर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. गैर-परिचालन उत्पन्नात वाढ, प्रवासी सुविधांचा दर्जा उंचावणे, आणि महसूल वाढीसाठी ठोस उद्दिष्टे निश्चित केली जाणार आहेत. खर्चकपात व कार्यक्षमतेसाठी उपाय खर्च कमी करण्यासाठी ५,००० LNG आणि १,००० CNG बस ताफ्यात समाविष्ट करण्याची योजना आहे. व्यवस्थापन कार्यक्षमतेसाठी ERP (Enterprise Resource Planning) प्रणाली लागू केली जाणार असून खर्चकपात संदर्भातील निकष निश्चित केले जाणार आहेत. प्रवासी सुरक्षितता आणि सुविधा वाढवण्याची योजना श्वेतपत्रकात प्रवासी सुरक्षितता आणि सुविधा वाढवण्यासाठी ५,३०० इलेक्ट्रिक बस सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. NCMC (National Common Mobility Card) योजना सवलतीच्या प्रवाशांसाठी लागू केली जाणार आहे. डिजिटल तिकिट प्रणालीद्वारे ETIM आणि ORS प्रणालीचा वापर वाढवण्यात येणार आहे. प्रवासी व मालमत्तांच्या सुरक्षेसाठी CCTV प्रणाली बसवली जाणार आहे. अपघात कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. सध्या सवलत नसलेल्या लांब पल्ल्याच्या प्रवाशांसाठी भाड्यात सवलत देण्याचा विचार आहे. तसेच कर्मचाऱ्यांसाठी welfare schemes राबवण्याची योजना देखील आहे. कार्यक्षमता आणि सेवा वाढ MSRTC ची स्थापना १ जून १९४८ रोजी पुणे-अहमदनगर या एका बसमार्गावरून सुरू झाली होती. सुरुवातीच्या दशकांत steady growth पाहायला मिळाली. १९८१-८२ साली बसांची सरासरी संख्या १०,०२८ होती, जी २०११-१२ साली १८,२७५ झाली. मात्र २०२४-२५ पर्यंत ती घसरून १५,७६४ झाली आहे. कर्मचारी संख्या १९८१-८२ मध्ये ७९,४५८ होती, जी १९९१-९२ मध्ये १,१२,२०० इतकी झाली; मात्र अलीकडे ८६,३१७ इतकीच राहिली आहे. वार्षिक किलोमीटर ७९.९४ कोटीहून २०११-१२ मध्ये १९८.३८ कोटी झाली, मात्र २०२४-२५ मध्ये ती १८५.८० कोटी झाली. प्रवासी संख्येतही अशाच प्रकारे घसरण झाली आहे. बसस्थानकांची संख्या १९८१-८२ मध्ये ३९६ होती, जी आता २०२४-२५ मध्ये ५९८ झाली आहे. आर्थिक अडचणींची प्रमुख कारणे महामंडळाच्या आर्थिक अडचणींमागे प्रमुख कारण म्हणजे ताफ्यातील बसांची कमतरता आणि जुन्या बसमुळे होणारे वारंवार ब्रेकडाउन. तसेच अनेक तोट्यातील मार्गांवर सामाजिक बांधिलकीतून सेवा सुरू ठेवावी लागत आहे. भाड्याच्या संरचनेत वेळोवेळी योग्य ते बदल न झाल्यामुळे महसुलात वाढ झाली नाही. अवैध वाहतूक व्यवस्थेमुळे प्रवासी संख्या घटली आहे. एकूण तोटा आणि थकबाकी २०२३-२४ मध्ये MSRTC चा एकूण संचित तोटा १०,३२२.३२ कोटी इतका होता. त्याच वर्षी कर्मचारी वेतन ४,८६४.३४ कोटी, इंधन खर्च ३,६५६.७६ कोटी इतका होता. २०१८-१९ मध्ये वेतन ₹३,७८७.९२ कोटी व इंधन ३,०१३.६७ कोटी होता. दैनंदिन वाहन उपयोग दर ३४७.४४ किमी असून राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे. इंधन कार्यक्षमता ४.४५ किमी प्रति लिटर आहे, जी सर्वात कमी आहे. मात्र उत्पन्न प्रति किमी ५५.०३ आहे, जे इतर राज्यांपेक्षा अधिक आहे. मार्च २०२५ पर्यंत ३,५०० कोटींपेक्षा अधिक थकबाकी आहे. यामध्ये PF थकबाकी १,२६२.७२ कोटी, ग्रॅच्युइटी ट्रस्ट १,११४.८९ कोटी, इंधन-सप्लायर बिल २१७.१९ कोटी, आणि प्रवासी कर थकबाकी ८२१.१३ कोटी समाविष्ट आहे. शासनाकडून मिळालेली मदत २००१ ते २०२४ दरम्यान शासनाकडून ६,३५३.८० कोटीची भांडवली मदत मिळाली. कोविड काळात आणि संपाच्या पार्श्वभूमीवर ४,७०८.७३ कोटी अनुदान दिले गेले. गेल्या चार वर्षांत ९,९२२.७८ कोटींचे अनुदान मिळाले आहे.

