DNA मराठी

ताज्या बातम्या

Ambadas Danve

जीएसटी विभागात घोळ, गोपनीय माहितीची गळती होतेय; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप

Ambadas Danve : विधानपरिषद विरोध पक्षनेते अंबादास दानवे यांनी जीएसटी विभागात घोळ होत असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी जीएसटी नोंदणी संबंधित गोपनीय माहितीच्या गळतीच्या प्रकरणाची उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. जीएसटीसाठी अर्ज केलेल्या अनेक व्यावसायिकांना नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यावर विविध बँकांकडून सदर कंपनीच्या नावाने खाते उघडण्यासाठी फोन येण्यास सुरूवात झालेली आहे. जीएसटी विभागाकडे असलेली करदात्याची गोपनीय माहिती काही अधिकारी व कर्मचारी तृतीय पक्षांना देत असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. वस्तू व सेवा कर अधिनियम व संबंधित नियमांनुसार करदात्याची माहिती अत्यंत गोपनीय असून उक्त माहिती कोणत्याही परिस्थितीत बाह्य घटकांसोबत सामायिक करणे, ही बाब कायद्याची उल्लंघन करणारी आहे. या प्रकरणामध्ये करदात्याची माहिती तृतीय पक्षांपर्यंत पोहोचल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे. त्यामुळे या प्रकरणात विभागातील काही कर्मचाऱ्यांकडून माहितीची बेकायदेशीर विक्री किंवा गळती होत असल्याचा संशयही दानवे यांनी व्यक्त केला आहे. तसेच ग्राहकांची संवेदनशील माहिती ही व्यवसायिक स्पर्धकांपर्यंत पोहोचवली जात असल्याने निष्पक्ष व्यावसायिक स्पर्धेवरही विपरीत परिणाम होत असल्याचे दानवे यांनी म्हटले. ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून त्यामुळे शासन व कर प्रशासन यांच्याबाबत करदात्यांमध्ये अविश्वासाची भावना निर्माण झाली असल्याची बाब माझ्या निदर्शनास आली असल्याचे दानवे यांनी म्हटले. त्यामुळे या गंभीर प्रकरणाची उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. तसेच भविष्यात असे प्रकार घडू नयेत म्हणून योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणीही अंबादास दानवे यांनी वित्तमंत्री यांच्याकडे केली आहे.

जीएसटी विभागात घोळ, गोपनीय माहितीची गळती होतेय; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप Read More »

Devendra Fadanvis 1

सहकार कायद्यात बदल करण्यासाठी समितीची स्थापना करणार, मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

