DNA मराठी

ट्रेंडिंग

auto

Ahilyanagar News : ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालकांनी योजनांच्या लाभासाठी सभासद नोंदणी करा

Ahilyanagar News : राज्यातील ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालकांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा, या उद्देशाने शासनाने ‘धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ’ स्थापन केले आहे. महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी चालकांनी सभासद म्हणून ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सिद्धार्थ ठोके यांनी केले आहे. मंडळामार्फत चालकांना जीवनविमा व अपंगत्व विमा योजना, आरोग्यविषयक सुविधा, कर्तव्यावर असताना झालेल्या दुखापतीसाठी ५० हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य, पाल्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना, तसेच कामगार कौशल्यवृद्धीसाठी विशेष प्रशिक्षण योजना आदी विविध लाभ उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छुक आणि पात्र चालकांनी सर्वप्रथम मंडळाचे सभासदत्व घेणे आवश्यक आहे. सभासद नोंदणीसाठी अर्ज https://ananddighekalyankarimandal.org या संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करावा. नोंदणी करताना वाहनाचा नोंदणी क्रमांक, परवाना, अनुज्ञप्ती, रेशनकार्ड, आधार आणि पॅन क्रमांक, तसेच कुटुंबातील सदस्यांची माहिती नमूद करून आवश्यक कागदपत्रांचे फोटो अपलोड करावेत. सादर केलेला अर्ज संबंधित प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवला जाईल. कार्यालयाकडून पडताळणी केल्यानंतर सर्व अटींची पूर्तता झाल्यास अर्ज मंजूर केला जाईल. अर्जात त्रुटी असल्यास संबंधित परिवहन कार्यालयाशी संपर्क साधावा. अर्ज मंजूर झाल्यानंतर अर्जदाराला मोबाईलवर सभासद नोंदणी शुल्क भरण्याबाबत संदेश प्राप्त होईल. शुल्क भरण्यापूर्वी https://ananddighekalyankarimandal.org/home/checkstatus या लिंकवर आपली नोंदणी स्थिती तपासूनच पुढील प्रक्रिया करावी. सभासद नोंदणी शुल्क ₹५०० आणि वार्षिक सभासद शुल्क ₹३०० अशी एकूण ₹८०० रक्कम भरल्यानंतर नोंदणी प्रक्रिया पूर्ण मानली जाईल. त्यानंतर “अभिनंदन! आपण सभासद झाले आहात” असा संदेश अर्जदाराला प्राप्त होईल. नोंदणीची पावती डाउनलोड करून सुरक्षित ठेवावी, असेही कळविण्यात आले आहे.

Ahilyanagar News : ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालकांनी योजनांच्या लाभासाठी सभासद नोंदणी करा Read More »

maharashtra government

Maharashtra Cabinet Decisions: राज्य सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ जिल्हा बँकांना मिळणार 827 कोटींचे भागभांडवल

Maharashtra Cabinet Decisions: नाशिक, नागपूर आणि धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँकांना भागभांडवल म्हणून 827 कोटी रुपये देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. यात नाशिक जिल्हा बँकेला 672 कोटी, नागपूर जिल्हा बँकेला 81 आणि धाराशिव जिल्हा बँकेला 74 कोटी रुपये देण्यात येणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने नाशिक, नागपूर आणि धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँकांचे पुनर्भांडवलीकरण व पुनरूज्जीवन करण्याबाबत शासनास कळवले आहे. त्यानुसार आज या तीनही बँकांना भागभांडवल म्हणून अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले. शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेची भूमिका महत्त्वाची असते. जिल्हा बँकेच्या आर्थिक स्थितीवरच सेवाविकास संस्थांचेही अस्तित्व असते. त्यामुळे नाशिक, नागपूर आणि धाराशिव जिल्हा बँक यांना एकूण 827 कोटी रुपये भागभांडवल स्वरूपात शासकीय अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले. नाशिक जिल्हा बँकेस यंदाच्या आर्थिक वर्षात 336 कोटी आणि पुढील आर्थिक वर्षात 336 कोटी वितरित करण्यासही मान्यता देण्यात आली. नाशिक आणि नागपूर जिल्हा बँकांवर सध्या प्रशासक कार्यरत आहेत. धाराशिव जिल्हा बँकेवर संचालक मंडळ आहे. मात्र धाराशिव जिल्हा बँकेची स्थिती सातत्याने खालावत असल्याने या बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नियुक्त करण्यासाठी सहकार आयुक्तांना निर्देश देण्यासही मान्यता देण्यात आली.

