DNA मराठी

ट्रेंडिंग

scientific balloon flying from hyderabad

Ahilyanagar News : हैदराबादहून उड्डाणाऱ्या वैज्ञानिक बलूनचा प्रवास अहिल्यानगर जिल्ह्यातही; प्रशासनाने दिली खबरदारीची सूचना

Ahilyanagar News :  हैदराबाद येथील टाटा मूलभूत संशोधन संस्था (TIFR) यांच्यावतीने ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ या कालावधीत वैज्ञानिक संशोधनासाठी हवेतील बलून उड्डाणे करण्यात येणार आहेत. या बलूनपैकी काही बलूनची उपकरणे अहिल्यानगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध भागात पडण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. या उड्डाणांना भारत सरकारच्या परमाणु ऊर्जा विभाग आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) यांचे सहकार्य लाभले आहे. ही बलून उड्डाणे हैदराबाद येथील ईसीआयएल परिसरातून केली जाणार असून, एकूण दहा बलून आकाशात झेपावतील. या बलूनचा व्यास ५० ते ८५ मीटर असून ते हायड्रोजन वायूने भरलेले असतील. उड्डाणे रात्री ८ ते सकाळी ६.३० या वेळेत होतील. या बलूनमध्ये बसवलेली वैज्ञानिक उपकरणे सुमारे ३० ते ४२ किलोमीटर उंचीपर्यंत जातील आणि काही तास संशोधन करून पॅराशूटच्या साहाय्याने जमिनीवर उतरतील. वाऱ्याच्या दिशेनुसार ही उपकरणे २०० ते ३५० किलोमीटर अंतरावर येऊ शकतात. त्यामुळे ती महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यांतील भागांमध्ये उतरू शकतात. महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर , बीड, नांदेड, धाराशिव , परभणी, सांगली, सातारा, अहिल्यानगर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, जळगाव आणि सोलापूर  या जिल्ह्यांमध्ये उपकरणे पडण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने नागरिकांना सूचना दिल्या आहेत. ज्या ठिकाणी ही उपकरणे सापडतील, ती हलवू नयेत, उघडू नयेत किंवा छेडछाड करू नये. त्या पॅकेजवर दिलेल्या पत्त्यावर त्वरित माहिती द्यावी तसेच जवळच्या पोलीस ठाण्याला व प्रशासनाला कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. उपकरणे सुरक्षित असली तरी त्यामध्ये संवेदनशील वैज्ञानिक साधने असल्याने छेडछाड झाल्यास माहिती नष्ट होऊ शकते. संशोधन संस्था अशा उपकरणांची माहिती दिलेल्या नागरिकांना योग्य बक्षीस आणि खर्चाची भरपाई देणार आहे. या प्रयोगांविषयीची माहिती गावपातळीपर्यंत पोहोचविण्याचे निर्देश महाराष्ट्र शासनाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. पहिले बलून उड्डाण ऑक्टोबरच्या चौथ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.

Ahilyanagar News : हैदराबादहून उड्डाणाऱ्या वैज्ञानिक बलूनचा प्रवास अहिल्यानगर जिल्ह्यातही; प्रशासनाने दिली खबरदारीची सूचना Read More »

bacchu kadu

Bachu Kadu : दीपक बोऱ्हाडे यांचा बच्चू कडूंच्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा…

Bachu Kadu : जालन्यातील धनगर आंदोलक दीपक बोऱ्हाडे यांनी बच्चू कडू यांच्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. बळीराजा देशाचा आणि अर्थव्यवस्थेचा कणा आहे असं म्हणत बळीराजावरील हे सर्वात मोठं संकट असल्याचं बोऱ्हाडे यांनी म्हटलय. जालन्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संकटाच्या काळात बळीराजासोबत राहणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असं म्हणत सरकारने बळीराजाच्या संयमाचा अंत पाहू नये, असंही बोऱ्हाडे यांनी म्हटलय. दरम्यान, जालन्यात 1 नोव्हेंबर रोजी राज्यातील सर्व धनगर आंदोलक, धनगर उपोषणकर्ते यांची राज्यव्यापी बैठक आयोजित करण्यात आली आहे, अशी माहितीही बोऱ्हाडे यांनी दिलीय. तसेच राज्यात ज्या दिवशी धनगर समाजाचा मेळावा होईल, त्यादिवशी आम्ही मुंबई जायची तारीख जाहीर करू, असं देखील बोऱ्हाडे यांनी स्पष्ट केलंय.