Devendra Fadanvis: सध्या प्रचलित असलेले सहकार कायद्यात कालानुरूप बदल करण्याची गरज आहे. सहकार क्षेत्राशी निगडित असलेल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम सहकार कायद्यातून  झाले पाहिजे. त्यासाठी कायद्यात प्रत्येक क्षेत्राशी निगडित नवीन ‘ प्रकरणे ‘ दाखल करावी लागणार आहेत. त्यासाठी सहकार कायद्यात आवश्यक बदल करावे लागतील. सहकार कायद्यातील आवश्यक बदलांसाठी समितीची स्थापना करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात दख्खनचा उठाव आणि सहकाराची मुहूर्तवेढ, शतकोत्तर सुवर्ण स्मृतिदिन 150 वर्ष, आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 निमित्त ‘ सहकाराचे सक्षमीकरण आणि राज्य शासनाचे धोरण’ या परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संबोधित करताना मुख्यमंत्री बोलत होते. व्यासपीठावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय भूपृष्ठ परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, खासदार शरद पवार, बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, दिलीप दिघे उपस्थित होते. सहकारी बँकांनी आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेत बँकिंग क्षेत्रात अमुलाग्र बदल केले असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कोअर बँकिंग प्रणालीसह आधुनिक तंत्रज्ञानयुक्त बँकिंग प्रणाली सहकारी बँकांनी अंगीकारली. ग्राहकपयोगी सर्व सेवा सहकारी बँका देत आहेत. यामुळे ‘फिस्कल कन्सोलिडेशन’ च्या कालावधीत सहकारी बँका जगल्या आहेत. या काळातही सहकारी बँकांनी उत्तम काम केले आहे. पुणे जिल्ह्यातील सुपे येथे 12 मे 1875 रोजी सावकारांविरोधात झालेला उठाव म्हणजे ही सहकार क्षेत्राची सुरुवात ठरली. अशा या ऐतिहासिक घटनेला आज दीडशे वर्ष पूर्ण झाली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रात प्रथमच स्वतंत्ररित्या सहकार मंत्रालय सुरू केले आहे. या मंत्रालयाच्या माध्यमातून देशभर सहकार चळवळीचे सक्षमीकरण होत आहे. देशभरात सहकारी संस्थांचे सक्षमीकरण केंद्र शासनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. यामुळे ग्रामीण अर्थकारणाला चालना मिळत आहे. जागतिक बँकेच्या सहकार्याने 10 हजार गावांमध्ये सहकारी संस्थांना प्रशिक्षण देऊन त्यांचे ‘ बिजनेस मॉडेल ‘ बनविण्यात येत आहे.  या कामासाठी जागतिक बँकेनेही समाधान व्यक्त केले असून यातून ‘ ॲग्री बिजनेस’ची नवीन सुरुवात करण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. सहकारी साखर कारखाने साखर उत्पादनासोबत उपपदार्थही बनवीत आहेत. यामुळे जागतिक स्पर्धेत साखर कारखाने टिकत आहेत. केंद्र शासनाने किमान आधारभूत किंमत, इथेनॉल धोरण यामध्ये सातत्याने बदल केले आहेत. शेतकऱ्यांचे कारखाने शेतकऱ्यांकडेच राहील, अशी राज्य शासनाची भूमिका आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी उपपदार्थांच्या निर्मितीकडेही वळले पाहिजे. सहकारी तत्त्वावर सुरू असलेल्या सूतगिरण्यांना विजेचे दर हे जागतिक स्पर्धेत टिकविण्यासाठी अडचणीचे ठरत असल्याच्या तक्रारी असतात.  शासन विजेबाबत अनुदानही देत असते. त्यामुळे सर्व सुतगिरण्या सौरऊर्जेवर नेण्यात येत आहे. त्यामुळे सुतगिरण्यांची विजेची सर्वात मोठी अडचण दूर होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सहकार क्षेत्राच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योगांनाही मदत करण्यात यावी. एकूण सहकारी संस्थांपैकी 50 टक्के या सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत. सहकार कायद्यात बदल करून मागील काळात सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी वेगळे प्रकरण ठेवण्यात आले आहे. यामधून सहकारी गृहनिर्माण संस्थांची व्यवस्था उभारण्यात येत आहे.  स्वयं पुनर्विकास करण्यासाठी नवीन योजना सहकारी संस्थांसाठी आणलेली आहे.  त्यांना राज्य शासन 17 प्रकारच्या वेगवेगळ्या सवलती देत आहे. सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या बळकटीकरणामुळे मुंबईतच  हक्काचे घर नागरिकांना मिळत आहे. आमदार प्रवीण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयं पुनर्विकास बाबत समितीही स्थापन करण्यात आलेली आहे. सहकारी बँकांमधून राज्य शासनाचे व्यवहार मोठ्या प्रमाणात होण्यासाठी याबाबत अभ्यास करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

सहकार कायद्यात बदल करण्यासाठी समितीची स्थापना करणार, मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा Read More »