Maharashtra Cabinet Decisions: राज्य सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ जिल्हा बँकांना मिळणार 827 कोटींचे भागभांडवल Read More »

ahilyanagar

Ahilyanagar Politics: अहिल्यानगर महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर; जाणून घ्या तुमच्या प्रभागाची स्थिती

Ahilyanagar Politics: अहिल्यानगर महापालिकेची प्रभाग निहाय आरक्षण सोडत आज (ता. ११) सकाळी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत काढण्यात आली. त्यामुळे आता महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांची तयारी सुरू झाली आहे. या आरक्षणामुळे प्रभागाची राजकीय स्थिती आता स्पष्ट होऊ लागली आहे. या आरक्षण सोडतीमुळे काही इच्छुकांच्या पदरी निराशा हाती लागली आहे. इच्छुकांनीही संबंधित पक्ष श्रेष्ठींकडे आपली निवडणूक लढविण्याची तयारी दर्शवली आहे. प्रभाग १ अ – अनुसूचित जाती ब – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला क – सर्वसाधारण महिला ड – सर्वसाधारण ——————— प्रभाग २ अ – अनुसूचित जाती महिला ब – नागरिकांचा मागास प्रवर्ग क – सर्वसाधारण महिला ड – सर्वसाधारण ———————– प्रभाग ३ अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग ब – सर्वसाधारण महिला क – सर्वसाधारण महिला ड – सर्वसाधारण ———————- प्रभाग ४ अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ब – नागरिकांचा मागास प्रवर्ग क – सर्वसाधारण महिला ड – सर्वसाधारण ———————– प्रभाग ५ अ – अनुसूचित जाती महिला ब – नागरिकांचा मागास प्रवर्ग क – सर्वसाधारण महिला ड – सर्वसाधारण ————————- प्रभाग ६ अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग ब – सर्वसाधारण महिला क – सर्वसाधारण महिला ड – सर्वसाधारण ————————- प्रभाग ७ अ – अनुसूचित जमाती ब – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला क – सर्वसाधारण महिला ड – सर्वसाधारण ———————— प्रभाग ८ अ – अनुसूचित जाती महिला ब – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला क – सर्वसाधारण ड – सर्वसाधारण ———————— प्रभाग ९ अ – अनुसूचित जाती ब – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला क – सर्वसाधारण महिला ड – सर्वसाधारण ————————- प्रभाग १० अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग ब – सर्वसाधारण महिला क – सर्वसाधारण महिला ड – सर्वसाधारण ————————- प्रभाग ११ अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग ब – सर्वसाधारण महिला क – सर्वसाधारण महिला ड – सर्वसाधारण ————————- प्रभाग १२ अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ब – सर्वसाधारण महिला क – सर्वसाधारण ड – सर्वसाधारण ————————- प्रभाग १३ अ – अनुसूचित जाती ब – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला क – सर्वसाधारण महिला ड – सर्वसाधारण ———————— प्रभाग १४ अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग ब – सर्वसाधारण महिला क – सर्वसाधारण महिला ड – सर्वसाधारण ———————– प्रभाग १५ अ – अनुसूचित जाती महिला ब – नागरिकांचा मागास प्रवर्ग क – सर्वसाधारण महिला ड – सर्वसाधारण ———————– प्रभाग १६ अ – अनुसूचित जाती महिला ब – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला क – सर्वसाधारण ड – सर्वसाधारण ———————— प्रभाग १७ अ – अनुसूचित जाती ब – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला क – सर्वसाधारण महिला ड – सर्वसाधारण

Ahilyanagar Politics: अहिल्यानगर महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर; जाणून घ्या तुमच्या प्रभागाची स्थिती Read More »

maharashtra local body election

Maharashtra Local Body Election: निवडणुकीची रणधुमाळी, स्थानिक आघाड्यांचे वर्चस्व वाढणार?

