DNA मराठी

Maharashtra crime

img 20260410 wa0013

Ashok Kharat: भोंदू अशोक खरातच्या अडचणीत वाढ; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

Ashok Kharat: पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून त्याचा पाय आणखी खोलात गेला आहे. पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत त्याच्यासह आणखी दोघांविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे एक वर्षापूर्वी खबरदार पुढारी या दैनिकातून पत्रकार दत्तात्रय खेमनर यांनी अशोक खरात याच्या संशयास्पद कृत्यांबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्तामुळे संतप्त झालेल्या खरातने त्या वेळेपासूनच खेमनर यांच्याविरोधात वैयक्तिक आकस ठेवला असल्याचे समोर आले आहे. तक्रारीनुसार, बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर खरात याने आपल्या काही हस्तकांच्या माध्यमातून पत्रकार खेमनर यांना वारंवार धमकावण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न, तसेच कायदेशीर नोटिसा पाठवून मानसिक त्रास देण्याचे प्रकारही केल्याचा आरोप होत आहे. या सर्व प्रकारामुळे खेमनर यांना मोठ्या प्रमाणावर मानसिक त्रास सहन करावा लागला.या सततच्या छळाला कंटाळून अखेर पत्रकार दत्तात्रय खेमनर यांनी पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणात विशेष तपास पथक (SIT) ची परवानगी घेतल्यानंतरच पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यानंतर श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भोंदू अशोक खरात आणि त्याच्या इतर दोन सहकाऱ्यांविरोधात पत्रकार संरक्षण कायदा, धमकावणे तसेच अब्रूनुकसानी संदर्भातील विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत तपास सुरू केला असून, संबंधित आरोपींवर पुढील कारवाई होण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे पत्रकारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पत्रकार संघटना, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध राजकीय नेत्यांकडून या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे.दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे,” अशी मागणी विविध स्तरांतून केली जात आहे.या घटनेमुळे पत्रकारांना निर्भयपणे काम करण्यासाठी कायदेशीर संरक्षण किती आवश्यक आहे, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे. तसेच, पत्रकारांवर होणाऱ्या अशा प्रकारच्या दबावाच्या घटना रोखण्यासाठी प्रशासनाने ठोस भूमिका घेण्याची गरजही व्यक्त होत आहे.

Ashok Kharat: भोंदू अशोक खरातच्या अडचणीत वाढ; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल Read More »

crime

Sambhajinagar Crime: नवऱ्याकडून पत्नीचा पेट्रोल पंपावर गळा चिरून खून

Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगरमध्ये आज एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. करमाड परिसरातील पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या महिलेचा तिच्याच दुसऱ्या नवऱ्याने भर दिवसा गळा चिरून खून केला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. करमाड परिसरातील इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर ही घटना घडली. पूजा गवांडे असे मृत महिलेचे नाव आहे. ती पंपावर काम करत असताना सत्यम गवांडे याने धारदार चाकूने तिच्या गळ्यावर वार करत तिचा निर्घृण खून केला. माहितीनुसार, पूजाचे यापूर्वी एक लग्न झाले होते आणि तिला एक मुलगा व एक मुलगी आहे. पहिल्या पतीच्या निधनानंतर काही महिन्यांपूर्वी तिने सत्यम गवांडे याच्यासोबत आळंदी येथे विवाह केला होता. मात्र, लग्नानंतर दोघेही एकत्र राहत नव्हते. सत्यम गवांडे याला दुसरे लग्न करायचे असल्याने तो पूजाकडे सोडचिठ्ठी देण्याचा तगादा लावत होता. मात्र, पूजाने यास नकार दिल्याने दोघांमध्ये वाद निर्माण झाला आणि त्यातूनच त्याने हा टोकाचा निर्णय घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच करमाड पोलिसांनी तत्काळ कारवाई करत अवघ्या एका तासात आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती विनयकुमार राठोड पोलीस अधीक्षक, ग्रामीण यांनी दिली.

