DNA मराठी

ताज्या बातम्या

mahayuti

Maharashtra Election: नगरपरिषद अन् नगरपंचायत निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय; 207 जागांवर मारली बाजी

Maharashtra Election 2025 : राज्यातील 288 नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीसाठी झालेल्या निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत महायुतीमधील तिन्ही घटक पक्षांनी शानदार कामगिरी केली आहे. भाजपने सर्वात जास्त 120 पेक्षा जास्त जागा जिंकले आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला फक्त 44 जागांवर विजय मिळाला आहे. महाविकास आघाडीमध्ये काँगेस सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. कोणाला किती जागा मिळाल्या? महाराष्ट्र निवडणूक आयोगाने (EIC) रविवारी रात्री उशिरा निवडणुकीच्या निकालांचे अंतिम आकडे शेअर केले. आकडेवारीनुसार, भाजप 117 जागा जिंकून सर्वात मोठा विजयी ठरला, त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना 53 जागांसह आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 37 जागांसह स्थान मिळवले. महायुती आघाडीमध्ये काँग्रेसने 28 जागा, शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 7 जागा आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने 9 जागा जिंकल्या. इतर नोंदणीकृत पक्षांनी 4 जागा जिंकल्या, मान्यता नसलेल्या नोंदणीकृत पक्षांनी 28 जागा जिंकल्या आणि अपक्ष उमेदवारांनी 5 जागा जिंकल्या. महाराष्ट्रातील 288 नगरपरिषदा आणि नगरपरिषदेच्या जागांसाठी 2 आणि 20 डिसेंबर रोजी दोन टप्प्यात मतदान झाले. इतर दोन नगरपरिषदांमधील उमेदवार बिनविरोध निवडून आले. या निकालांवरून राज्यात महायुती आघाडीची स्थिती मजबूत असल्याचे स्पष्ट होते. विरोधी पक्षांचा निवडणूक आयोगावर आरोप दरम्यान, विरोधी पक्ष काँग्रेस आणि शिवसेना (यूबीटी) यांनी निवडणूक आयोगावर महायुती आघाडीला विजय मिळवून देण्यास मदत केल्याचा आरोप केला आहे. प्रदेश काँग्रेस प्रमुख हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजप मित्रपक्षांना इशारा देत म्हटले आहे की, “भाजपचे यश एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसाठी धोक्याची घंटा आहे. भाजप या दोन्ही मित्रपक्षांना 100% बाहेर काढेल” असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

Maharashtra Election: नगरपरिषद अन् नगरपंचायत निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय; 207 जागांवर मारली बाजी Read More »

Ram Shinde on Rohit Pawar: जनतेचा कौल राम शिंदेनां ; विजयानंतर राम शिंदेनी रोहित पवारांवर केली टीका

Ram Shinde on Rohit Pawar : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड नगर परिषदेमध्ये भाजपने घवघवीत यश मिळवत 15 जागा आणि नगराध्यक्ष पदी विजय मिळवला आहे. या विजयानंतर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावरती टीकास्त्र डागले आहे, नगरपरिषद निवडणुकीत आमच्यावर बिनबुडाचे आरोप करण्यात आले मात्र जामखेडच्या मतदारांनी आमच्या बाजूने कौल दिला आहे. अशाच पद्धतीने येऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतील भाजपला घवघवीत यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सोबतच महाविकास आघाडीला आता आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याच देखील त्यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे भाजपने नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या निवडणुकीत शानदार कामगिरी करत तब्बल 123 पेक्षा जास्त जागा जिंकल्या आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना शिंदे गट आणि तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट राहिला आहे. तर काँग्रेसने देखील विदर्भात चांगली कामगिरी करत भाजपला रोखण्याचे प्रयत्न केले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना ठाकरे गटाला या निवडणुकीत काही खास करता आलेला नाही. जामखेड नगरपरिषदेसाठी झालेल्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने देखील 2 जागा मिळवल्या आहे.