Maharashtra Local Body Election 2025 : राज्यात पुन्हा एकदा राजकीय तापमान चढले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. २४६ नगरपरिषद आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यास आज (१० नोव्हेंबर) पासून सुरुवात झाली आहे. निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर करताच राज्यभरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. सर्वच पक्षांकडून उमेदवारांच्या मुलाखती सुरू असून अनेक ठिकाणी गटबाजी, नाराजी आणि स्थानिक आघाड्यांची चाचपणी सुरू झाली आहे. महायुती व महाविकास आघाडीमध्ये राज्यस्तरावरील चर्चेचा निष्कर्ष अद्याप निघालेला नसल्याने, अनेक ठिकाणी पक्षीय चिन्हाऐवजी स्थानिक आघाड्यांच्या जोरावर निवडणूक लढवली जाण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत २८८ अध्यक्ष आणि ६,८५९ सदस्य निवडले जाणार असून २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान आणि ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आठ दिवसांची मुदत देण्यात आली असून १७ नोव्हेंबर हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस, १८ नोव्हेंबरला अर्जांची छाननी आणि २१ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. यंदा उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरून त्याची प्रिंट निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करावी लागणार आहे. राज्यातील २४७ नगरपरिषदांपैकी ३३ पदे अनुसूचित जातींसाठी, ११ पदे अनुसूचित जमातींसाठी, ६७ पदे मागास प्रवर्गासाठी, तर १३६ पदे खुल्या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. पुणे जिल्ह्यात ६.३४ लाख मतदार, १७ स्थानिक संस्था रणांगणातपुणे जिल्ह्यातील १४ नगरपरिषदा आणि ३ नगरपंचायतींसाठी निवडणूक जाहीर झाली असून, आचारसंहिता लागू झाली आहे. १ जुलै २०२५ च्या मतदार यादीप्रमाणे जिल्ह्यात एकूण ६,३४,९४० मतदार आहेत. बारामती ही ‘अ’ वर्गातील नगरपरिषद असून, लोणावळा, दौंड, चाकण, तळेगाव दाभाडे आणि फुरसुंगी-उरळी देवाची या नगरपरिषदा ‘ब’ वर्गात येतात. सासवड, जेजुरी, इंदापूर, शिरूर, जुन्नर, आळंदी, भोर आणि राजगुरूनगर या ‘क’ वर्गातील नगरपरिषदा आहेत. मंचर, वडगाव मावळ आणि माळेगाव बुद्रुक या नगरपंचायतींसाठीही आचारसंहिता लागू झाली असून या नगरपंचायतींसाठी पहिल्यांदाच निवडणूक होणार आहे. विशेष म्हणजे, फुरसुंगी-उरळी देवाची नगरपरिषदेत प्रथमच निवडणूक होत आहे. ही निवडणूक द्विसदस्यीय पद्धतीने होणार असून एकूण १६ प्रभागांतून ३२ नगरसेवकांची निवड केली जाणार आहे. अध्यक्षपदासाठी थेट मतदान होणार असल्याने या नगरपरिषदेकडे राज्याचे लक्ष लागले आहे. राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या या निवडणुकीमुळे पुन्हा एकदा स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे ढवळून निघणार आहेत. कोण जिंकणार स्थानिक सत्तेची लढाई, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

Maharashtra Local Body Election: निवडणुकीची रणधुमाळी, स्थानिक आघाड्यांचे वर्चस्व वाढणार? Read More »

shankarrao gadakh

Shankarrao Gadakh : नगर जिल्ह्यात ठाकरेंना धक्का, गडाखांचा मोठा निर्णय; ‘या’ पक्षाकडून लढवणार निवडणूक

Shankarrao Gadakh : शिवसेनेचे (ठाकरे गट) माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी नेवासा नगरपंचायतची निवडणूक पक्षाचे मशाल चिन्हाऐवजी क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. माजी मंत्री गडाख यांच्या या निर्णयानंतर राज्यातील राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. गडाख आता शिवसेना सोडण्याची तयारी करत असल्याची देखील चर्चा सध्या राजकीय वर्तुळात वर्तवली आहे. तर दुसरीकडे गडाख यांनी यापूर्वी सन 2017 मध्ये अपक्ष असताना क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांचे सर्वाधिक नगरसेवक विजयी झाले होते. विधानसभेत विजयी झाल्यानंतर अपक्ष असलेले आमदार शंकरराव गडाख यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला व मंत्रिपद मिळवले होते. मात्र, आता त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून उतरण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

Shankarrao Gadakh : नगर जिल्ह्यात ठाकरेंना धक्का, गडाखांचा मोठा निर्णय; ‘या’ पक्षाकडून लढवणार निवडणूक Read More »

prakash ambedkar

प्रकाश आंबेडकर यांनी घेतली डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट; केली मोठी मागणी

Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर सातारा जिल्ह्यातील फलटण डॉक्टर तरुणी आत्महत्या प्रकरणात बीडच्या वडवणीतील कवडगाव येथे कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणात चौकशीसाठी एसआयटीची मागणी शासनाकडे केली आणि ती मागणी पूर्ण झाली. दोन दिवसांपूर्वी एसआयटीचे प्रमुख इथे कुटुंबाला भेटून गेले. आलेल्या बातम्यांवरून कळतंय डॉक्टरांना प्रेशराईज केलं जातं होते. वर्षभरात जेवढे पोस्टमार्टम महिला डॉक्टरच्या देखरेखीखाली झाली त्याची चौकशी एसआयटीने करावी. त्या केसमध्ये प्रेशराईज टाकलं जात होतं का नाही हे तपासणं गरजेचं आहे. प्रेशर कोण टाकत होतं? डॉक्टर मंडळी टाकत होती की राजकीय क्षेत्रातील की सामाजिक क्षेत्रातील मंडळी होती? त्यांचे फोन कॉल तपासले पाहिजेत त्यातून या आत्महत्याच खरं कारण कळेल. मुख्यमंत्री जे स्टेटमेंट करतात ते पोलिसांकडून माहिती घेऊनच करतात जे चुकीची माहिती मुख्यमंत्र्याला देतात त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. सूर्यवंशी प्रकरणात देखील पोलिसांनी मुख्यमंत्र्यांला चुकीची माहिती दिली आणि ती सभागृहात त्यांनी मांडली. कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरीत घ्या. जे कोणी आरोपी असतील राजकीय क्षेत्रातले असो किंवा इतर क्षेत्रातील असो त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी त्यांनी केली.

प्रकाश आंबेडकर यांनी घेतली डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट; केली मोठी मागणी Read More »

parth pawar

Parth Pawar Land Case : मुख्यमंत्री ॲक्शन मोडमध्ये; महिनाभरात मुंढवा जमीन प्रकरणी चौकशी अहवाल सादर होणार

Parth Pawar Land Case : पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणात अनियमिततेतील आरोपांची चौकशी करण्यासाठी महसूल, मुद्रांक व नोंदणी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची चौकशी समिती सरकारने स्थापन केली. यासंदर्भातील शासन आदेश जारी झाला असून, समितीला एक महिन्यात अहवाल द्यायचा आहे. पुणे शहरातील मुंढवा येथील सर्वे नंबर 88 मधील जमिनीच्या दस्ताच्या खरेदी-विक्री व्यवहार अनियमितता झाल्याचा प्रकार विविध प्रसिद्धी माध्यमांद्वारे समोर आला आहे. या प्रकरणाची सविस्तर चौकशी होणे आवश्यक असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूलमंत्री चंंद्रशेखर बावनकुळे यांनी समिती स्थापन केली. महसूल, मुद्रांक व नोंदणी विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखालील समितीत पुणे विभागीय आयुक्त, जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, पुणे जिल्हाधिकारी व मुद्रांक विभागाचे सहसचिव असे पाच सदस्य आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, चौकशी समितीला प्रस्तुत प्रकरणात नेमकी अनियमितता झाली आहे किंवा नाही, याबाबत सखोल चौकशी करणे, अनियमितता झाल्याचे आढळल्यास, त्यासाठी जबाबदार असलेल्या संबंधितांवर जबाबदारी निश्चित करणे आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस शासनाकडे करणे, अनियमितता सिद्ध झाल्यास, सदर जमीन तिच्या मूळ स्थितीवर (पूर्वःस्थितीवर) आणण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना सुचविणे, तसेच भविष्यात अशा प्रकारची प्रकरणे पुन्हा घडू नयेत, यासाठी ठोस उपाययोजना सुचविण्यास सांगण्यात आले आहे.

Parth Pawar Land Case : मुख्यमंत्री ॲक्शन मोडमध्ये; महिनाभरात मुंढवा जमीन प्रकरणी चौकशी अहवाल सादर होणार Read More »

leopard

Ahilyanagar News : जिल्ह्यात विविध भागांत बिबट्याचा वावर…प्रशासनाकडून नागरिकांना महत्त्वाची सुचना