DGMO Rajiv Ghai

भारताने दिला पाकिस्तानला धक्का, 40 सैनिक मारले तर 100 हून अधिक दहशतवादी ठार

DGMO Rajiv Ghaiv : गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावा वाढत असून दोन्ही देशांकडून हवाई हल्ले करण्यात येत आहे. 7 ते 10 मे दरम्यान पाकिस्तानला दिलेल्या प्रत्युत्तरात भारताने पाकिस्तान सैन्याचे 35 – 40 सैनिक मारले असून तसेच 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले असल्याची माहिती लष्कराचे महासंचालक (डीजीएमओ) लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, म्हणाले की या काळात भारताने 5 शूर सैनिकही गमावले, परंतु या मोहिमेचे यश धोरणात्मक दृष्टिकोनातून ऐतिहासिक आहे. पाकिस्तानी सैन्यावर मोठा हल्ला डीजीएमओ म्हणाले की, पाकिस्तानकडून काही एअरफील्ड आणि गोदामांवर वारंवार हवाई हल्ले होत होते, जे भारतीय सैन्याने पूर्णपणे हाणून पाडले. 7 ते 10 मे दरम्यान, नियंत्रण रेषेवर तोफखाना आणि लहान शस्त्रांच्या गोळीबारात 35 ते 40 पाकिस्तानी सैनिक मारले गेले. ऑपरेशन सिंदूर दहशतवाद्यांचा अंत ठरला लेफ्टनंट जनरल राजीव घई म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर 7 आणि 8 मार्चच्या मध्यरात्री सुरू करण्यात आले. या अचूक आणि गुप्त कारवाईत, 100 हून अधिक दहशतवादी मारले गेले, ज्यात अनेक उच्च दर्जाच्या लक्ष्यांचा समावेश होता. डीजीएमओ म्हणाले की, आम्ही युसूफ अझहर, अब्दुल मलिक रौफ आणि मुदस्सीर अहमद सारख्या दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे जे आयसी-814 अपहरण आणि पुलवामा बॉम्बस्फोट यासारख्या हल्ल्यांमध्ये सहभागी होते.

भारताने दिला पाकिस्तानला धक्का, 40 सैनिक मारले तर 100 हून अधिक दहशतवादी ठार Read More »

IMG 20250512 WA0004 1024x683

‘त्या’ हल्लेखोर वाघिणीचा तात्काळ बंदोबस्त करा, नाहीतर…, विजय वडेट्टीवारांचा इशारा

Vijay Wadettiwar: तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या तीन महिलेवर वाघीणीने प्राण घातक हल्ला चढविला व यात तीनही महिलांचा दुर्दैवी अंत झाला. सदर घटना काल दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास सिंदेवाही वनपरिक्षेत्रा अंतर्गत उपवनक्षेत्र डोंगरगाव मधील चारगाव कक्ष क्रमांक 252 येथे घडली. मृतकांमध्ये कांता बुधाजी चौधरी (65) शुभांगी मनोज चौधरी (28 ) रेखा शालिक शेंडे (50) यांचा समावेश असून तीनही मृतक महिला या सिंदेवाही तालुक्यातील मेंढामाल येथील रहिवासी आहेत. अकस्मात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण मेंढा माल गावात शोककळा पसरली. सदर घटनेची माहिती मिळतात क्षेत्र दौरावर असलेले विधिमंडळ पक्षनेते तथा लोकलेखा समिती अध्यक्ष व ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी वाघ हल्यात मृत पावलेल्या तीनही महिलांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होऊन त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वन केले. अंत्यसंस्कार आटोपताच उपस्थित वनविभागाचे उपवनसंरक्षक राकेश सेपट, वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर, पोलीस निरीक्षक राठोड तसेच उपस्थित गावकरी व वन विभाग कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी यांच्याशी तात्काळ चर्चा करून हल्लेखोर वाघिणीचा तात्काळ बंदोबस्त करा तसेच घडलेल्या घटनेचा गांभीर्याने विचार करून मृतकांच्या कुटुंबीयातील व्यक्तीला वनविभागाच्या सेवेत रुजू करून घ्या. व मृताच्या कुटुंबीयांना विभागाकडून देय असलेला मोबदला तात्काळ देण्याचे निर्देश यावेळी विधिमंडळ पक्ष नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिले. सोबतच अशा दुर्दैवी घटना यापुढे घडू नये याकरिता विशेष उपाययोजना करण्याचेही त्यांनी यावेळी उपस्थित वनअधिकाऱ्यांना सांगितले. याप्रसंगी प्रामुख्याने सिंदेवाही काँग्रेस शहराध्यक्ष सुनील उट्टलवार , सिंदेवाही नगराध्यक्ष भास्कर नन्नावार, मेंडामाल कांग्रेस कमिटी शाखाध्यक्ष वामनराव कोकोडे, गुरुदासजी बोरकर, युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष अभिजीत मुप्पीडवार, नथूजी सोनुले प्रामुख्याने उपस्थित होते.