Sambhajinagar Crime: नवऱ्याकडून पत्नीचा पेट्रोल पंपावर गळा चिरून खून Read More »

Crime

Pune Crime: पुण्यात डिलिव्हरी ॲपवरून ड्रग्स विक्रीचा पर्दाफाश

Pune Crime : शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील वारजे आणि उत्तम नगर परिसरात डिलिव्हरी ॲपच्या माध्यमातून ड्रग्स विक्री केली जात असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुनील राठोड याला अटक करण्यात आली असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. या प्रकरणात एकूण चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे आरोपी Porter या डिलिव्हरी ॲपचा वापर करून MD (मॅफेड्रोन) या ड्रग्सचा पुरवठा करत होते. पोलिस तपासात तब्बल 300 जणांना या ड्रग्सचा पुरवठा करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून काही प्रमाणात MD ड्रग्स जप्त केले असून, या मागे मोठे रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

Pune Crime: पुण्यात डिलिव्हरी ॲपवरून ड्रग्स विक्रीचा पर्दाफाश Read More »

bachchu kadu

Bachchu Kadu : माजी मंत्री बच्चू कडू अडचणीत; हत्येचा कट उघड, गुन्हा दाखल

Bachchu Kadu : अमरावती जिल्ह्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. आमदार प्रवीण तायडे यांचे चुलत भाऊ अभिजित तायडे यांच्या तक्रारीनुसार माजी मंत्री बच्चू कडू व काही साथीदारांनी अभिजित तायडे यांचा अपघात घडवून त्यांना ठार मारण्याचा कट रचल्याचा आरोप पोलिसांनी नोंदवला आहे. तक्रारीनुसार डिसेंबर महिन्यात कुरळपूर्णा येथील निवासस्थानी हा कट आखण्याची चर्चा झाली होती. या संभाषणाचे गुप्त रेकॉर्डिंग एका साक्षीदाराने मोबाईलमध्ये केले. पोलिसांनी रेकॉर्डिंगची तपासणी केली असता प्राथमिकदृष्ट्या तथ्य आढळल्यामुळे चांदूर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात बच्चू कडू, शुभम उर्फ गोलू माहोरे यांच्यासह इतरांवर भारतीय दंड संहिता कलम ५५, ५८, ६१ अंतर्गत कारवाई करण्यात आली असल्याची माहिती विशाल आनंद,पोलीस अधीक्षक ग्रामीण यांनी दिली आहे. तर दुसरीकडे या घटनेमुळे अमरावतीतील राजकीय वातावरण तापले असून, पुढील तपासात काय निष्पन्न होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Bachchu Kadu : माजी मंत्री बच्चू कडू अडचणीत; हत्येचा कट उघड, गुन्हा दाखल Read More »

kolhapur

Kolhapur News : कोल्हापुरात गोवा बनावटी मद्याचा मोठा साठा जप्त

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात गोवा बनावटी दारूविरोधी मोहिमेत शाहूवाडी पोलिसांनी यशस्वी कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नेर्ले-बांबवडे रोडवर कापशी गावाजवळ सापळा रचून एका टाटा ट्रकला अडवले. या कारवाईत सुमारे 1 कोटी 64 लाख रुपयांचा गोवा बनावटी ‘सनकी’ ब्रँडचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. ट्रकसह एकूण 1 कोटी 79 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. ट्रकचालक संतोष बंडू पेटकर याला ताब्यात घेतल्यानंतर चौकशीत मध्यप्रदेशातील असीम अब्दुल्ला शेख याचा सहभाग उघड झाला. त्यानंतर शेखलाही अटक करण्यात आली आहे. दोघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार शाहूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी सांगितले की, “मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. सर्व मुद्देमाल जप्त करून दोघांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.”

