DNA मराठी

Shirdi News

election

Maharashtra Election: शिर्डी मतदारसंघात मूळ मतदारास Tender Vote प्रक्रियेद्वारे मतदानाचा हक्क बहाल

Maharashtra Election: शिर्डी नगरपरिषद निवडणूकीत एका मतदान केंद्रावर एका महिलेच्या नावे दुसऱ्याच व्यक्तीने मतदान केल्याचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर, निवडणूक प्रशासनाने तत्काळ दखल घेत संबंधित मूळ महिलेस नियमानुसार मतदानाचा हक्क मिळवून दिला आहे. ‘प्रदत्त मत’ (Tender Vote) या तरतुदीचा वापर करून संबंधित महिलेचे मतदान करून घेण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी माणिक आहेर यांनी दिली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, शिर्डी येथील एका मतदान केंद्रावर शोभा शिंदे या मतदानासाठी आल्या असता, यादीतील त्यांच्या नावासमोर आधीच खूण असल्याचे व त्यांचे मतदान झाल्याचे निदर्शनास आले. या प्रकाराबाबत त्यांनी आणि उपस्थित प्रतिनिधींनी आक्षेप नोंदवला होता. या घटनेची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली. याविषयी अधिकृत खुलासा करताना निवडणूक निर्णय अधिकारी माणिक आहेर यांनी सांगितले की, “सदर प्रकरणात मूळ मतदाराऐवजी दुसऱ्याच मतदाराने मतदान केल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा परिस्थितीत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि कायदेशीर तरतुदीनुसार, मूळ मतदार (श्रीमती शिंदे) यांना ‘प्रदत्त मतपत्रिका’ (Tender Ballot Paper) देण्यात आली. या प्रक्रियेद्वारे त्यांचे ‘प्रदत्त मतदान’ कायदेशीररित्या करून घेण्यात आले आहे.” निवडणूक प्रक्रियेत कोणत्याही वैध मतदाराचा हक्क बाधित होऊ नये, यासाठी प्रशासन खबरदारी घेत असल्याचेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Maharashtra Election: शिर्डी मतदारसंघात मूळ मतदारास Tender Vote प्रक्रियेद्वारे मतदानाचा हक्क बहाल Read More »

मोठी बातमी! शिर्डी विमानतळावर दोन हेलिपॅड व आठ वाहनतळ उभारण्यास मान्यता

Shirdi Airport: आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी विमानतळ येथे दोन हेलिपॅड व 8 वाहनतळ उभारण्यास व विमानतळाचे विस्तारीकरण, अद्ययावतीकरणास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाच्या बैठकीत मान्यता दिली. अमरावती विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणाचा आराखडा सादर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाच्या संचालक मंडळाची 91 वी बैठक सह्याद्री अतिथीगृहातील सभागृहात झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. प्राधिकरणाच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. अमरावती येथे उद्योगाचे जाळे मोठ्या प्रमाणात विस्तारत असल्याने या ठिकाणची धावपट्टी वाढविणे आवश्यक आहे. तसेच या विमानतळापासून महसूल मिळविण्यासाठीचा आराखडा तयार करावा. मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केले. तसेच शिर्डी येथील विमानतळाच्या कार्गो टर्मिनलचे काम वेगाने सुरू आहे. नाशिकपासून शिर्डी विमानतळ जवळ असल्याने नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या वेळेस हवाई मार्गेने येणाऱ्या भाविकांना शिर्डी विमानतळ सोईचे होणार आहे. त्यावेळी होणाऱ्या संभाव्य गर्दीचा विचार करून व नाशिक येथील विमानतळाची क्षमता लक्षात घेता शिर्डी विमानतळाचे विस्तारीकरणाच्या प्रस्तावास यावेळी मान्यता देण्यात आली. यामध्ये 8 वाहनतळे, दोन हेलिपॅड यासह टर्मिनलच्या अद्यावतीकरणाचा समावेश आहे. याचा फायदा कुंभमेळ्यादरम्यान येणाऱ्या विमाने व हेलिकॉप्टर सेवेसाठी होणार आहे. लातूर जिल्ह्याचा सर्व क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विकास व विस्तार होत आहे. त्यामुळे लातूर विमानतळ महत्त्वाचे ठरणार आहे. त्यासाठी या विमानतळाचा विकास करण्यात यावा. हे विमानतळाचा लातूरसह बीड, धाराशिव या जिल्ह्यांनाही लाभ होईल. तसेच कराड येथील विमानतळाचे काम वेगाने सुरू करून तेथे नाईट लँडिगची सुविधा निर्माण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. चंद्रपूर येथील विमानतळावर चार्टड विमाने उतरू शकतील अशी सुविधा तयार करण्यासाठी तेथील धावपट्टी वाढविण्यात यावी. गडचिरोली येथील विमानतळासाठी दोन ते तीन पर्यायी जागांचा विचार करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी रत्नागिरी, अकोला, कोल्हापूर, नांदेड, धुळे येथील विमानतळाच्या कामाचाही आढावा घेण्यात आला. प्रादेशिक जोडणी योजना (रिजनल कनेक्टिव्हीटी स्किम) अंतर्गत सध्या राज्यात 16 मार्गांवर विमानसेवा सुरू असून उड्डाण योजनेअंतर्गत राज्यातील आठ प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. प्राधिकरणाच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे, संचालक मंडळतील सदस्य तथा वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ पी गुप्ता, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी वेलरासू यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.