Bachu Kadu : दीपक बोऱ्हाडे यांचा बच्चू कडूंच्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा… Read More »

Chandrashekhar Bawankule : जागा हडप करणाऱ्या लॉबीला महसूलमंत्र्यांचा दणका

Chandrashekhar Bawankule : माझगाव येथील जीजाभॉय ट्रस्टचा शासकीय भाडेपट्ट्याच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नामंजूर केला. तसेच, ट्रस्ट किंवा विकासकाने चुकीच्या पद्धतीने भरलेली रक्कम परत करावी, असे स्पष्ट निर्देश महसूलमंत्र्यांनी दिले आहेत. या संदर्भात महसूलमंत्र्यांच्या दालनात आज बैठक झाली. आमदार सचिन अहिर, आमदार अमोल मिटकरी आणि दूरदृश्य प्रणालीद्वारे मुंबई शहर जिल्हाधिकारी, आंचल गोयल यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. याबाबत अधिक माहिती अशी, माझगाव महसूल विभागातील भुकर क्रमांक ३६५ (क्षेत्र ७२५.७६ चौ. मी.) व भुकर क्रमांक ३६९ (क्षेत्र ९१५४.१० चौ. मी.) या मिळकतींचा भाडेपट्टा जे. पी. एम. जीजाभॉय ट्रस्ट यांच्याकडे होता. ट्रस्टने नूतनीकरणाची रक्कम भरण्यास विलंब केला होता. त्यानंतर, नूतनीकरणाची रक्कम ऐक्य रिॲलिटी प्रा.लिमिटेड या खासगी कंपनीकडून अनावधानाने शासनखाती भरणा करण्यात आली होती. महसूल विभागाने २४ सप्टेंबर २०२५ च्या अध्यादेशाद्वारे ही रक्कम परत करणे आणि भाडेपट्टा नूतनीकरण करण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार ही रक्कम परत करण्याची कार्यवाही सुरु आहे. आमदार सचिन अहिर यांनी या मिळकती तातडीने शासनाच्या ताब्यात घेऊन त्यांचा लिलाव करावा आणि त्यानंतर विकसित करण्याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. काही व्यापारी ट्रस्टच्या आडून शासकीय जागा हडपण्याचा प्रयत्न करत आहेत, ज्याला तातडीने मज्जाव झाला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. याबाबत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या जमीनीचा भाडेपट्टा नुतनीकरण करु नये, तसेच भरलेली रक्कम तात्काळ परत करावी. तसेच जर ट्रस्टने नवीन अर्ज केल्यास शासन त्याबाबत पुन्हा बैठक घेऊन निर्णय घेईल असे स्पष्ट केले.

Chandrashekhar Bawankule : जागा हडप करणाऱ्या लॉबीला महसूलमंत्र्यांचा दणका Read More »