‘त्या’ हल्लेखोर वाघिणीचा तात्काळ बंदोबस्त करा, नाहीतर…, विजय वडेट्टीवारांचा इशारा Read More »

Screenshot 2025 05 12 08 47 27 73 6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7

शहीद सचिन वनंजे यांच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री अजित पवारांची सांत्वनपर भेट

India Pakistan War: नांदेड मधील देगलूर तालुक्यातील तमलूर गावाचे सुपुत्र, भारतीय लष्करातील शहीद जवान सचिन यादवराव वनंजे यांच्या कुटुंबीयांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देगलूर येथील त्यांच्या राहत्या घरी सांत्वनपर भेट घेतली. शहीद सचिन यांच्या कुटुंबीयांना शासनाच्यावतीने सर्वोतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही अजित पवार यांनी यावेळी दिली. आमदार प्रतापराव चिखलीकर, आमदार विक्रम काळे, आमदार जितेश अंतापूरकर, उपविभागीय अधिकारी अनुप पाटील, तहसीलदार भरत सूर्यवंशी, नगर परिषदेच्या मुख्याधिकारी नीलिमा कांबळे आदिंची यावेळी उपस्थिती होती. भारतीय लष्करातील जवान सचिन यांचा मृत्यू ही अतिशय दुःखद घटना आहे. सचिन यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. त्यांच्या कुटुंबीयांना शासनाच्या घरकुल योजनेतून घर दिले जाईल. त्यांच्या पत्नी वा भावाला नोकरी दिली जाईल. त्यांच्या मुलीच्या शिक्षण व उज्वल भविष्यासाठी शासनाच्यावतीने तरतूद करण्यात येईल. त्यांच्या पेन्शनची कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी स्वतः तहसीलदारांनी लक्ष द्यावे, अशी यावेळी सूचना करून अजित पवार यांनी करतानाच शहीद सचिन वनंजे यांना शहिदाचा दर्जा मिळावा यासाठी देखील शासन प्रयत्न करेल, असे स्पष्ट केले.

शहीद सचिन वनंजे यांच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री अजित पवारांची सांत्वनपर भेट Read More »