Kolhapur News : कोल्हापुरात गोवा बनावटी मद्याचा मोठा साठा जप्त Read More »

Crime 1

Dhule Crime: धुळ्यात हातावरील ‘टॅटू’ने उलगडले खुनाचे गूढ; अनैतिक संबंधातून तरुणाची निर्घृण हत्या

Dhule Crime : धुळे जिल्ह्यात नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधांच्या रागातून एका पतीने आपल्या नात्यातील तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने पत्नी आणि अल्पवयीन मुलाच्या मदतीने मृतदेह सायकलवरून नेऊन विहिरीत फेकला. सुमारे नऊ दिवस पाण्यात राहिल्याने मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता, त्यामुळे ओळख पटवणे कठीण झाले होते. मात्र हातावरील टॅटूमुळे पोलिसांना महत्त्वाचा धागा मिळाला. अवधान एमआयडीसी परिसरातील विहिरीत सापडलेल्या मृतदेहाच्या छातीवर “RAVI” आणि हातावर “Radha” असे टॅटू आढळले. यावरून मृत व्यक्ती दिवाणमळा येथील रवी मालचे असल्याचे निष्पन्न झाले. तपासात उघड झाले की, रवीचे आरोपी बापू मालचे यांच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते. याच रागातून १८ मार्चच्या रात्री बापू मालचे यांनी पत्नीच्या मदतीने रवीची हत्या केली आणि कुटुंबाच्या मदतीने मृतदेहाची विल्हेवाट लावली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलीस ठाण्याच्या निरीक्षक शिल्पा पाटील आणि त्यांच्या पथकाने वेगाने तपास करत अवघ्या २४ तासांत गुन्ह्याचा उलगडा केला. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, पुढील तपास सुरू आहे.

Dhule Crime: धुळ्यात हातावरील ‘टॅटू’ने उलगडले खुनाचे गूढ; अनैतिक संबंधातून तरुणाची निर्घृण हत्या Read More »

santosh pandit

Santosh Pandit : महिला पत्रकाराशी गैरवर्तन प्रकरणी रील स्टार संतोष पंडीतवर गुन्हा दाखल…

Santosh Pandit : सोशल मीडियावर स्वतःला रील स्टार म्हणून मिरवणाऱ्या संतोष पंडित याच्याविरोधात महिला पत्रकाराशी गैरवर्तन केल्याप्रकरणी पर्वती पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अर्वाच्य भाषा वापरणे, कपड्यांवरून अश्लील टिप्पणी करणे आणि परवानगीशिवाय मोबाईलद्वारे चित्रीकरण केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. सोमवारी (30 मार्च) टिळक रस्त्यावर ही घटना घडली. नाशिकमधील खरात प्रकरणाच्या निषेधार्थ आयोजित आंदोलनाचे वार्तांकन करण्यासाठी संबंधित महिला पत्रकार त्या ठिकाणी उपस्थित होत्या. यावेळी संतोष पंडित घटनास्थळी येऊन पत्रकारांवर संताप व्यक्त करत गैरवर्तन करू लागल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्याने संबंधित पत्रकाराबाबत अपमानास्पद वक्तव्ये केली तसेच अश्लील हावभावही केल्याचा आरोप आहे. तक्रारीनुसार, पंडितने केवळ संबंधित पत्रकारालाच नव्हे तर आंदोलनात सहभागी इतर महिलांनाही धमकावण्याचा आणि शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केला. याशिवाय, महिलेच्या इच्छेविरुद्ध मोबाईलवर चित्रीकरण केल्याचेही समोर आले आहे. महिला पत्रकाराने दिलेल्या तक्रारीच्या आधारे भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ७५, ७८, ३५२, ३५१ (२) कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष महाले करत असून पुढील चौकशी सुरू आहे. दरम्यान, या घटनेनंतर पत्रकारांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून सोशल मीडियावरही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

Santosh Pandit : महिला पत्रकाराशी गैरवर्तन प्रकरणी रील स्टार संतोष पंडीतवर गुन्हा दाखल… Read More »