Maharashtra News: एसटी महामंडळ तोट्यात; आर्थिक संकटावर श्वेतपत्रिका जाहीर Read More »

त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय, मुख्यमंत्री फडणवीसांनी भूमिका स्पष्ट

Hindi Language Controversy: त्रिभाषा सूत्रासंदर्भात साहित्यिक, भाषा तज्ञ, राजकीय नेते आणि इतरही सर्व संबंधितांशी चर्चा करुनच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्रिभाषा सूत्रासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी 23 जूनच्या रात्री एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर आणि शिक्षण विभागातील अधिकारी यावेळी उपस्थित होते. या विषयावर सांगोपांग चर्चा झाल्यानंतर सर्व राज्यांची स्थिती सर्वांसमोर मांडावी, नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत मराठी मुलांचे अ‍ॅकडेमिक बँक ऑफ क्रेडिटच्या अनुषंगाने नुकसान होऊ नये, यासह इतरही पर्यायांवर सर्वांसाठी समग्र सादरीकरण करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. मराठी भाषेचे अभ्यासक, साहित्यिक, राजकीय नेते यासह सर्व संबंधितांसमोर याचे सादरीकरण आणि सल्लामसलतीची प्रक्रिया राबविण्यात यावी, असे या बैठकीत ठरले. ही सल्लामसलतीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असेही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे हे आता पुढची सल्लामसलतीची प्रक्रिया प्रारंभ करणार आहेत. या बैठकीला मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंग देओल, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार हे उपस्थित होते.

त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय, मुख्यमंत्री फडणवीसांनी भूमिका स्पष्ट Read More »