maharashtra government

Ahilyanagar News : अनेकांना दिलासा, भूसंपादन दाखला आता मोबाईलवर; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Ahilyanagar News : ‘लोकाभिमुख, पारदर्शक व गतीमान प्रशासन’ या संकल्पनेला मूर्त रूप देत जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर येथील भूसंपादन शाखेत दाखला देण्याची प्रक्रिया आता पूर्णपणे संगणकीकृत करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या १५० दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा मोहिमेच्या अंतर्गत सुरू झालेल्या या डिजिटल प्रणालीमुळे नागरिकांना दाखल्याची प्रत थेट त्यांच्या मोबाईलवर व्हॉट्सअ‍ॅपद्वारे मिळणार आहे. संगणक प्रणालीची वैशिष्ट्ये • अर्जदाराकडून दाखला अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्याची नोंद संगणक प्रणाली मध्ये ‘ई – ऑफिस’ द्वारे करण्यात येईल. • संबंधित माहिती व पडताळणी पूर्ण झाल्यावर त्रुटि असल्यास तसे व्हॉट्स ॲपद्वारे संबधित अर्जदार यांना कळेल, त्रुटी नसल्यास दाखल्याची डिजिटल प्रत तयार होईल. • तयार झालेला दाखला अर्जदाराच्या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सॲपद्वारे पाठविण्यात येईल. • प्रणालीमुळे कागदी कामकाजात घट येऊन वेळेची व मानवी श्रमांची बचत होईल. • नागरिकांना अर्जाची सद्यस्थिति जाणून घेणे व प्रमाणपत्र प्राप्त करणे यास्तव कार्यालयात यावे लागते. अहिल्यानगर जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती विचारात घेता  प्रवासाचे अंतर व नागरिकांच्या वेळेची बचत होऊन सेवा वितरणात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढेल. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया म्हणाले, “राज्य शासनाच्या प्रशासकीय सुधारणा मोहिमेत जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगरने या नव्या डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून एक अभिनव पाऊल उचलले आहे. नागरिकांना दाखले जलद, पारदर्शक आणि डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देणे हे ‘ई-गव्हर्नन्स’च्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. या प्रणालीचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना थेट घरबसल्या मिळणार आहे. यापुढे ई प्रणालीचा वापर करून विविध शासन सेवा सुलभतेने उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे” भूसंपादन अधिकारी (क्र. १) अतुल चोरमारे म्हणाले, “भूसंपादन शाखेत दाखला वितरण प्रक्रिया नागरिकांसाठी सर्वाधिक मागणीची सेवा आहे. या प्रक्रियेला डिजिटल स्वरूप दिल्यामुळे पारदर्शकता, गती आणि जबाबदारीत मोठी वाढ झाली आहे. आता अर्जदारांना कार्यालयात (अर्ज करण्या व्यतिरिक्त) येण्याची आवश्यकता राहणार नाही . दाखला तयार झाल्यानंतर तो काही क्षणांतच त्यांच्या मोबाईलवर व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पोहचेल. या प्रणालीमुळे व ई ऑफिसमुळे  दाखला देण्याची संपूर्ण प्रक्रिया ‘पेपरलेस’ आणि ‘मुदतीत निपटारा करणारी’ झाली आहे. नागरिकांचा वेळ, खर्च व श्रम यांची मोठी बचत होणार आहे. हा उपक्रम शासनाच्या “स्मार्ट गव्हर्नन्स – लोकाभिमुख प्रशासन” या संकल्पनेला प्रत्यक्ष रूप देणारा ठरेल. दाखला मिळवणे झाले सोपे आणि जलद कुंभारवाडी (ता. पारनेर) येथील सुनील कारभारी ठाणगे म्हणाले,“पूर्वी भूसंपादन दाखल्यासाठी दोन – तीन वेळा कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत होत्या. आता मोबाईलवरच दाखल्याची प्रत मिळते, हे खरंच आश्चर्यकारक आहे. वेळ, प्रवास व खर्च या तिन्हींची बचत झाली. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी ही मोठी सोय ठरली आहे. शासनाने उपलब्ध करून दिलेली ही प्रणाली आमच्यासाठी खरी डिजिटल क्रांती आहे.” भविष्यातील योजना या प्रणालीच्या पुढील टप्प्यात दाखल्याबरोबर भूसंपादन प्रकरणांची स्थिती ट्रॅकिंग, निर्णय पत्र डाउनलोड सुविधा व ऑनलाइन चौकशी नोंदणी  सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Ahilyanagar News : अनेकांना दिलासा, भूसंपादन दाखला आता मोबाईलवर; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया Read More »

devendra fadnavis

Devendra Fadnavis: अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण:  मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