Plean

भारत-पाकिस्तान युद्ध, 15 पर्यंत बंद राहणार ‘या’ शहरातील विमानसेवा

Airport Closed: भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढत असलेल्या तणावात केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत 15 पर्यंत देशातील 32 शहरांची विमानसेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नागरी विमान वाहतूक नियामकानुसार, 9 आणि 10 मे च्या मध्यरात्रीपासून, श्रीनगर आणि अमृतसरसह देशाच्या उत्तर आणि पश्चिम भागातील 32 विमानतळ 15 मे पर्यंत नागरी उड्डाणांसाठी बंद करण्यात आले आहेत. शनिवारी सकाळी जाहीर करण्यात आलेला हा निर्णय 7 मे रोजी भारताने दहशतवादी छावण्यांवर केलेल्या हल्ल्यांपासून आणि त्यानंतर सीमावर्ती भागात पाकिस्तानने केलेल्या गोळीबारापासून भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी तणावाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) आणि संबंधित विमान वाहतूक अधिकाऱ्यांनी एअरमेनना सूचना (NOTAMs) ची मालिका जारी केली आहे, ज्यामध्ये उत्तर आणि पश्चिम भारतातील 32 विमानतळ सर्व नागरी उड्डाण ऑपरेशन्ससाठी तात्पुरते बंद करण्याची घोषणा करण्यात आली आहे. डीजीसीएने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, ही तात्पुरती बंदी 9 मे ते 15 मे पर्यंत सकाळी 5:29 वाजेपर्यंत लागू असेल. या विमानतळांमध्ये श्रीनगर, अंबाला, अमृतसर, अवंतीपूर, भूज, बिकानेर, भटिंडा, चंदीगड आणि जम्मू यांचा समावेश आहे. यामध्ये चंदीगड, श्रीनगर, अमृतसर, लुधियाना, भुंतर, किशनगड, पटियाला, शिमला, धर्मशाला, भटिंडा, जैसलमेर, जोधपूर, लेह, बिकानेर, पठाणकोट, जम्मू, जामनगर आणि भुज येथील विमानतळांचा समावेश आहे. “भारतातील अनेक विमानतळ बंद करण्याबाबत विमान वाहतूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेनंतर, जम्मू, श्रीनगर, लेह, जोधपूर, अमृतसर, चंदीगड, भुज, जामनगर आणि राजकोटला जाणारी एअर इंडियाची उड्डाणे 15 मे रोजी सकाळी 5.29 वाजेपर्यंत रद्द करण्यात येत आहेत,” असे एअरलाइनने ‘एक्स’ वरील पोस्टमध्ये म्हटले आहे. एअर इंडियाने असेही म्हटले आहे की या कालावधीत प्रवासासाठी वैध तिकिटे असलेल्या ग्राहकांना रीशेड्युलिंग शुल्कात एक वेळ सूट दिली जाईल किंवा रद्द केल्यास पूर्ण परतफेड दिली जाईल. इंडिगोने ‘एक्स’ वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की संबंधित अधिकाऱ्यांच्या ताज्या सूचनांनुसार, विमानतळ तात्पुरते बंद असल्याने 15 मे रोजी सकाळी 5.29 वाजेपर्यंत 10 ठिकाणांवरील सर्व उड्डाणे रद्द राहतील.

भारत-पाकिस्तान युद्ध, 15 पर्यंत बंद राहणार ‘या’ शहरातील विमानसेवा Read More »

India Vs Pakistan

जैसलमेर-बाडमेर सीमेवर रेड अलर्ट, पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले

India vs Pakistan : गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढत असलेल्या तणावामुळे पाकिस्तानकडून भारताच्या सीमेलगतच्या शहरांवर ड्रोन हल्ले करण्यात येत आहे तर दुसरीकडे भारत देखील या हल्ल्यांना प्रत्युत्तर देत आहे. तर आता ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या घटनांनंतर जैसलमेर, बारमेर, श्रीगंगानगर आणि हनुमानगडसह अनेक जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून श्रीगंगानगरमध्ये वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे, तर इतर जिल्ह्यांमध्ये रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित होत आहे. बाडमेरच्या उत्तरलाई भागातील स्थानिकांनी सकाळी आकाशातून जळत्या वस्तू पडताना पाहिल्या. प्रत्यक्षदर्शींच्या मते, या वस्तू मोठ्या स्फोटाने जमिनीवर पडल्या आणि त्यांचे तुकडे काही भागात आढळले. लष्कराने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, परिसर सुरक्षित केला आणि तपास सुरू केला. जैसलमेर, बारमेर आणि बिकानेरमध्ये क्षेपणास्त्रे डागली जैसलमेर, बारमेर आणि बिकानेरमध्येही क्षेपणास्त्रासारख्या वस्तू पडल्याचे वृत्त आहे. त्याच वेळी, पाकिस्तानने सलग दुसऱ्या रात्री जैसलमेर आणि बारमेरमधील भारतीय लष्करी तळांना लक्ष्य केले, परंतु भारतीय सैन्याने हवेत हे हल्ले उधळून लावले. एमबीबीएस आणि नर्सिंगच्या परीक्षा रद्द या तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेता, राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे आणि पंचायत राज पोटनिवडणुका पुढे ढकलल्या आहेत. यासोबतच, राजस्थान आरोग्य विज्ञान विद्यापीठाने एमबीबीएस आणि नर्सिंग परीक्षाही पुढील आदेशापर्यंत पुढे ढकलल्या आहेत. राजस्थानमधील 5 विमानतळ 14 मेपर्यंत बंद हवाई क्षेत्राची सुरक्षितता लक्षात घेऊन, बिकानेर, जैसलमेर, जोधपूर, किशनगड आणि उत्तरलाई विमानतळ 14 मे पर्यंत बंद करण्यात आले आहेत. सैन्याच्या सतर्कतेमुळे आणि सतर्कतेमुळे मोठा धोका टळला आहे, परंतु सीमावर्ती भागात भीतीचे वातावरण अजूनही कायम आहे.