Ram Shinde on Rohit Pawar: जनतेचा कौल राम शिंदेनां ; विजयानंतर राम शिंदेनी रोहित पवारांवर केली टीका Read More »

rohit pawar

Rohit Pawar on Congress: काँग्रेस भाजपची बी टीम; पराभवानंतर आमदार रोहित पवार भडकले

Rohit Pawar on Congress: जामखेड नगरपालिका निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार प्रचंड संतप्त झाले असून, त्यांनी थेट महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसवरच तोफ डागली आहे. भाजपविरोधात लढाई असल्याचे सांगत असतानाच काँग्रेसने प्रत्यक्षात भाजपची बी-टीम म्हणून काम केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. आमदार रोहित पवार म्हणाले की, जनतेने दोनदा भरभरून मतांचं दान दिलं, मी कायम त्यांच्या ऋणात राहीन. कार्यकर्त्यांनी जीव तोडून मेहनत घेतली, उमेदवारांनी ताकदीने लढा दिला, तरीही निकाल अत्यंत निराशाजनक आहे. काम करणाऱ्यांचं मनोबल खच्ची करणारा हा पराभव आहे. जनतेवर आक्षेप नाही. पण जिथे सर्वत्र पैसाच चालतो, तिथे बचत गट चालक, शेतकरी, दुकानदार, सामान्य कुटुंबातील उमेदवारांना न्याय कधी मिळणार? आम्ही त्यांना सत्तेच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करत होतो. आमच्या विरोधात निवडून आलेल्यांचे कारनामे पाहिले, तर… आमदार पवारांनी आजच्या राजकारणावरही तिखट भाष्य केलं. तत्त्व, विचार आणि विकासावर चालणारं स्वच्छ राजकारण कमी होत चाललंय. पैशांनी गढूळ झालेलंच राजकारण आज जास्त दिसतं. आमच्या विरोधात निवडून आलेल्यांचे कारनामे पाहिले, तर चारचौघात त्यांची नावं घेण्याचीही लाज वाटते, असा घणाघात त्यांनी केला. भाजपाची बी-टीम बनून जातीयवादी शक्तींना विजय मिळवून दिला सर्वात स्फोटक आरोप करताना पवार म्हणाले, काही अपक्षांसह धर्मनिरपेक्षतेचा गजर करणाऱ्या काँग्रेसने भाजपाच्या उमेदवारालाच स्वतःच्या तिकिटावर उभं केलं. भाजपाची बी-टीम बनून जातीयवादी शक्तींना विजय मिळवून दिला. लोकंही या तिरक्या खेळीला बळी पडली. यापुढे काँग्रेसच्या जिल्ह्यातील नेत्यांवर विश्वास कसा ठेवायचा, हा मोठा प्रश्न आहे. जामखेडच्या पराभवानंतर महाविकास आघाडीतच आता आरोप-प्रत्यारोपांची ठिणगी पडली असून, रोहित पवारांच्या या भडक वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

Rohit Pawar on Congress: काँग्रेस भाजपची बी टीम; पराभवानंतर आमदार रोहित पवार भडकले Read More »

team india

T20 World Cup 2026 साठी भारतीय संघाची घोषणा; गिलला धक्का अन् ‘या’ स्टार खेळाडूला पुन्हा संधी

T20 World Cup 2026 : बीसीसीआय मुख्य पुरुष निवडकर्ते अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखाली निवड समितीने फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. या संघात पुन्हा एकदा इशान किशनची निवड करण्यात आली आहे. तर दुसरीकडे शुभमन गिलला टी-20 विश्वचषक 2026 संघातून वगळण्यात आले आहे. अक्षर पटेलला विश्वचषक आणि न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी उपकर्णधारपद देण्यात आले आहे. संजू सॅमसनची पहिला यष्टीरक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. तर रिंकू सिंगला पुन्हा एकदा संघात स्थान देण्यात आले आहे. कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती यांना संघात फिरकीपटू म्हणून स्थान देण्यात आले आहे. जसप्रीत बुमराह जलद गोलंदाजीचे नेतृत्व करतील. अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा त्याला साथ देतील. हार्दिक पंड्या, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर या तीन अष्टपैलू खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले आहे. टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ सूर्यकुमार यादव, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल (उपकर्णधार), शिवम दुबे, रिंकू सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, वॉशिंग्टन सुंदर, इशान किशन (विकेटकीपर)