Ahilyanagar News : जिल्ह्याच्या विविध भागांत बिबट्याचा वावर असून सध्या ऊसतोडीचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे ऊसतोडीच्या वेळी शेतकरी व मजुरांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांनी केले आहे. ऊसतोड सुरू असताना शेतकरी आणि मजुरांनी आपल्या लहान मुलांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे. अनेकदा मुलांना ऊसतोड सुरू असलेल्या भागातच खेळायला सोडले जाते. अशा वेळी मुलांना ठेवलेल्या ठिकाणी हातात घुंगराची काठी घेऊन एखाद्या मोठ्या व्यक्तीस थांबवावे, जेणेकरून बिबट्या दिसल्यास मुलांची सुरक्षा करता येईल. फार वाकून ऊसतोड करू नये; कारण अशा वेळी दुसरा एखादा प्राणी आहे असे समजून बिबट्याचा पाठमोरा हल्ला होऊ शकतो. ऊसतोड सुरू असताना ट्रॅक्टरवरील टेपरेकॉर्डर किंवा वायरलेस ब्लूटूथ स्पीकरद्वारे मोठ्या आवाजात गाणी लावावीत. यामुळे बिबट्या जवळ येण्याची शक्यता कमी होते. ऊसतोड किंवा शेतीची कामे करताना शक्यतो समूहाने काम करावे. एकट्या व्यक्तीने ऊसतोड किंवा शेतीची कामे करू नयेत. गावाजवळ, जंगलात, शेतात किंवा गावठाण हद्दीत बिबट दिसल्यास बघण्यासाठी गर्दी करू नये. त्यांना दगड मारून पळवण्याचा किंवा मोबाईलवर फोटो काढण्याचा प्रयत्न करू नये. बिबट तसेच त्याची पिल्ले आढळल्यास तात्काळ संबंधित वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Ahilyanagar News : जिल्ह्यात विविध भागांत बिबट्याचा वावर…प्रशासनाकडून नागरिकांना महत्त्वाची सुचना Read More »

mpsc

MPSC ची 9 नोव्हेंबर रोजी पूर्व परीक्षा; जिल्ह्यातील 20 परीक्षा उपकेंद्रांच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

MPSC Exam 2025: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ दि. ९ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत जिल्ह्यातील २० परीक्षा उपकेंद्रांवर घेण्यात येणार आहे. परीक्षा उपकेंद्रांच्या परिसरात कोणताही गैरप्रकार होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे केंद्रप्रमुख तथा निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांनी परीक्षा उपकेंद्राच्या १०० मीटर परिसरात सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या परीक्षेसाठी एकूण ७ हजार ४५७ उमेदवार बसणार असून या कामकाजासाठी ५ उपजिल्हाधिकारी दर्जाचे समन्वय अधिकारी, १ उपजिल्हाधिकारी दर्जाचा भरारी पथकातील अधिकारी, २० उपकेंद्रप्रमुख (वर्ग १ अधिकारी), ७२ पर्यवेक्षक, ३५९ समवेक्षक, समन्वय अधिकारी व भरारी पथकांचे ६ सहायक, ४० लिपीक, २० केअरटेकर, २० बेलमन, २८ शिपाई, ७२ पाणी वाटप कर्मचारी आणि २८ वाहनचालक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उमेदवारांना परीक्षा केंद्रावर सकाळी ८.३० वाजल्यापासून प्रवेश देण्यात येईल. त्यांनी आयोगाने दिलेल्या सर्व सूचनांचे काळजीपूर्वक पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. परीक्षा कक्षात मोबाईल, कॅल्क्युलेटर, डिजिटल डायरी, पेजर, मायक्रोफोन आदी दूरसंचार साधने आणणे व परीक्षा केंद्र परिसरात बाळगणे दोन्ही निषिद्ध आहे. उमेदवारांनी प्रवेशपत्रे आयोगाच्या संकेतस्थळावरूनच डाउनलोड करून घ्यावीत; दुय्यम प्रवेश प्रमाणपत्रे जिल्हाधिकारी कार्यालयातून जारी करण्यात येणार नाहीत. तसेच परीक्षा उपकेंद्राच्या १०० मीटर परिसरातील सर्व एस.टी.डी. बुथ, फॅक्स व झेरॉक्स दुकाने बंद ठेवण्याचे निर्देशही आदेशात दिले आहेत.