जैसलमेर-बाडमेर सीमेवर रेड अलर्ट, पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले Read More »

Virat Kohli

इंग्लंड दौऱ्यापूर्वी भारताला धक्का, रोहित शर्मानंतर विराट कोहलीही करणार कसोटी क्रिकेटला टाटा- बाय?

Virat Kohli: काही दिवसांपूर्वी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तर आता आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली देखील कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा विचार करत आहे. माहितीनुसार, विराट कोहली इंग्लंड दौऱ्यापूर्वी कसोटीमधून निवृत्ती जाहीर करणार आहे. त्याने याबाबत बीसीसीआयला देखील माहिती दिली आहे. भारताचा इंग्लड दौरा 20 जूनपासून सुरू होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. कोहलीने काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयला त्याच्या निर्णयाची माहिती दिली आहे आणि आता इंग्लंड दौऱ्यात खेळण्याची त्याची शक्यता खूप कमी आहे. कोहलीच्या या निर्णयावरून बीसीसीआयमध्ये बराच गोंधळ सुरू आहे. बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या विषयावर विराट कोहलीशी बोलले आहे आणि त्याला त्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. मात्र कोहलीने आपले हेतू स्पष्ट केले आहेत आणि इंग्लंड दौऱ्यापासून स्वतःला दूर ठेवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून अचानक निवृत्ती घेतल्यानंतर, विराट कोहलीनेही या फॉरमॅटमधून निवृत्तीची बातमी भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी धक्कादायक आहे. यापूर्वी, दोन्ही दिग्गज फलंदाजांनी टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, जी भारताच्या विश्वचषक विजयानंतर झाली. जर कोहलीनेही कसोटीतून निवृत्ती घेतली तर भारतीय कसोटी संघाला फलंदाजीच्या क्रमात अनुभवाची मोठी कमतरता भासेल. त्यामुळे यशस्वी जयस्वाल, केएल राहुल आणि शुभमन गिल सारख्या तरुण खेळाडूंवर मोठी जबाबदारी येईल. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कोहली अपयशी ठरला 2024-25 च्या कसोटी मालिकेत कोहलीची कामगिरी निराशाजनक होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेत त्याने फक्त 190 धावा केल्या. पर्थ कसोटीत शानदार शतक केल्यानंतर, उर्वरित चार सामन्यांमध्ये तो फक्त 85 धावा करू शकला. हा दौरा त्याच्यासाठी खूप आव्हानात्मक होता. कोहलीची कसोटी कारकीर्द विराट कोहलीने आतापर्यंत 123 कसोटी सामने खेळले आहेत आणि एकूण 9,230 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याच्या नावावर 30 शतके आहेत.

इंग्लंड दौऱ्यापूर्वी भारताला धक्का, रोहित शर्मानंतर विराट कोहलीही करणार कसोटी क्रिकेटला टाटा- बाय? Read More »