T20 World Cup 2026 साठी भारतीय संघाची घोषणा; गिलला धक्का अन् ‘या’ स्टार खेळाडूला पुन्हा संधी Read More »

kopargaon election

Kopargaon Election : कोपरगाव निवडणूक; राष्ट्रवादी आणि भाजपचे कार्यकर्ते भिडले

Kopargaon Election : अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे आज नगरपालिका व नगरपंचायत व नगराध्यक्ष पदासाठी मतदान प्रक्रिया पार पडत असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा पाहायला मिळाला. मतदान केंद्रावरच कार्यकर्ते भिडल्याने एकच गोंधळ उडाला मात्र तातडीने प्रशासनाने मध्यस्थी करत हा वाद सोडवला असल्याची माहिती समोर आली आहे. न्यायालयीन प्रकरणामुळे निवडणूक स्थगित झालेल्या नगरपालिका व नगरपंचायतच्या अध्यक्ष व सदस्य आणि काही ठिकाणी केवळ सदस्य पदासाठी 20 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव, देवळाली प्रवरा , नेवासा आणि पाथर्डी या चार ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडत आहे दरम्यान कोपरगावमध्ये दोन पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याचे समोर आले आहे नेमकं काय घडलं? माहितीनुसार, नगर परिषदेच्या निवडणुकीचे साठी आज कोपरगावात मतदान प्रक्रिया पार पडत आहे यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा थेट युतीमधीलच घटक पक्षांमध्ये सामना पाहायला मिळत आहे मात्र मतदानापूर्वीच दोनही पक्षातील कार्यकर्ते मतदान केंद्राबाहेरच एकमेकांशी भिडले. एका मतदान केंद्रामध्ये मतदान प्रक्रिया सुरू असताना भाजपचे लोक मतदारांवर ती दबाव आणतायेत की भाजपला मतदान करा असा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला. दरम्यान पोलीस प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करत दोनही पक्षाच्या कार्यकर्त्यांना मतदान केंद्रापासून हाकलून लावले यामुळे परिस्थिती नियंत्रणात आहे काळे कोल्हे संघर्ष कोपरगावमध्ये काळे विरुद्ध कोल्हे हा संघर्ष गेल्या अनेक वर्षांपासून पाहायला मिळाला यामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमदार आशुतोष काळे यांच्याकडून काका कोयते तर विवेक कोल्हेगाटाकडून परागसंधान यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली त्यामुळे कुठेतरी काळे कोल्हे संघर्ष पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळणार हे नक्की होते. दरम्यान निवडणुका जाहीर झाल्यापासूनच एकमेकांवर आरोप प्रत्यारोप टीकाटिप्पणी ही जोरदार पाहायला मिळाली आज मतदानाच्या दिवशी सकाळीच एका मतदान केंद्रावर काळे व कोल्हे गट एकमेकांशी भिडले प्रतिष्ठेची बनलेल्या या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणारे यामुळे निकालापूर्वीच या ठिकाणचे राजकारण राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे यामुळे कार्यकर्त्यांमध्ये देखील आता चांगला संघर्ष पाहायला मिळतोय.

Kopargaon Election : कोपरगाव निवडणूक; राष्ट्रवादी आणि भाजपचे कार्यकर्ते भिडले Read More »

ranjankumar sharma

Ranjankumar Sharma : नगरचे तत्कालीन पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा ‘त्या’ प्रकरणात दोषी; तीन महिन्यांच्या आत कारवाई करा न्यायालयाचे आदेश