मोठी बातमी! शिर्डी विमानतळावर दोन हेलिपॅड व आठ वाहनतळ उभारण्यास मान्यता Read More »

पिण्यासाठी पाणी नाही, चार भिक्षेक मृत्यू प्रकरणात नातेवाईकांचा गंभीर आरोप

Maharashtra News: अहिल्यानगर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या भिक्षेकांपैकी चार जणांचा मृत्यू झाला असून, त्यांच्या नातेवाईकांनी हा मृत्यू रुग्णालयातील निष्काळजीपणामुळे झाल्याचा गंभीर आरोप केल्याने या प्रकरणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. मृत भिक्षेकांना ना वेळेवर औषधं मिळाली, ना पिण्यासाठी पाणी, असे गंभीर आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केले आहे. 7 एप्रिल रोजी पोलिसांनी 49 भिक्षेकांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांना श्रीमंत तालुक्यातील विसापूर येथे ठेवण्यात आले होते. त्यापैकी दहा जणांची प्रकृती अचानक खालावल्यामुळे त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यापैकी चौघांचा मृत्यू झाला. उर्वरित दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने पुण्यातील ससून रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर रुग्णालय प्रशासनाविरोधात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली असली तरी यापूर्वीच्या घटनांमुळे या चौकशीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. पूर्वीही घडली होती गंभीर चूकप्रशासनाच्या निष्काळजीपणाचा पुन्हा पुनरावृत्तीस्मरणात ठेवावी अशी घटना म्हणजे, 2021 साली याच जिल्हा रुग्णालयाच्या ICU मध्ये लागलेल्या भीषण आगीत 18 रुग्णांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता, मात्र शासनाने या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्यासाठी चार्जशीट दाखल करण्याची परवानगी नाकारली. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये बेधडकपणा वाढल्याचा आरोप केला जात आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते गिरीश जाधव यांनी या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले की, “दोन वर्षांपूर्वी 18 रुग्णांचे बळी गेले, तेव्हाही दोषींवर कारवाई झाली नाही. आता पुन्हा चार जणांचा मृत्यू. शासकीय रुग्णालयात प्रशासनाला कुणाची भीती राहिलीच नाही. सरकार दोषींना वाचवतं आहे. “पोस्टमार्टम अहवाल प्रतीक्षेत, चौकशी समितीकडून अपेक्षा अल्पसध्या मृत भिक्षेकांचे शवविच्छेदन करण्यात आले असून, त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे, परंतु याआधी अशा चौकशी समित्यांतून ठोस निष्कर्ष किंवा कार्यवाही झाली नसल्याने या प्रकरणातही तीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता नागरिक व सामाजिक कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

पिण्यासाठी पाणी नाही, चार भिक्षेक मृत्यू प्रकरणात नातेवाईकांचा गंभीर आरोप Read More »