ठाकरे गटाला धक्का, दोन माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

Uddhav Thackeray: शिवसेना उबाठा गटाचे माजी नगरसेवक ईश्वर तायडे आणि माजी नगरसेविका आकांक्षा शेठ्ये यांनी आपल्या १०० हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. मुंबई भाजपा अध्यक्ष मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी त्यांना प्रवेश देऊन पक्षात स्वागत केले. यावेळी आमदार प्रविण दरेकर, मुंबई भाजपा उपाध्यक्ष कमलाकर दळवी उपस्थितीत होते. यावेळी मंत्री शेलार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदर्शी नेतृत्वाने प्रेरित होऊन तसेच भारतीय जनता पक्षाच्या ध्येयधोरणांशी एकरूप होऊन काम करण्याची इच्छा व्यक्त करत शिवसेना उबाठा गटाचे माजी नगरसेवक ईश्वर तायडे आणि माजी नगरसेविका आकांक्षा शेठ्ये यांनी आपल्या १०० हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. याचा अर्थ त्यांनी उबाठाचे नेतृत्व नाकारले आहे. हा या नाटकाचा पहिला अंक आहे लवकरच दुसरा आणि तिसरा व शेवटचा अंक तुम्हाला पहायला मिळेल. उबाठाची अवस्था धोकादायक आणि जिर्ण झाली आहे. त्यांनी मुंबई, मुंबईकर, हिंदुत्व, हिंदु सण उत्सव यांच्या विरोधात भूमिका घेतली त्यामुळे ते धोकादायक स्थितीत आहेत, तर त्यांना सोडून ज्या पद्धतीने पक्षाचे पदाधिकारी, आमदार, खासदार जात आहेत त्यावर तो पक्ष जिर्ण अवस्थेत आहे. 2017 च्या निवडणूकीत त्यावेळच्या शिवसेनेपेक्षा भाजपाला फक्त दोन जागा कमी होत्या आता भाजपामध्ये चार माजी नगरसेवकांंनी प्रवेश केल्यानंतर भाजपा नंबर 1 चा पक्ष झालाच शिवाय मुळ शिवसेनेतील 50 हून अधिक नगरसेवक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले त्यामुळे उबाठा सेना हा पक्ष अत्यंत जिर्ण अवस्थेत आहे, अशी टीका शेलार यांनी केली. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने मुंबईला 5 लाख कोटींचा निधी दिला आम्ही मुंबईकरांची सेवा करीत असून देव, देश आणि धर्मासाठी आमची लढाई सुरु आहे, असेही ते म्हणाले.

ठाकरे गटाला धक्का, दोन माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश Read More »

Maharashtra News: पुस्तकं नाही वाचणारे युद्धं पेटवतात

Maharashtra News: “घरात असलेल्या गीता आणि कुराण यांच्यात कधी लढाई होत नाही; जे लोक त्यांच्यासाठी लढतात ते कधीच ती पुस्तकं वाचलेली नसतात.” ही वाक्यं केवळ एक उपहासात्मक निरीक्षण नाही, तर आजच्या सामाजिक वास्तवावर बोट ठेवणारा आरसा आहे. भारताच्या मातीत गीता, कुराण, बायबल, गुरु ग्रंथसाहिब या सर्व धर्मग्रंथांचा सन्मान करणारी परंपरा आहे. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या विविध श्रद्धा, संस्कृती आणि विचारांची ही भव्य गंगा एकत्र वाहत आलेली आहे. पण दुर्दैवाने आज याच ग्रंथांच्या नावाने भिंती उभारल्या जात आहेत. रस्त्यावर रण मांडणारे, सोशल मीडियावर द्वेषाची भाषा करणारे, “धर्मरक्षक” असल्याचा दावा करणारे कितीजण खरेच हे ग्रंथ उघडून वाचतात? गीता सांगते “अहिंसा परमो धर्म:” आणि “कर्मण्येवाधिकारस्ते”; तर कुराण म्हणते “La ikraha fid deen”, म्हणजे धर्मात जबरदस्ती नाही. या पवित्र ग्रंथांनी माणसाला माणूस म्हणून पाहण्याचा संदेश दिला आहे, त्याग, क्षमा, सहिष्णुता आणि न्याय यांचा मार्ग दाखवला आहे. पण जो माणूस पुस्तकाच्या मुखपृष्ठात अडकून राहतो, तो त्या मूळ संदेशापर्यंत कधी पोचतच नाही. राजकारण, सत्तालालसा आणि समाजात वर्चस्व निर्माण करण्याच्या हेतूने हे ग्रंथ हत्यारासारखे वापरण्याचा प्रकार वाढला आहे. यात बळी जातो तो सामान्य नागरिकांचा  जो धार्मिकतेपेक्षा माणुसकीला महत्त्व देतो, पण अशा विभाजनाच्या जाळ्यात अडकतो. मूळ समस्या ही धार्मिक ग्रंथ नव्हे, तर त्यांचं गैरवाचन (किंवा अजिबात न वाचन) आहे. शिक्षणाची उणीव, विवेकाचा अभाव आणि सत्तेच्या खेळींमुळे समाजात कृत्रिम तणाव निर्माण केला जातो. मग प्रश्न येतो  आपण खरोखरच आपल्या श्रद्धेला समजून घेतोय का? समाज म्हणून आपली जबाबदारी आहे की आपण धार्मिकतेच्या नावे उभ्या राहणाऱ्या भिंती पाडायला हव्यात वाचून, समजून, आणि विचार करून. फक्त गीता किंवा कुराण हातात घेऊन फोटो काढणं सोपं आहे, पण त्यातील तत्वज्ञान अंगीकारणं आणि आचरणात आणणं हेच खरं आव्हान आहे. आज गरज आहे ती वादाच्या नाही, संवादाच्या. आणि तो संवाद सुरू होईल जेव्हा आपण ग्रंथांना हत्यार न समजता, विचारांची शिदोरी मानू. कारण शेवटी गीता आणि कुराण कधीही भांडत नाहीत माणूसच ते वाचायचं टाळतो आणि मग संघर्ष सुरू होतो.