Ranjankumar Sharma : नगर शहरात पोलिसांनी उभारलेल्या दिलासा सभागृहाच्या बांधकाम प्रकरणी नगरचे तत्कालिन पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा दोषी ठरले आहेत. त्यांच्या विरोधात तीन महिन्याच्या आत कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) खंडपीठाने दिले आहेत. या प्रकरणी नगरमधील सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी ख़ंडपीठात फौजदारी याचिका दाखल केली होती. शर्मा यांच्यावर कारवाईचे आदेश झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. याबाबतची माहिती अशी की, नगर शहरातील छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील (औरंगाबाद रोड) पोलिस अधीक्षक निवासस्थानाशेजारी (जुने शहर वाहतूक कार्यालयाच्या जागी) अवैध निधीतून बांधण्यात आलेल्या दिलासा सेंटर सभागृहाच्या बेकायदा बांधकामाबाबत तत्कालीन पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांना खंडपीठाने दोषी ठरवून त्यांच्यावर तीन महिन्यात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची माहिती अशी की, 2019 मध्ये पोलिसांच्या दिलासा सेल कार्यालयालगत अनधिकृतपणे अवैध मार्गाने जमवलेल्या निधीतून हॉलचे (सभागृह) बांधकाम केले गेले आहे. त्याची चौकशी होऊनही कारवाई करण्यास होत असलेल्या दिरंगाईबाबत तक्रारदार सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी तत्कालीन गृहमंत्री यांच्याकडे 9 ऑगस्ट 2021 रोजी तक्रार केली होती. त्याआधी त्यांनी 2 मार्च 2021 रोजी अप्पर मुख्य गृह सचिवांकडेही तक्रार केली होती. पण तिची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे त्यांनी तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसेंकडे तक्रार केली. संबंधित हॉल बांधताना कोणतीही कायदेशीर परवानगी घेतली गेली नाही व बांधकामासाठी सरकारी अनुदानाचाही वापर केला गेला नाही. तत्कालीन पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी हे बेकायदा बांधकाम केले व त्याची नोंद अहमदनगर महापालिकेकडे आणि शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडेही नसल्याचे माहिती अधिकाराद्वारे मिळालेल्या माहितीतून स्पष्ट झाले असल्याचा दावा तक्रारदार शेख यांनी केला होता. तसेच या हॉल बांधकामाची परवानगी व बांधकाम खर्च याची माहिती पोलिस अधीक्षक कार्यालयाकडेही उपलब्ध झाली नाही. त्यामुळे सुमारे 30 ते 35 लाखाच्या खर्चातून झालेले हे बांधकाम अवैध मार्गाने निधी मिळवून झाल्याचा त्यांचा दावा होता. त्यामुळे त्यांनी याबाबत तत्कालीन गृहमंत्री वळसेंंकडे केलेल्या तक्रारीवर चौकशी सुरू झाली व गृह मंत्रालयाने पोलिस महासंचालकांकडे याबाबतचा अहवाल मागितला होता. त्यानंतर तत्कालीन पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी या प्रकरणाची चौकशी केली व त्यामध्ये त्यांनी शर्मा व इतर अधिकार्‍यांना पाठीशी घातले. त्यामुळे शेख यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) खंडपीठ येथे याचिका दाखल केली होती. त्यामध्ये तत्कालीन पोलिस अधीक्षकांच्या अहवालावर तक्रारदार शेख यांच्याकडून झालेल्या युक्तिवादाची दखल खंडपीठाने घेतली. या अहवालात संबंधित हॉल कोणी व कधी बांधला, याबाबत काहीएक माहिती किवा पुरावा उपलब्ध नाही तसेच कोणत्याही अभिलेखावर त्याबाबत नोंद मिळून आलेली नाही, असे स्पष्ट नमूद केले असल्याचे युक्तिवादात स्पष्ट केले. खंडपीठाने त्याची गंभीर दखल घेऊन यासंदर्भात दिलेल्या आदेशात या ओळींचा स्पष्ट उल्लेख करून अशा प्रकारचे भाष्य पोलीस अधीक्षक कसे करू शकतात? त्यांच्या कार्यक्षेत्रात असे बेकायदा बांधकाम होते व ते तुम्हाला माहिती नाही, असे कसे?, असे सवाल उपस्थित केले व असे प्रकार भविष्यात घडता कामा नये म्हणून राज्याच्या मुख्य सचिवांनी (गृह) व पोलिस महासंचालकांनी यासंदर्भात आवश्यक ते धोरण ठरवण्याचे आदेश दिले तसेच तक्रारदार शेख यांनी दिलासा सेल हॉलच्या बेकायदा बांधकामाबाबत केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिस महासंचालक यांनी स्वतंत्र प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश दिले. या प्रकरणात पोलिस महासंचालकांनी नाशिक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक यांना चौकशीचे आदेश केले होते.तत्कालीन विशेष पोलिस महानिरीक्षक बी.जी. शेखर यांनी फेर चौकशी केली असता त्यामध्ये तत्कालीन पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा दोषी आढळून आले आहेत. शर्मा यांनी अहिल्यानगर जिल्हा पोलिस अधीक्षकांसारख्या महत्त्वाच्या आणि जबाबदार पदावर असताना प्रशासकीय प्रक्रियांचा वापर न करता किंवा अधिकृत वरिष्ठ अधिकार्‍यांकडून आराखडा मंजूर न करता सभागृह दुरुस्तीचे काम करण्यात आल्याचे दिसून येते. शर्मा यांनी प्रशासकीय अनियमितता केल्याचे निष्पन्न झाले आहे, असे स्पष्ट नमूद करून तसा अहवाल नाशिक विभागाचे विद्यमान विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी उच्च न्यायालयात सादर केला आहे. या प्रकरणी दिनांक 9 डिसेंबर रोजी उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) खंडपीठाचे न्यायमूर्ती वाय.जी. खोब्रागडे व संदीपकुमार सी. मोर यांच्यासमोर सुनावणी होऊन न्यायालयाने महाराष्ट्र राज्याच्या पोलिस महासंचालकांना असे आदेश केले आहेत की, आदेशाच्या तारखेपासून तीन महिन्यांच्या आत 18 जुलै 2024 च्या चौकशी अहवालाच्या आधारे शर्मा यांच्याविरोधात प्रशासकीय नियमानुसार  कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश केले आहेत. या प्रकरणात खंडपीठात तक्रारदार शाकीरभाई शेख यांच्यावतीने वकील अ‍ॅड. प्रज्ञा तळेकर व अ‍ॅड. अजिंक्य काळे यांनी बाजू मांडली. तर  सरकारतर्फे अ‍ॅड. ए. बी. गिरासे यांनी काम पाहिले.