अखेर तो जीव आहे ! शिर्डीतील भिक्षुक समस्या आणि शासनाची जबाबदारी

Shirdi News : शिर्डीतील चार भिक्षुकांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी विरोधक सरकारवर हल्लाबोल करताना दिसत आहे. दरवर्षी शिर्डीत लाखो भाविक हजेरी लावतात मात्र याच शिर्डीत एक वेगळं वास्तवही दिसून येते. या शिर्डीत तुम्हाला शेकडो भिक्षुक रस्त्याच्या कडेला बसलेले, काही व्याधीग्रस्त, काही वृद्ध, तर काही व्यसनांच्या गर्तेत अडकलेले दिसून येईल. श्रद्धा आणि संवेदनशीलतेचा संगम हवाशिर्डीमध्ये भिक्षुकांची वाढती संख्या काही अंशी व्यवस्थापनाच्या दृष्टीने त्रासदायक वाटू शकते. पर्यटक त्रासलेले असतात, वाहतुकीत अडथळा निर्माण होतो, आणि अनेकदा काही भिक्षुकांच्या वागणुकीमुळे अप्रिय प्रसंगही उद्भवतात. पण या समस्येकडे केवळ ‘अडथळा’ म्हणून पाहणं चुकीचं ठरेल. प्रत्येक भिक्षुक ही एक कथा घेऊन बसलेला असतो – उपेक्षेची, वंचनेची, दारिद्र्याची.साईबाबांनी स्वतः आयुष्यभर भिक्षा मागून जगले आणि तीच भिक्षा गरजूंना दिली. त्यांच्या जीवनाचं सार म्हणजे ‘देत राहा, मदत करत राहा’. अशा बाबांच्या भूमीवर जर गरजूंना फक्त ‘समस्या’ म्हणून हाकललं जात असेल, तर हे त्यांच्या तत्त्वज्ञानाला विरोधी आहे. काही भिक्षुक व्यसनाधीन असतील, काही फसवे असतील. पण या परिस्थितीमुळे संपूर्ण वर्गावर अन्याय करणं योग्य नाही. अशा परिस्थितीत पोलिस कारवाई करणे ही वरवरची मलमपट्टी आहे, जखम तर खोलवर आहे. त्यामुळे, सरकार आणि समाजाने संयुक्तपणे दीर्घकालीन उपाययोजना आखणं गरजेचं आहे. पुनर्वसन – एक सकारात्मक बदलाचा मार्गभिक्षुकांना केवळ हटवून टाकण्याने प्रश्न सुटत नाही. त्यांचं पुनर्वसन करणं, त्यांना निवारा, अन्न, वैद्यकीय सुविधा, व्यसनमुक्ती उपचार आणि कौशल्य प्रशिक्षण मिळणं आवश्यक आहे. जेणेकरून ते आत्मनिर्भर होऊ शकतील. अनेक वेळा भिक्षा मागणाऱ्या व्यक्ती शिक्षण किंवा कौशल्यअभावी त्या स्थितीत अडकून पडतात. योग्य मार्गदर्शन, आश्रय आणि संधी दिल्यास त्यांचं जीवन बदलू शकतं. शासनाची भूमिका – केवळ नियम नाही, माणुसकीही लागतेशिर्डी सारख्या धार्मिक स्थळांवर विशेष धोरण राबवणं आवश्यक आहे. शासनाने सामाजिक संस्था, धर्मादाय ट्रस्ट, आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सहकार्याने एक ठोस आणि संवेदनशील आराखडा तयार केला पाहिजे. शिर्डीच्या विकासात जेवढं लक्ष वाहतुकीच्या व्यवस्थापनाला दिलं जातं, तेवढंच मानवी व्यवस्थापनालाही द्यायला हवं. शेवटी – “तोही एक जीव आहे”प्रत्येक माणसाला जगण्याचा अधिकार आहे. परिस्थितीमुळे जर कोणी रस्त्यावर आला असेल, तर त्याला फक्त अडथळा म्हणून पाहणं ही अमानवी वृत्ती ठरेल. साईबाबा म्हणत – “सबका मालिक एक”, मग आपण त्यांची शिकवण विसरत कशी? मानवतेच्या पायावर उभ्या असलेल्या समाजात, एखाद्याच्या व्यथा ऐकल्या न गेल्या, तर आपण एक संवेदनशून्य समाज घडवत आहोत. म्हणूनच, ‘तोही एक जीव आहे’ ही भावना मनात बाळगून आपली भूमिका ठरवणं ही काळाची गरज आहे.

अखेर तो जीव आहे ! शिर्डीतील भिक्षुक समस्या आणि शासनाची जबाबदारी Read More »