Maharashtra News: पुस्तकं नाही वाचणारे युद्धं पेटवतात Read More »

अतिक्रमणाची दाखल न घेतल्याने शिवसेना ठाकरे गटाचे विशाल वालकर यांचे उपोषण सुरू

Ahilyanagar News : शहरातील माणिक चौक या ठिकाणी असलेले पक्के अतिक्रमण महानगरपालिकेच्या प्रशासनाला निवेदन देऊन सुद्धा त्याची दखल न घेतल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे व्यापारी शहर प्रमुख विशाल वालकर यांनी आज महानगरपालिकेच्या समोर प्रशासनाच्या विरोधामध्ये उपोषण सुरू केले. महानगरपालिकेच्या प्रशासनाने अनेक ठिकाणी अतिक्रमण झालेली असताना देखील सुद्धा कारवाई केली नाही उलट अनेक ठिकाणी मोजक्या कारवाई करून वेळ मारून देण्याचा प्रकार घडलेला आहे असेच उदाहरण शहरातील माणिक चौक भागांमध्ये पाहायला मिळालेले आहे. महानगरपालिकेच्या माध्यमातून ठिक ठिकाणी रस्त्याची, ड्रेनेजची कामे चालू आहेत. त्यापैकी एकमुखी दत्त मंदीर चौक, सोपानराव वडेवाला समोर, माणिक चौक येथे आशा टॉकीज चौक ते कापड बाजार येथे चालु असलेल्या ड्रेनेज लाईन व काँक्रीटीकरणचे कामाच्या रस्त्यात अडथळा निर्माण करणारे ओटे, पत्रा शेड इ. अतिक्रमण हटवुन काम पुर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे. सदर मालमत्ता सि.स.नं. ३६१८/२ या ठिकाणी सन २०१९ पासून अशोक छल्लानी व भागीदार यांनी या मालमत्तेमध्य बेकायदेशीर महानगरपालिकेच्या नगररचना विभागाची कुठलीही परवानगी न घेता विनापरवाना बांधकाम करुन गाळे बांधून महानगरपालिकेच्या जागेमध्ये १० फुटाचा ओटा, पत्र्याची शेड बांधून मोठे अतिक्रमण केले आहे. तसेच अशोक छल्लानी व इतर भागीदार यांनी त्या बेकायदेशीर बांधकाम केलेल्या गाळ्यांमध्ये भाडेकरी टाकले असुन सदर जागेवर डी.एस.पी. फुटवेअर व फुटी फुटवेअर व इतर दुकाने या दोन दुकानदारांनी दुकानासमोर महापालिकेच्या जागेमध्ये वीजेचा खांब पत्रा शेडच्या आत घेऊन रस्त्यावर १० फुट X २० फुट ओटा व पत्राशेड बांधुन मोठे अतिक्रमण केले आहे. तरीपण संबंधीत मालमत्ताधारक हा महानगरपालिकेला न जुमानता वारंवार अतिक्रमण केलेले आहे. सदर अतिक्रमणाबाबत वालकर यांनी मनपास दिनांक ३० मे २०२५ रोजी आयुक्त रितसर तक्रार अर्ज दाखल केला होता. त्या तक्रार अर्जाकडे महापालिका, अतिक्रमण विभाग व प्रभाग समिती नं. २ या विभागांना संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना समक्ष भेटून तक्रारीचे निरसन करण्याची विनंती केली होती. परंतु सदर सर्व विभागांनी याकडे दुर्लक्ष केलेले होते.त्यामुळे दि.१३ रोजी उपोषणाला बसण्याचे आवाहन केले होते, त्या संदर्भात महानगरपालिका प्रशासनाने मला दिनांक ०9 रोजी पत्र देऊन अश्वासन दिले की, नगर रचना विभागामार्फत माकींग करुन अहवाल सादर झाला की, उचित कारवाई करण्यात येईल असे पत्र देवून संबोधले होते, या करीता मी उपोषण स्थगित केले होते. प्रभाग समिती क्र. २ ने नगर रचना विभागाला रितसर अभिप्राय मिळावा या करीता मागणी केली होती, त्या मागणीचा रोड मार्कीग करुन अतिक्रमण केलेला अभिप्राय त्यांना दि. ९ रोजी प्राप्त झालेला आहे. तरी देखील आज पर्यंत महानगरपालिकेने कुठल्याही प्रकारची कायदेशीर कार्यवाही अद्याप केलेली नाही व रोडचे काम पुर्णत्वाकडे जात आहे. दरम्यान, वालकर यांनी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर आज सकाळी महानगरपालिकेने त्या ठिकाणी जाऊन फक्त पत्राची शेड बाजूला केली मात्र पक्के बांधकाम तसेच ठेवले आहे. त्यामुळे आज पासून माणिक चौक येथील अतिक्रमण कारवाईच्या संदर्भात प्रशासनाने दिरंगाई केल्यामुळे वालकर यांनी उपोषण सुरू केले आहे.