Ranjankumar Sharma : नगरचे तत्कालीन पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा ‘त्या’ प्रकरणात दोषी; तीन महिन्यांच्या आत कारवाई करा न्यायालयाचे आदेश Read More »

manikrao kokate

Manikrao Kokate : मोठी बातमी, माणिकराव कोकाटेंना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

Manikrao Kokate : राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे यांना शासकीय कोट्यातील 10 टक्के सदनिका गैरव्यवहार प्रकरणी आज उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. उच्च न्यायालयाने या प्रकरणात माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर केली. मात्र या प्रकरणात उच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास नकार देत आमदारकीचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा असे आदेश दिले आहे. शासकीय कोट्यातील 10 टक्के सदनिका गैरव्यवहार प्रकरणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने मोठा निर्णय माणिकराव कोकाटे यांची 2 वर्ष कारावासची शिक्षा कायम ठेवली होती. या प्रकरणात शिक्षा कायम असल्याने माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आला होता. अटक वॉरंट जारी झाल्यानंतर कोकाटे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. तर प्रकृती बिघडल्याने उपचारासाठी मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. या प्रकरणात माणिकराव कोकाटे यांना शिक्षा कायम ठेवण्याचे आदेश नाशिक जिल्हा न्यायालयाने दिल्यानंतर कोकाटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.

Manikrao Kokate : मोठी बातमी, माणिकराव कोकाटेंना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा Read More »

prajakt tanpure

Prajakt Tanpure : बिबट्याची दहशत…; शेतकऱ्यांसाठी तनपूरे यांची शासनाकडे महत्त्वाची मागणी

Prajakt Tanpure : बिबट्यांच्या वाढत्या संचारामुळे शेतकऱ्यांचे प्राण धोक्यात आल्याने तालुक्यातील शेतकऱ्याच्या शेतीसाठी किमान १२ तास दिवसा वीज द्यावी अशी मागणी माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात व विशेषतः राहुरी तालुक्यात, शहरात बिबट्याचा मोठ्या प्रमाणावर वावर सुरु झाल्याने शेतकरी, नागरिक, स्त्री शाळकरी मुले, यांच्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यात महावितरण कडून शेतकऱ्यांना दिवस व रात्री अशा दोन्ही वेळेस कधी रात्री तर कधी दिवसा अश्या शिफ्टमध्ये वीजपुरवठा केला जात आहे. सद्या शेतीमध्ये गहू, हरभरा,ऊस तसेच इतर पिकांची लागवड सुरू असल्याने पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतात जावे लागत आहे. मात्र सर्वत्र बिबट्यांचा वाढता संचार लक्षात घेता शेतकऱ्यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी शासनाने किमान १२ तास तरी दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी ठाम मागणी माजी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केली आहे. ऊर्जा राज्यमंत्री असताना मा. प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी मतदारसंघातच नव्हे तर राज्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी १२ तास दिवसा वीज पुरवठा करण्यात यावा याबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित करून या प्रश्न अत्यंत प्रभावीपणे मांडला होता. व अडीच वर्ष राज्यमंत्री असताना त्यांनी आणि दूरदृष्टी समोर ठेऊन शेतकऱ्यांसाठी काम केले. सौर ऊर्जा प्रकल्प उभे करून शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी ठोस पावले उचलण्यात आली.राहुरी पाथर्डी नगर मतदारसंघात प्रतिनिधिक स्वरूपात काही गावात सौर ऊर्जा प्रकल्प उभे केले त्यात तालुक्यात बाभुळगाव, आरडगाव, वांबोरी या गावात हे प्रकल्प कार्यान्वितही झाल्याने त्याभागातील शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळू लागली त्याचबरोबर मतदारसंघात वीज वितरण व्यवस्था सक्षम करण्यासाठी आवश्यक त्या सुधारणा करण्यात आल्या, ज्यामुळे आज हजारो शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठ्याचा लाभ होत आहे. रात्रीच्या अंधारात शेतीकाम करणे म्हणजे शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेला धोका असून, वन्य प्राण्यांच्या वाढत्या हालचालींमुळे अपघातांची शक्यता वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्राण, पिके आणि शेती उत्पादन सुरक्षित ठेवण्यासाठी शासनाने दिवसा वीजपुरवठ्याचा निर्णय तातडीने घ्यावा, असे आवाहन माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले आहे.