Devendra Fadnavis : राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी जवळपास 32 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. यात आतापर्यंत 8 हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय वितरित करण्यात आले असून, याचा लाभ 40 लाख शेतकर्‍यांना होतो आहे. आणखी 11 हजार कोटी रुपये वितरित करण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीत विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ही मदत पुढच्या 15 दिवसांत शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री  फडणवीस माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. मुख्यमंत्री  फडणवीस म्हणाले, अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. त्यांना सर्वतोपरी मदत केली जात आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत आणखी 11 हजार कोटी रुपये वितरीत करण्यास मान्यता देण्यात आल्याने मदतीसाठी निधीची कुठलीही कमतरता नाही. पुढील 15 दिवसांत ही मदत अतिवृष्टग्रस्त जिल्ह्यातील किमान 90 टक्के शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यापूर्वी जशा याद्या मिळाल्या, तसा निधी वितरित करण्यात आला. ज्यांना केवळ दोन हेक्टरसाठी मदत मिळाली आहे, त्यांना पुढील हेक्टरसाठीचे अर्थसहाय्य दिले जाणार असल्याचे मुख्यमंत्री  फडणवीस यांनी सांगितले. पुढे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, काही शेतकर्‍यांच्या बँक खात्यामध्ये तांत्रिक अडचणी आहेत, तर काहींच्या नोंदींमध्ये त्रुटी आहेत. काही ठिकाणी एकापेक्षा जास्त खाती असल्याचे दिसून आले. या सर्व बाबी तपासून उर्वरित 10 टक्के शेतकर्‍यांपर्यंतही तातडीने मदत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कुणीही पात्र शेतकरी मदतपासून वंचित राहू नये व अपात्र खातेधारकांच्या खात्यावर निधी जावू नये, यासाठी ई-केवायसी केली जात आहे. अ‍ॅग्रीस्टॅकचा डेटा राज्य शासनाकडे असून यामध्ये ज्या शेतकर्‍यांची माहिती उपलब्ध आहे. त्यांची पुन्हा ई-केवायसी केली जात नसून सहायता निधी थेट त्यांच्या खात्यात जमा केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले. शेतमालाच्या विक्रीसाठी नोंदणी करा: मुख्यमंत्री  फडणवीस शेतमालाच्या खरेदीसाठी राज्यात नोंदणी सुरू केली जात असून यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. अशा नोंदणीमुळे पारदर्शकता आली असून आता शेतकर्‍यांना हमी भाव मिळत आहे. यापूर्वी व्यापारी शेतकर्‍यांकडून कमी दराने माल घेवून शासनाला जास्त दराने विकला जात असे. नोंदणी करून शासकीय खरेदी केंद्रावर किंवा शासनाने जाहीर केलेला हमी भावाप्रमाणे खरेदी करणार्‍या व्यापार्‍यांनाच मालाची विक्री करण्याचे आवाहनही मुख्यमंत्री  फडणवीस यांनी केले आहे.

Devendra Fadnavis: अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण:  मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा Read More »

farmers

Farmers Relief Fund : साडेआठ लाख शेतकऱ्यांना भरपाई; अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय

Farmers Relief Fund : संपूर्ण राज्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नगर जिल्ह्यातील पाथर्डी, शेवगावसह जामखेड तालुक्यात अतिवृष्टीमुळे हजारो घरांची पडझड झाली होती. तर आता नगर जिल्ह्यातील साडेआठ लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षीच्या अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात शेती, पशुधन आणि घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून जिल्ह्यातील ८ लाख ४९ हजार ७१६ शेतकऱ्यांना एकूण ₹८८०२३.६६ लाख रुपये (म्हणजेच सुमारे ₹८८०.२३ कोटी) भरपाई मंजूर करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया दिली. तसेच बँकांनी ही भरपाई रक्कम कर्ज किंवा अन्य खात्यात हस्तांतरित करू नये अन्यथा आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार असा इशारा देखील जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी बँकांना दिला आहे. ५.७६ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून १४ तालुक्यांतील १,३११ गावांवर अतिवृष्टीचा फटका बसला असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिली. शेतकऱ्यांच्या पाठीशी प्रशासन ठामपणे उभं आहे. भरपाई वाटप प्रक्रियेत कोणताही अडथळा येऊ देणार नाही असं देखील यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी म्हटले आहे. जिल्ह्यात घरांची पडझड (१ एप्रिल ते ३० सप्टेंबर): एकूण – ५,६९७ घरे 🔹 पाथर्डी – १,०२० 🔹 शेवगाव – ९२१ 🔹 जामखेड – ९०६ 🔹 नगर – ५२२ 🔹 नेवासा – ५६५ 🔹 राहुरी – ३९६ 🔹 संगमनेर – २२७ 🔹 राहाता – २०३ (इतर तालुके : अकोले, कर्जत, कोपरगाव, पारनेर, श्रीगोंदे, श्रीरामपूर) जनावरे व कुक्कुटधन हानी : 🔸 १,०५९ जनावरे दगावली 🔸 १३,८७९ कोंबड्या मृत 🔸 आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू

Farmers Relief Fund : साडेआठ लाख शेतकऱ्यांना भरपाई; अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय Read More »

doctor

Ahilyanagar News : कोरोना काळातील धक्कादायक प्रकरण! पाच नामांकित डॉक्टर आणि हॉस्पिटलवर गुन्हा दाखल