अतिक्रमणाची दाखल न घेतल्याने शिवसेना ठाकरे गटाचे विशाल वालकर यांचे उपोषण सुरू Read More »

भारीच…, दुचाकींमध्ये येणार ABS सिस्टिम; आता घसरून पडणं विसरा

ABS System: जानेवारी 2026 पासून देशात उत्पादित होणाऱ्या सर्व दुचाकी वाहनांमध्ये अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम म्हणजेच ABS सिस्टिम अनिवार्य करण्याच्या निर्णयाला मंजुरी मिळाली आहे. याच बरोबर नवीन दुचाकीसोबत दोन हेल्मेटही अनिवार्य करण्यात आले आहेत. ही ABS सिस्टिम नेमकी काय? याबद्दल जाणून घेऊया.. का घेण्यात आला निर्णय? जानेवारी 2026 पासून, देशात उत्पादित होणाऱ्या सर्व दुचाकींमध्ये ABS अनिवार्य असेलरस्ते अपघात, त्यातून होणारे मृत्युला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सध्या एबीएस 125 सीसी इंजिन क्षमता असलेल्या दुचाकींसाठीच सक्तीचे करण्यात आले आहे. सध्या देशातील अंदाजे 40 टक्के दुचाकींना एबीएस सुरक्षा प्रणाली नाही पण, आता सर्वच प्रकारच्या इंजिन असलेल्या दुचाकींसाठी हे सक्तीचे करण्यात आलयं. एबीएस काय आहे? अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम एक सेफ्टी फीचर असून जे वाहनाच्या ब्रेक सिस्टममध्ये वापरले जाते. ABS बाईक किंवा कोणत्याही वाहनाला ब्रेक लावताना टायर लॉक होण्यापासून रोखते. घसरण्याचा धोका होतो कमी अचानक ब्रेक लावल्यानंतर वाहनांचे संतुलन बिघडते त्यामुळे वाहनावर नियंत्रण राहत नाही. हे टाळण्यासाठी आणि वाहन घसरून अपघात होऊ नये यासाठी एबीएस फायदेशीर ठरते. एबीएसमुळे ब्रेक लावल्यानंतरही चाकं लॉक न होता फिरत राहतात. तसेच रस्ता ओलसर किंवा घसरट असतानाही वाहनावर नियंत्रण ठेवता येते. त्यामुळे वाहन अपघाग्रस्त होण्यापासून टाळते ABS कसे काम करते? ABS मध्ये काही विशिष्ट सेन्सर्स आणि इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट्स असतात जे टायर्सच्या वेगाचे सतत निरीक्षण करते. ब्रेक लावताच, सेन्सर्स टायरच्या वेगाचे निरीक्षण करते. जर, टायर अचानक लॉक होऊ लागला तर, ABS काही काळासाठी त्या टायरवरील ब्रेक प्रेशर कमी करते आणि बाईक संतुलित होताच, ही प्रणाली लगेच पुन्हा ब्रेक लावते. ABS चे किती प्रकार आहेत? सिंगल चॅनेल एबीएस: फक्त पुढच्या चाकावर काम करते ड्युअल चॅनेल एबीएस : पुढच्या आणि मागच्या दोन्ही चाकांवर काम करते आणि हे अधिक सुरक्षित मानले जाते.