Prajakt Tanpure : बिबट्याची दहशत…; शेतकऱ्यांसाठी तनपूरे यांची शासनाकडे महत्त्वाची मागणी Read More »

harshwardhan sapkal

Harshwardhan Sapkal : नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या; हर्षवर्धन सपकाळांची मागणी

Harshwardhan Sapkal: नवी मुंबई विमानतळाला भूमीपुत्र दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची लोकांची तीव्र भावना आहे, या भावनांचा आदर सरकारने केला पाहिजे. भाजपा महायुती सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जाणीवपूर्वक दि. बा. पाटील यांचे नाव देण्यास टाळाटाळ करत आहेत, परंतु कोणत्याही परिस्थितीत दुसरे नाव खपवून घेतले जाणार नाही, वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरून लढा देऊ, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे. टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, नवी मुंबईच्या विकासासाठी स्थानिकांनी जमिनी दिल्या व त्यावेळी भूमीपुत्राच्या हक्कांसाठी दि. बा. पाटील यांनी दिर्घ लढा दिला. १२.५ टक्के योजना ही दि. बा. पाटील यांच्या आंदोलनामुळेच शक्य झाली आहे. दि. बा. पाटील यांची आमदार व खासदार अशी प्रदिर्घ राजकीय कारकिर्द राहिली आहे. नवी मुंबईत, जेएनपीटी, नैना प्रकल्प, नवी मुंबई विमानतळ विकसीत होत असताना भूमिपुत्रांनी दिलेल्या योगदानाकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी रास्त असून जनभावनेचा आदर केला पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरी दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचे आश्वासन दिले असले तरी त्यांचा कावा सर्वांना माहित आहे. ‘फडणविसांचा कावा ना कळे ब्रम्हदेवा’, असा आहे, असे सपकाळ म्हणाले. नवी मुंबई विमानतळाचा उल्लेख सध्या एनएम विमानतळ असा केला जात आहे. विमानतळाच्या कुंपनाच्या भिंतीवरही एनएम अक्षरे कोरली जात आहेत. हे एनएम म्हणजे नरेंद्र मोदी विमानतळ असे तर नाही ना असा दाट संशय बळावत चालला आहे. अहमबादच्या क्रिकेट स्टेडियमचे सरदार वल्लभभाई पटेल यांचे नाव बदलून नरेंद्र मोदी यांचे दिले आहे, पण असा कोणताही कावेबाज पणा भाजपा वा देवेंद्र फडणवीस यांनी करु नये. लोकसभेत काँग्रेसच्या खासदारांनी या प्रश्नी आवाज उठवला आहे, राज्यसभेतही ही मागणी लावून धरली जाईल, असे सपकाळ म्हणाले.     माणिकराव कोकाटे यांना अटक का नाही? माणिकराव कोकाटे यांना २ वर्षांची शिक्षा होऊन तीन दिवस झाले पण अद्याप त्यांची आमदारकी रद्द केली नाही व अटकही केलेली नाही. लिलावती रुग्णालयात उपचाराच्या नावाखाली वेळकाढूपणा केला जात आहे, आणि चोराच्या दिमतीला पोलीस ठेवले आहेत. शिक्षा ठोठावताच तात्काळ कारावई केली पाहिजे होती पण कारवाई ही फक्त विरोधी पक्षांच्या नेत्यांवरच केली जाते, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. एमडी ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या.. सातारा जिल्ह्यातील सावरी गावात एमडी ड्रग्जचा कारखाना उघड झाला असून ज्या जागेत हा काळा धंदा सुरु होता ती जागा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भावाच्या नावावर आहे. हा प्रकार सर्वात प्रथम काँग्रेस पक्षाने उघड करून कठोर कारवाईची मागणी केली होती. भ्रष्टाचाराचा पैसा कमी पडतो की काय म्हणून आता अंमली पदार्थांचा धंदा करुन पैसा मिळवला जात आहे. या सरकारला जनाची तर नाहीच पण मनाचीही नाही. एवढे सर्व उघड होऊनही एकनाथ शिंदे यांचा एमडी ड्रग्जच्या कारखान्याशी संबंध नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात. हा प्रकार अत्यंत गंभीर असून एकनाथ शिंदे यांचा राजीनामा घेतला पाहिजे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