Chaar Dham Yatra

चारधाम यात्रेदरम्यान मोठी दुर्घटना, 5 भाविकांचा मृत्यू

Chaar Dham Yatra : उत्तरकाशी जिल्ह्यातील गंगोत्री धामजवळ खासगी हेलिकॉप्टर कोसळले असल्याची माहिती समोर आली आहे. भागीरथी नदीच्या काठावरील नाग मंदिराखाली हेलिकॉप्टर अचानक खाली पडल्याने हा अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे आणि दोन जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. चारधाम यात्रा 30 एप्रिलपासून सुरू झाली आहे आणि लाखो भाविक उत्तराखंडच्या चार धामकडे जात आहेत. हेलिकॉप्टरमध्ये कोण कोण होते? हेलिकॉप्टरमध्ये एकूण सात जण होते, ज्यात एक पायलट आणि सहा प्रवासी होते. त्या वैमानिकाचे नाव कॅप्टन रॉबिन सिंग असल्याचे सांगितले जात आहे. उर्वरित प्रवाशांची ओळख खालीलप्रमाणे झाली आहे: विनीत गुप्ता अरविंद अग्रवाल विपिन अग्रवाल पिंकी अगरवाल रश्मी किशोर जाधव त्यामध्ये दोन महिलांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. हे सर्व भाविक चारधाम यात्रेसाठी आले होते. अपघाताचे कारण काय? गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंडमध्ये हवामान खराब आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पाऊस, गारपीट आणि गडगडाट होत आहे. हवामान खात्याने अनेक जिल्ह्यांमध्ये आधीच अलर्ट जारी केला होता. या अपघातामागे खराब हवामान हे एक मोठे कारण असू शकते असे मानले जात आहे. बचाव कार्य सुरू अपघाताची माहिती मिळताच पोलिस, लष्कर, आपत्ती व्यवस्थापन क्यूआरटी टीम, रुग्णवाहिका आणि प्रशासन घटनास्थळी पोहोचले. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे. त्याच वेळी, उर्वरित लोकांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी आणि अपघाताची चौकशी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या अपघातामुळे चार धाम यात्रेसाठी आलेल्या यात्रेकरूंना धक्का बसला आहे. जिथे एकीकडे श्रद्धा आणि श्रद्धेने प्रवास सुरू होता, तिथे आता भीती आणि दुःखाचे वातावरण आहे. हवामानाची माहिती घेऊनच प्रवास करण्याचे आणि सुरक्षित मार्गांचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून लोकांना केले जात आहे.

चारधाम यात्रेदरम्यान मोठी दुर्घटना, 5 भाविकांचा मृत्यू Read More »

HPCL Petrol

HPCL च्या सॅप प्रणालीमध्ये तांत्रिक अडचण, इंधन पुरवठा विस्कळीत

HPCL Petrol: हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) या ऑईल कंपनीच्या सॅप प्रणालीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मागील 36 तासांपासून कंपनीचे पेट्रोल व डिझेल पुरवठा यंत्रणा ठप्प झाली आहेत. या अडचणीमुळे इंधन पुरवठा करणाऱ्या HPCL च्या देशभरातील सर्व डेपोमधून पेट्रोल पंप ला पुरवठ्याचे कामकाज ठप्प झालेले असून, परिणामी अनेक पेट्रोल पंपांवरील इंधन पुरवठा विस्कळीत झाला आहे. कंपनीचे तांत्रिक तज्ञ सदर प्रणाली पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर करत असून, त्याचप्रमाणे सदर पुरवठा हा मॅन्युअल मोडमध्ये देखील सुरळित करण्याचे काम सुरू आहे परंतु सर्व प्रणाली संलग्न असल्याने त्यात देखील पाहिजे तशी सुधारणा होत नाहीये. त्यात सुधारणा न झाल्यास सर्व स्थिती सुरळीत होण्यासाठी अंदाजे आणखी 48 तास लागू शकतात. नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी घाबरून जाऊ नये. ही केवळ तांत्रिक अडचण असून, पेट्रोल अथवा डिझेल याची कोणतीही टंचाई नाही. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम यांसारख्या इतर कंपन्यांचे वितरण सुरळीत सुरू असून इंधन सहज उपलब्ध आहे. तरी कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये आणि संयम राखावा इतर पंपावर गर्दी करू नये कोणत्याही प्रकारची इंधन टंचाई झालेली नाही केवळ तांत्रिक प्रणाली सदोष झाल्याने अडचण निर्माण झालेली आहे सर्व परिस्थिती लवकरच सामान्य होईल. अशी माहिती अमित गुप्ता अध्यक्ष फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्रा पेट्रोल डीलर्स असोसिएशन यांनी दिली आहे.

HPCL च्या सॅप प्रणालीमध्ये तांत्रिक अडचण, इंधन पुरवठा विस्कळीत Read More »