MPSC ची 9 नोव्हेंबर रोजी पूर्व परीक्षा; जिल्ह्यातील 20 परीक्षा उपकेंद्रांच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश Read More »

sheetal tejwani

Sheetal Tejwani : कोरेगाव पार्क जमीन प्रकरण : शीतल तेजवानीचा संशयास्पद भूतकाळ समोर…

Sheetal Tejwani : कोरेगाव पार्क परिसरातील सुमारे 40 एकरांचा भूखंड बेकायदेशीररीत्या लाटल्याप्रकरणी अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या आहेत. या प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार आणि त्यांचे मामेभाऊ दिग्विजय पाटील यांच्या ‘अमेडिया कंपनी’चे नाव समोर येत आहे. या व्यवहाराबाबत सह जिल्हा निबंधक (वर्ग 1) संतोष अशोक हिंगाणे यांनी बावधन पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, जमीन विक्रेता शीतल तेजवानी, अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील, तसेच सह दुय्यम निबंधक रवींद्र तारु यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य व्यक्ती ठरलेली शीतल तेजवानी हिच्याबद्दल आता नव्या आणि चक्रावून टाकणाऱ्या बाबी उघडकीस येत आहेत. प्राप्त माहितीनुसार, संबंधित 40 एकरांचा भूखंड हा मूळतः बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या ताब्यात होता. सरकारी ताब्यातील ही जमीन सोडवून तिच्या विक्रीसाठी तेजवानीने युक्ती रचल्याचे तपासात समोर आले आहे. तिने मूळ 272 मालकांना शोधून त्यांच्याकडून नाममात्र 10 ते 15 हजार रुपयांच्या मोबदल्यात कधीही रद्द न होणारी पॉवर ऑफ अटर्नी (POA) आपल्या नावावर घेतल्याचे समोर आले आहे. या व्यवहाराचा पाया हाच फसवणुकीवर आधारलेला असल्याचे तपास अधिकाऱ्यांच प्राथमिक निरीक्षण आहे. याच पार्श्वभूमीवर, 2025 साली तेजवानीने ‘अमेडिया कंपनी’च्या भागीदारीबद्दल माहिती मिळवून पुढील आर्थिक गणित आखले, असे सांगितले जाते. या कंपनीत पार्थ पवार यांचा 99 टक्के, तर दिग्विजय पाटील यांचा 1 टक्का हिस्सा आहे. हे गिऱ्हाईक लाभदायक ठरेल, हे लक्षात घेऊन तेजवानीने पुढील व्यवहार रचल्याची चर्चा आहे. मात्र, शीतल तेजवानीचा भूतकाळही संशयास्पद असल्याचे स्पष्ट झाले आहे. तिचा पती सागर सूर्यवंशी हा सेवा विकास सहकारी बँक घोटाळ्याचा आरोपी असून, त्याची चौकशीदेखील झाल्याची नोंद आहे. या दाम्पत्यावर तब्बल 100 कोटी रुपयांहून अधिकचे कर्ज असल्याची माहिती समोर आली आहे. दस्तऐवजनुसार, सागर सूर्यवंशीने ‘रेणुका लॉन्स’च्या नावावर दोन वाहन कर्जे आहेत एक 1.16 कोटी आणि दुसरे 2.24 कोटी रुपये घेतली आहेत. शीतल तेजवानीनेही दोन वाहनांसाठी 4.80 कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचे नोंदीत आढळते. त्याशिवाय सागर सूर्यवंशीने ‘सागर लॉन्स’च्या नावावर 16.48 कोटींचे कॅश क्रेडिट कर्ज, तर शीतल तेजवानीवर स्वतंत्र 10 कोटी रुपयांचे कर्ज असल्याचे समोर आले आहे. तिच्या ‘पॅरामाउंट इन्फ्रा’ या कंपनीवर 5.95 कोटी, तर ‘रेणुका लॉन्स’च्या नावावर आणखी 5.25 कोटींचे कर्ज असल्याने, या दाम्पत्याची एकत्रित थकबाकी कोट्यवधी रुपयांत गेल्याचे स्पष्ट होते. दरम्यान, शीतल तेजवानी सध्या कुठे आहे, तिचे कार्यालय कुठे आहे तसेच,ती कुठे कामकाज पाहते, याबाबत ठोस माहिती मिळालेली नाही. मात्र, कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवानी ही अत्यंत महत्त्वाचे दुवा असल्याने, तिच्या चौकशीमधून अमेडिया कंपनी आणि पार्थ पवार यांच्यातील संबंधांवर नव्या माहितीचा पडदा उघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढे या प्रकरणात काय ट्वीस्ट येतो आणि काय नवीन बाबी समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तूर्तास याप्रकरणी पार्थ पवारांच नाव समोर आल्यानंतर कुठल्याही चुकीच्या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत, असं अजित पवारांनी सांगितलं आहे मात्र, प्रत्यक्षात काय होतं हे पाहणं औत्सुक्याच ठरणार आहे.

Sheetal Tejwani : कोरेगाव पार्क जमीन प्रकरण : शीतल तेजवानीचा संशयास्पद भूतकाळ समोर… Read More »