Eknath Shinde : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील तब्बल 14 आमदार शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा शिंदे गटातील एका बड्या नेत्याने केला आहे. आगामी नवरात्रीपूर्वी हा पक्षप्रवेश होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
सध्या उद्धव ठाकरे यांच्या गटाकडे विधानसभेत 20 आमदार आहेत. त्यापैकी 14 आमदार शिंदे गटात गेल्यास ठाकरे गटाच्या संख्याबळावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र, संबंधित आमदारांची नावे अद्याप अधिकृतपणे समोर आलेली नाहीत. त्यामुळे नेमके कोणते आमदार शिंदे गटात जाणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.
तीन मंत्र्यांवर जबाबदारी?
शिंदे गटातील नेत्याच्या दाव्यानुसार, ठाकरे गटातील आमदारांना आपल्या बाजूने वळवण्याची जबाबदारी कोकण, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील तीन मंत्र्यांवर सोपवण्यात आली आहे. या प्रक्रियेला ‘ऑपरेशन टायगर’ असे नाव देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
यातील काही आमदारांना सरकारमध्ये महत्त्वाची खाती, मंत्रिपद किंवा राज्यमंत्रिपद देण्याबाबत चर्चा सुरू असल्याचा दावाही करण्यात आला आहे. काही नेत्यांना महामंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्याची शक्यता असल्याचेही सांगितले जात आहे.
खासदारांनंतर आता आमदारांवर लक्ष
यापूर्वी जून 2026 मध्ये ठाकरे गटातील सहा खासदारांनी स्वतंत्र गटाची नोंदणी केल्याची घटना घडली होती. त्यानंतर ठाकरे गटातील आमदारांबाबतही राजकीय चर्चांना उधाण आले होते. आता 14 आमदार शिंदे गटात जाणार असल्याचा दावा समोर आल्याने या चर्चेला आणखी बळ मिळाले आहे. दरम्यान, 14 आमदारांच्या संभाव्य पक्षप्रवेशाबाबत ठाकरे गटाकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे हा दावा प्रत्यक्षात कितपत खरा ठरतो, तसेच कोणते आमदार शिंदे गटात जातात, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.
जर हा पक्षप्रवेश प्रत्यक्षात झाला, तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी हा मोठा राजकीय धक्का ठरू शकतो. दुसरीकडे, शिंदे गटासाठी हा पक्षसंघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.






