Vaibhav Naik on Nitesh Rane: मुख्यमंत्री पदावरुन राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केल्यानंतर आता ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांनी नितेश राणे यांना प्रत्युत्तर देत टीका केली आहे.
उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री हे स्वतःहून झाले नाहीत, तर त्यांना त्यावेळी ‘महाविकास आघाडी’च्या लोकांनी आग्रह केला होता आणि भारतीय जनता पार्टीने जो ‘मातोश्री’मध्ये शब्द दिला होता तो शब्द फिरवला म्हणून उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हावे लागले. शिवसैनिक मुख्यमंत्री व्हावा अशी उद्धवजींची तेव्हा पण इच्छा होती.
आज आपण बघितलं असेल की, त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर उद्धवजींनी स्वतःहून विधान परिषद सदस्य म्हणून शपथ घेतली असती, त्याला सगळ्यांचा पाठिंबा होता. परंतु, उद्धवजींनी नेहमीच पक्षातल्या सामान्य कार्यकर्त्याला संधी देण्याचं ठरवलं होतं आणि म्हणूनच आज अनेक लोक मोठ्या-मोठ्या पदांपर्यंत पोहोचले आहेत.
नितेश राणेंनी हे लक्षात घेतलं पाहिजे की, आपण कोणाची लाचारी करून पद घेतलेलं आहे? आपण काँग्रेसमधून जेव्हा तुम्हाला तिकीट मिळालं, तेव्हा काँग्रेसने तुम्हाला तिकीट दिलं, पहिल्यांदा आमदार केलं आणि त्यानंतर त्या काँग्रेसला सोडून तुम्ही स्वतःचा पक्ष विसर्जित करून भाजपच्या पदराखाली गेलात आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये भाजप ज्या पद्धतीने निवडणुका जिंकतोय, त्यामुळे तुम्ही भाजपच्या नावावर निवडणूक जिंकलात तर ते काही मोठं नाहीये.
पण उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे असणारे कार्यकर्ते आजही एका शक्तीविरुद्ध लढत आहेत आणि ते कुठेही लाचारी करत नाहीत. जर लाचारी करायची असती तर उद्धवजींना अनेक पदं मिळाली असती आणि आज पण आपण बघितलं असेल की जो तुम्ही मोर्चा काढताय, जे काही सरकारच्या विरोधात, आपल्याच सरकारच्या विरोधात आहे. कारण तुम्ही कुठेतरी कमी पडला आहात आणि त्यामुळे लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी तुम्ही हे करताय.
परंतु आता मात्र तुमच्या राजकारणामध्ये, पुढच्या काळामध्ये तुमच्या राजकारणात ट्विस्ट येईल आणि उद्धव ठाकरेंवर तुम्ही बोलल्याशिवाय तुम्हाला किंमत नाहीये हे तुम्हाला माहिती आहे, म्हणून वारंवार तुम्ही त्यांच्याविरुद्ध बोलताय.
नारायण राणेंना मुख्यमंत्री बाळासाहेबांनी केल्यानंतर, पुढच्या वर्षीच्या निवडणुकीमध्ये सत्ता गेली आणि त्यामुळे ते मुख्यमंत्रीपदावर बसले नाहीत. त्याच्या पुढच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी प्रयत्न केले होते. पण तरीपण सत्ता आली नाही, त्यामुळे नारायण राणे मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत ही वस्तुस्थिती आहे. उद्धव ठाकरेंनी स्वतः आपण बघितलं असेल की, त्यानंतर सुद्धा आमची सत्ता आली आणि त्या सत्तेमध्ये स्वतः कुठलं पद घेतलं नव्हतं. दुसऱ्या वेळी सत्ता आली तेव्हा सुद्धा ते कुठले सदस्य नव्हते, परंतु महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांचं नाव सगळ्यांनी सुचवलं म्हणून त्यांना मुख्यमंत्री व्हावं लागलं. आणि त्याच वेळी त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला, त्याचबरोबर सदस्यत्वाचा पण राजीनामा ते त्यावेळी देणार होते. परंतु वरिष्ठांनी त्यांना थांबवलं आणि त्यांच्या शब्दाला मान म्हणून तो दिला नव्हता.
आज पण उद्धवजींनी स्वतः म्हटलं असतं तर स्वतः पण सदस्य झाले असते. काही लोक आपण बघितलं असेल की ५०-५० वर्ष सदस्य म्हणून काम करतायत, परंतु उद्धवजींनी तसं केलं नाही, सामान्य कार्यकर्त्याला पुन्हा एकदा संधी दिली असं वैभव नाईक म्हणाले.
नेमकं काय म्हणाले होते नितेश राणे?
सिंधुदुर्गात मंत्री नितेश राणे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री बनण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी 1995 पासूनच षडयंत्र रचल्याचा आरोप राणे यांनी केला. राणेसाहेब आणि राज ठाकरे यांच्या विरोधातही घाणेरड्या पद्धतीने राजकारण केल्याचा दावा त्यांनी केला. तसेच एकनाथ शिंदेंना दिलेला शब्द फिरवून स्वतः मुख्यमंत्री झाल्याचाही आरोप त्यांनी केला. सध्याच्या राजकीय परिस्थितीत सत्ता हातातून निसटत असल्यामुळे अंबादास दानवेंना पुढे केल्याची टीकाही राणे यांनी केली.