भारीच…, दुचाकींमध्ये येणार ABS सिस्टिम; आता घसरून पडणं विसरा Read More »

निवडणूक आयोगाने 48 तासात नियम 93 बदलला; नाना पटोलेंचा गंभीर आरोप

Nana Patole : काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतांची चोरी करून भाजपा युती सरकार सत्तेत आले आहे. असं त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे. तसेच निवडणूक प्रक्रियेत गडबड करून महाराष्ट्रातील निवडणुकीत घोटाळा केला, त्याची चौकशी करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली असता आयोग समाधानकारक उत्तर देत नाही. हरियाणा निवडणुकीतही असाच घोटाळा करण्यात आला असेही ते म्हणाले. चंदीगड उच्च न्यायालयाने मतदानासंदर्भातील सर्व माहिती व दस्तावेज देण्याचा आदेश आयोगाला दिला होता पण  आपली चोरी पकडली जाणार या भितीने आयोगाने मोदी सरकारच्या मदतीने अत्यंत घाईने अवघ्या ४८ तासात नियम ९३ बदलल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी केला आहे. नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, संध्याकाळी ५८ टक्के असलेले मतदान दुसऱ्या दिवशी ६५ टक्क्यांच्या वर वाढवण्यात आले. ही वाढ ८ टक्क्यांची असून ते जवळपास ७६ लाख मतदान आहे. हे ७६ लाख मतदान कसे वाढले, यावर निवडणूक आयोग सविस्तर खुलासा करत नाही. संध्याकाळी ५ नंतरच्या मतदानाचे सीसीटीव्ही फूटेज देण्याची मागणी केली पण माहिती देता येणार नाही असा नियमच करून टाकला. उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या आठवडाभराच्या आतच १७ डिसेंबर २०२४ ला निवडणूक आयोगाने केंद्रीय कायदा मंत्रालयाला पत्र लिहून लोकप्रतिनिधी कायद्याच्या नियम ९३ मध्ये बदल करण्याची विनंती केली. नियम ९३ नुसार मतदानानंतरचे दस्तऐवज आणि माहिती मागवता येते. पण ही माहिती जनतेपर्यंत पोहोचू नये यासाठी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाने अत्यंत वेगाने हालचाली केल्या. १९ डिसेंबर रोजी आयोगाने कायदा मंत्रालयाला पत्र पाठविले होते त्याचा दुसऱ्याच दिवशी म्हणजे २० डिसेंबरला निवडणूक आयोग व कायदा मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक होऊन त्याच रात्री १०:२३ वाजता नवीन नियम अधिसूचितही करण्यात आला. मतदान प्रक्रियेत काही घोटाळा केलेला नाही तर नियम बदलण्याची घाई कशासाठी केली. यावरून दाल में कुछ काला है हे स्पष्ट दिसते. भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र व हरियाणाप्रमाणेच इतर राज्यातही मतांवर दरोडा टाकला आहे. काँग्रेस पक्ष ही लढाई सुरुच ठेवली असून सर्वोच्च न्यायलयात दाद मागणार आहोत असेही नाना पटोले म्हणाले.