Ahilyanagar News : कोरोना काळात रुग्णाच्या मर्जीविरुद्ध उपचार करून घेतल्याचा, अवाजवी बिल आकारल्याचा आणि मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावल्याचा स्फोटक आरोप शहरातील पाच नामांकित डॉक्टरांसह डॉ. विखे पाटील मेमोरिअल हॉस्पिटलच्या पॅथॉलॉजिकल लॅबमधील तज्ञ डॉक्टरांवर करण्यात आला आहे. या प्रकरणात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. फिर्यादी अशोक खोकराळे यांच्या तक्रारीनुसार, ऑगस्ट २०२० मध्ये त्यांच्या वडिलांना कोरोनाची लक्षणं दिसल्याने त्यांना न्यूक्लिअस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र रुग्णाच्या संमतीशिवाय जबरदस्तीने अॅडमिट करण्यात आलं, आरोग्यस्थितीची खरी माहिती लपवण्यात आली, आणि जाणूनबुजून जास्त प्रमाणात औषधं देण्यात आली, असा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय रुग्णालयाकडून अवाजवी बिल आकारण्यात आलं, असा दावाही फिर्यादीत करण्यात आला आहे. परंतु सगळ्यात धक्कादायक आरोप म्हणजे, रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांना माहिती न देता मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावण्यात आली, आणि पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणात डॉ. गोपाळ बहुरुपी, डॉ. सुधीर बोरकर, डॉ. मुकुंद तांदळे, डॉ. अक्षयदीप झावरे पाटील, डॉ. सचिन पांडुळे, तसेच डॉ. विखे पाटील मेमोरिअल हॉस्पिटलच्या पॅथॉलॉजिकल लॅबमधील तज्ञ डॉक्टर आणि काही अज्ञात कर्मचारी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हा गुन्हा न्यायालयाच्या आदेशानंतर तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून, भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. “कोरोना काळात आमच्या वडिलांचा मृत्यू झाला, पण हॉस्पिटल प्रशासनाने आम्हाला याबाबत काहीच माहिती दिली नाही. आम्ही वारंवार संपर्क साधला तरी प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी आम्हाला न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागला.” संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास तोफखाना पोलीस करत असून, वैद्यकीय व्यवसायातील नैतिकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. या प्रकरणामुळे रुग्णांमध्ये भीती आणि अविश्वासाचं वातावरण निर्माण झालं असून, नागरिकांकडून आरोग्य व्यवस्थेतील पारदर्शकतेची मागणी होत आहे.

Ahilyanagar News : कोरोना काळातील धक्कादायक प्रकरण! पाच नामांकित डॉक्टर आणि हॉस्पिटलवर गुन्हा दाखल Read More »

Chandshaili Ghat Accident : चांदशैली घाटात भीषण अपघात; 6 जणांचा मृत्यू 15 गंभीर जखमी

Chandshaili Ghat Accident : नंदुरबार जिल्ह्यातील चांदशैली घाटात आज सकाळी एक भीषण अपघात झाला आहे. भगवान अस्तंबा ऋषी यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांची पीकअप जीप खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत 6 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 15 ते 20 जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तात्काळ तळोदा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले आहे. दिवाळीच्या दिवशी यात्रेला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला पडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Chandshaili Ghat Accident : चांदशैली घाटात भीषण अपघात; 6 जणांचा मृत्यू 15 गंभीर जखमी Read More »

devendra fadnavis

Maharashtra News: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 846 कोटी 96 लाख रुपयांची मदत; दिवाळीपूर्वी खात्यात निधी वर्ग

Maharashtra News : सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर शासनाने ८ लाख २७ हजार ११८ शेतकऱ्यांना एकूण ८४६ कोटी ९६ लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचा निर्णय घेतला आहे. दिवाळीपूर्वी ही मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील विविध भागांतील शेतीपिकांचे नुकसान झाले असून, जिल्ह्यात सुमारे ६ लाख हेक्टर क्षेत्रावर या नैसर्गिक आपत्तीचा परिणाम झाला होता. या अनुषंगाने महसूल आणि कृषी विभागांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीची आकडेवारी व मदतीचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला होता. राज्यातील सर्व बाधित जिल्ह्यांतील परिस्थितीचा आढावा घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत एकूण ३ हजार २५८ कोटी ५६ लाख रुपयांच्या मदतीचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार अहिल्यानगर जिल्ह्यास ८४६ कोटी ९६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, या निधीचा लाभ जिल्ह्यातील ८ लाख २७ हजार ११८ शेतकऱ्यांना मिळणार आहे, असे डॉ. विखे पाटील यांनी सांगितले. मदतीचा निधी वितरित करताना शासनाच्या नियम व निकषांचे काटेकोर पालन करण्याच्या, नैसर्गिक आपत्ती संदर्भातील अटी व शर्तींची पूर्तता करण्याच्या तसेच लाभार्थ्यांची यादी आणि मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.