Harshwardhan Sapkal : नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या; हर्षवर्धन सपकाळांची मागणी Read More »

election

Maharashtra Election: कोपरगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक‌ : प्रशासकीय यंत्रणा सज्ज ; 69 मतदान केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त

Maharashtra Election : कोपरगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ ची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. उद्या शनिवार, दिनांक २० डिसेंबर २०२५ रोजी मतदान पार पडणार आहे. यासाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे. सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत मतदान प्रक्रिया होईल. ही प्रक्रिया निर्भय, निष्पक्ष व शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी भारती सागरे यांनी दिली. यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल भारती, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महेश सावंत, सुहास जगताप आदी उपस्थित होते. मतदानाच्या दिवशी सकाळी ठीक ६:३० वाजता सर्व मतदान केंद्रांवर ‘मॉक पोल’ (चाचणी मतदान) प्रक्रिया सुरू होईल. उमेदवारांनी नेमलेल्या मतदान प्रतिनिधींनी विहित नमुन्यातील फॉर्म व दोन रंगीत पासपोर्ट आकाराच्या छायाचित्रांसह वेळेवर उपस्थित राहणे आवश्यक आहे. मतदान प्रतिनिधी संबंधित यादीतील मतदार असणे बंधनकारक आहे. केंद्रात एका वेळी एकाच प्रतिनिधीला उपस्थित राहता येईल. मतदानासाठी मतदारांजवळ निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या १२ ओळखपत्रांपैकी कोणतेही एक मूळ ओळखपत्र (Original ID) सोबत असणे अनिवार्य आहे. ओळखपत्राशिवाय कोणालाही मतदानाचा हक्क बजावता येणार नाही. मतदान केंद्राच्या २०० मीटर परिसरात, तसेच केंद्राच्या आत मोबाईल नेण्यास सक्त मनाई आहे. उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी किंवा मतदार यांनी आपले मोबाईल सुरक्षित ठिकाणी ठेवूनच केंद्रात प्रवेश करावा. प्रचार कालावधी संपल्याने आज रात्री १० वाजेपर्यंत उमेदवारांनी सर्व होर्डिंग्ज, बॅनर्स, प्रचार साहित्य स्वतःहून काढून घ्यावे. त्यानंतर आक्षेपार्ह साहित्य आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. शहरातील सर्व ६९ मतदान केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यासाठी १ पोलीस उपअधीक्षक, २ पोलीस निरीक्षक, ९ पीएसआय, १० मोबाईल व्हॅन्स, १२९ पोलीस कॉन्स्टेबल व ७४ होमगार्ड्स तैनात असतील. निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणण्याचा प्रयत्न झाल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. मतदान संपल्यानंतर २१ डिसेंबर रोजी ‘सेवानिकेतन विद्यालय’ येथे मतमोजणी होणार आहे. यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून जारी केलेले ओळखपत्र (Pass) असलेल्या प्रतिनिधींनाच प्रवेश दिला जाईल. प्रशासनाने मतदानाच्या दिवशीही सर्व नागरिक, उमेदवार व राजकीय पक्षांकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

Maharashtra Election: कोपरगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक‌ : प्रशासकीय यंत्रणा सज्ज ; 69 मतदान केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त Read More »