निवडणूक आयोगाने 48 तासात नियम 93 बदलला; नाना पटोलेंचा गंभीर आरोप Read More »

युद्ध भडकले, इराणने इस्रायलवर डागली क्लस्टर क्षेपणास्त्रे

Iran-Israel Conflict: इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असणाऱ्या तणावामुळे संपूर्ण जगात एक दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक शेअर बाजार कोसळत आहे. तर दुसरीकडे आज इराणने इस्रायलवर मोठा हवाई हल्ला केला आहे. इराणने पहिल्यांदाच क्लस्टर बॉम्बचा वापर केला. हा हल्ला दक्षिण इस्रायलमधील एका रुग्णालयाला टार्गेट करून करण्यात आला, ज्यामध्ये अनेक लोक जखमी झाले आहेत. यापूर्वी, इस्रायलने इराणच्या अणुसुत्रांवर हवाई हल्ले केले होते. प्रत्युत्तरादाखल, तेहरानने क्लस्टर युद्धसामग्रीने सुसज्ज क्षेपणास्त्रे डागली. हा हल्ला आतापर्यंतच्या संघर्षातील सर्वात मोठा चिथावणी मानला जातो. युद्धबंदी किंवा राजनैतिक तोडगा निघण्याची शक्यता दिसत नाही. इस्रायलने इराणच्या अणुस्थळांवर हल्ला केला इस्रायली संरक्षण दलाने (IDF) शुक्रवारी इराणच्या अनेक लष्करी आणि अणुतळ तळांना टार्गेट केले. त्यापैकी, इराणच्या अणुकार्यक्रमाशी संबंधित असलेल्या स्थळांना विशेषतः लक्ष्य केले. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी दावा केला की “आम्ही आमच्या लष्करी योजनेत वेळापत्रकापेक्षा पुढे गेलो आहोत आणि इराणच्या सर्व अणुस्थळांना, अगदी फोर्डोसारख्या मजबूत ठिकाणांना देखील टार्गेट करू शकतो.” इराणने क्लस्टर बॉम्बने प्रत्युत्तर दिले इस्रायलच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, इराणने शुक्रवारी क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा वर्षाव केला. यामध्ये पहिल्यांदाच क्लस्टर बॉम्बचा वापर करण्यात आला, ज्यामुळे इस्रायली रुग्णालयाचे गंभीर नुकसान झाले. या हल्ल्यात 74 लोक जखमी झाले, त्यापैकी बहुतेकांना किरकोळ दुखापत झाली किंवा त्यांना पॅनिक अटॅकमुळे उपचारांची आवश्यकता होती. इराणला नेतान्याहू यांचा इशारा पंतप्रधान नेतान्याहू यांनी कडक शब्दात इशारा दिला की, “इराणच्या नेतृत्वाला या हल्ल्याची संपूर्ण किंमत मोजावी लागेल.” त्यांनी असेही म्हटले की इस्रायल आपल्या लष्करी रणनीतीत अपेक्षेपेक्षा खूप पुढे गेला आहे. अमेरिका दोन आठवड्यात मोठा निर्णय घेऊ शकते व्हाईट हाऊसने माहिती दिली आहे की अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन आठवड्यात निर्णय घेतील की अमेरिका इस्रायलला लष्करीदृष्ट्या पाठिंबा देईल की नाही. देशाचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांची मान्यता मिळाल्यास इराण “काही आठवड्यांत” अण्वस्त्रे तयार करू शकेल अशी घोषणा या घोषणेत करण्यात आली आहे. आयआरजीसीमध्ये गुप्त चर्चा आणि मोठे बदल सूत्रांनुसार, ट्रम्पचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांच्यात अनेक फोनवरून संभाषण झाले आहे. दरम्यान, इराणने इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्स (IRGC) च्या गुप्तचर विभागाच्या नवीन प्रमुखाची नियुक्ती केली आहे. ब्रिगेडियर जनरल माजिद खादेमी यांना नवीन गुप्तचर प्रमुख बनवण्यात आले आहे. ते इस्रायली हल्ल्यात मारले गेलेले मोहम्मद काझेमी यांची जागा घेतील. अमेरिकेने कतारमधून आपले लष्करी विमान हटवले वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेने कतारमधील आपल्या एका प्रमुख हवाई तळावरून सुमारे 40 लष्करी विमान हटवले आहेत. इराणच्या संभाव्य हल्ल्यापासून अमेरिकन मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे सांगितले जाते.