Maharashtra News: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 846 कोटी 96 लाख रुपयांची मदत; दिवाळीपूर्वी खात्यात निधी वर्ग Read More »

fb img 1760715802412

Shivajirao Kardile : आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Shivajirao Kardile : राहुरीचे आमदार स्वर्गीय शिवाजीराव भानुदास कर्डिले यांच्या पार्थिवावर बुऱ्हाणनगर येथील त्यांच्या निवासस्थाना समोरील प्रांगणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे व जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे यांनी त्यांच्या पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. पोलीसांच्या पथकाने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना मानवंदना दिली. त्यांच्या पार्थिवास मुलगा अक्षय यांनी मुखाग्नी दिला‌. सात्वंनपर भावना व्यक्त करतांना सभापती प्रा.राम शिंदे म्हणाले, दिन- दलित, शोषीत, गरीब , कष्टकऱ्यांच्या पाठिशी ते नेहमीच ठामपणे उभे राहिले. सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांनी उत्तुंग असे काम केले. सर्वसामान्यांच्या मनात त्यांच्याविषयी अपार , प्रेम व स्नेह होता. त्यांच्या अकाली निधनाने संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, शिवाजीराव कर्डिले हे जनसामान्यांशी नाळ जोडलेले, तळागाळातील घटकांच्या विकासासाठी झटणारे नेतृत्व” होते. त्यांचा पिंड समाजकारण व राजकारणाचा होता. ते नेहमीच लोकांमध्ये वावरले. त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यातून त्यांना सावरण्याचे बळ मिळो, ही प्रभू चरणी प्रार्थना करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात जिल्हावासिय‌ सहभागी आहेत. यावेळी त्यांच्या पार्थिवाचे पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार संग्राम जगताप, आमदार काशिनाथ दाते, आमदार विठ्ठल लंघे,आमदार अमोल खताळ,आमदार मोनिका राजळे, आमदार विक्रमसिंह पाचपुते, आमदार सुरेश धस, आमदार शरद सोनवणे, आमदार राहुल कुल, माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली वाहिली. जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार संजय शिंदे यांनी अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली वाहिली. याप्रसंगी जंगले महाराज, आदिनाथ महाराज व बाळासाहेब थोरात यांनी सांत्वनपर भावना व्यक्त केल्या. त्यांच्या अंत्यसंस्कारास राजकीय, सामाजिक, उद्योग, कला, साहित्य, सांस्कृतिक आदी क्षेत्रातील कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांनी सार्वजनिक जीवनात दीर्घकाळ सक्रिय भूमिका बजावली. त्यांनी सहा वेळा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून काम पाहिले. जुलै २००२ ते जुलै २००४ या काळात ते मत्स्यव्यवसाय व बंदरे विभागाचे राज्यमंत्री होते, तर जुलै २००४ ते ऑक्टोबर २००४ या काळात त्यांनी जलसंधारण, वने, महिला व बालविकास, भूकंप, पुनर्वसन आणि मदतकार्य या विभागांचे राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. २००४ मध्ये ते अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री होते. तसेच, त्यांनी सहकार क्षेत्रातही उल्लेखनीय योगदान दिले असून २००७ पासून अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक आणि २००८-०९ तसेच मार्च २०२३ पासून चेअरमन म्हणून त्यांनी कार्य केले. राज्य शासकीय समित्यांमध्ये त्यांनी रोहयो, पंचायतराज व सार्वजनिक उपक्रम समितीचे सदस्य म्हणूनही काम पाहिले. त्यांच्या सार्वजनिक कारकिर्दीची सुरुवात ग्रामपंचायत बु-हाणनगरच्या सरपंचपदापासून झाली, जिथे ते १९८४ ते १९९६ या काळात कार्यरत होते.

Shivajirao Kardile : आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार Read More »