युद्ध भडकले, इराणने इस्रायलवर डागली क्लस्टर क्षेपणास्त्रे Read More »

“वरिष्ठांचा आशीर्वाद, प्रशासनाची ढिसाळ कामगिरी!” अधिकारी म्हणताय “मै हु ना…”

Ahilyanagar News : बोल्हेगाव (अहिल्यानगर) येथील जमीन क्रमांक 34/3 च्या विक्री व्यवहारात कृषीच्या आडून अकृषिक जमीन विकण्याचा प्रकार समोर आला आहे. हा केवळ जमिनीचा व्यवहार नसून सत्ताधारी वरदहस्त आणि स्थानिक प्रशासनातील हलगर्जीपणा यांचा थेट पुरावा म्हणावा लागेल. मिलिंद बाबासाहेब कोरडे यांनी संबंधित व्यवहारात फसवणुकीचा आरोप करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यावर तहसील कार्यालयाने नियमांची पुस्तके उघडून विविध शाखांना अहवाल मागवले कुळकायदा संकलन, गौणखनिज विभाग, महसूल खाते… सर्वांनी आपले कर्तव्य निभावल्याचे दाखवत पत्रव्यवहारांचा ढिगारा तयार केला. पण थेट कारवाई शून्य. विशेष म्हणजे, ड्रेनेज, रस्ते, गटारीसाठी वापरलेल्या गौणखनिजांची चलने सादर करण्यास सांगण्यात आलेले असतानाही संबंधितांनी ती सादर केली नाहीत. तलाठ्यांमार्फत नोटीस बजावली गेली, तरीही दुर्लक्ष. महाखनिज प्रणालीवरही परवानगी नोंदली गेल्याचा ग ना बाबद नोंदी आढळून येत नाही. हे सर्व घडत असतानाही प्रशासन ‘बघ्याची भूमिका’ घेत आहे. खरा प्रश्न असा आहे की, जेव्हा स्पष्ट पुरावे, अहवाल आणि नियमभंग समोर आहे, तेव्हा कारवाई टाळण्यामागे नेमकं कोण आहे? स्थानिक पातळीवरील काही कर्मचाऱ्यांना ‘सिस्टिम’चा आधार वाटतो कारण त्यांच्या पाठिशी उभे असतात वरिष्ठ अधिकारी वा राजकीय हात. इथेही तसाच प्रकार घडत असल्याची चर्चा आहे. लोकांनी कायद्याचा आधार घेतला, पण कायदा प्रशासनाच्या फाईलमधून बाहेरच पडलेला नाही. हे चित्र धोक्याचं आहे. कारण जेव्हा कायदा दुर्लक्षित होतो, तेव्हा लोकशाही कमकुवत होते.

“वरिष्ठांचा आशीर्वाद, प्रशासनाची ढिसाळ कामगिरी!” अधिकारी म्हणताय “मै हु ना…” Read More »