cockfighting

Ahilyanagar Crime : कोंबड्यांची झुंज अन्…, 21 जणांवर गुन्हा दाखल

Ahilyanagar Crime : नगर तालुक्यातील पोखर्डी शिवारात कोंबड्यांच्या झुंजी लावून त्यावर जुगार खेळणाऱ्या २१ जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून जेरबंद केले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम राजेश बोध (वय-२७, रा. झेंडीगेट, अहिल्यानगर), आशरफ बाहुला खान (वय-५०,रा. आलमगीर ता.जि. अहिल्यानगर), मोहम्मद उस्मान अली शेख (वय-४०, रा. महिम उन्नती सोसायटी मुंबई), अमजद युसुफ मगदुम वय-४३, रा. नागपुरचा येरवडा पुणे), सय्यद अझर अक्तर वय-४०, रा. पंचपिर चावडी अहिल्यानगर), रोहीत श्रीचंद गोहिर (वय-३३, रा. हरिचामळा दरेवाडी, ता.जि. अहिल्यानगर), संदिप ओमप्रकाश कुडीया (वय-३२, रा. वसंत टेकडी अहिल्यानगर), राम हिरालाल क्षत्रिय (वय-४६ रा. भद्रकाली फुले मार्केट नाशिक), तौफिक सिकंदर शेख (वय-२८, रा. नेवसा खुर्द ता.नेवासा), अजहर खुदाबक्श शेख (वय-३४, रा.. मुकुंदनगर अहिल्यानगर), योगेश मनोहर छजलांनी (वय-४०, रा. हरिचामळा दरेवाडी, ता.जि. अहिल्यानगर), संतोष गणेश गोयल (वय- ३९, रा. शाहापुर ता.जि. अहिल्यानगर), विकी लक्ष्मण सुजगोहर वय-४६ रा. येरवडा पुणे), जितेंद्र चंद्रकांत म्हात्रे (वय- ४०, रा. भिवंडी जि.ठाणे), अमीन सरदार शेख (वय-४२, रा. गजराजनगर ता.जि. अहिल्यानगर), तुषार संतोष मुलतांनी वय-२९ रा. मगळवारपेठ पुणे), समीर फिरोज शेख (वय-२२ रा. अकोले नाका संगमनेर), वसीम सलीम शेख (वय-७० रा. येरवडा पुणे), गोविंद शाम राजुडीया (वय-६३, रा. मंगळवारपेठ पुणे), सोहेल कबीर सय्यद वय-३८ रा. मुकुंदनगर अहिल्यानगर), उत्तम एकनाथ साळवे ( वय-४०, रा. देवळाली कॅम्प, नाशिक जि.नाशिक), असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या आदेशान्वये पथक एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोखर्डी शिवारातील पिंपळगाव उज्जनी रस्त्यावर एका मोकळ्या जागेत कापडी मंडप उभारून कोंबड्यांच्या झुंजी लावल्या जात असल्याची माहिती मिळाली. माहितीची खात्री करून पथकाने तत्काळ घटनास्थळी छापा टाकला. तेथे काही व्यक्ती कोंबड्यांची झुंज लावत असून उपस्थित नागरिक त्यावर पैशांची पैज लावत असल्याचे आढळले. पोलिसांनी २१ जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून एकूण २४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ahilyanagar Crime : कोंबड्यांची झुंज अन्…, 21 जणांवर गुन्हा दाखल Read More »

raigad police

Raigad Police : नेरळ पोलिसांची धडाकेबाज कारवाई; पाण्याच्या टँकरमधून सुरू असलेली दारू तस्करी उधळली

Raigad Police : रायगड जिल्ह्यातील नेरळ पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैध दारू तस्करीचा पर्दाफाश केला आहे. पाण्याच्या टँकरच्या आडून सुरू असलेली ही तस्करी उघडकीस आली असून पोलिसांनी टँकरसह कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नेरळ पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वारोटे आणि त्यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे कर्जत–मुरबाड मार्गावरील वारे गाव परिसरात सापळा रचला. कोकण किनारा हॉटेलसमोर संशयित टँकर अडवून तपासणी केली असता या टँकरमध्ये अवैधरित्या गोवा बनावटीची विदेशी दारू वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले. राजस्थानमधील गुडामबेरी येथील रहिवासी लाडूराम खियाराम बिश्नोई हा आरोपी ही दारू गोव्याहून गुजरातकडे नेत असल्याचे निष्पन्न झाले. विशेष म्हणजे, कोणालाही संशय येऊ नये म्हणून पाणी वाहून नेणाऱ्या टँकरचा वापर करण्यात आला होता. बाहेरून टँकर पाण्याचा असल्यासारखा दिसत असला तरी आतमध्ये गुप्त कप्पे तयार करून त्यामध्ये दारूचे बॉक्स लपवण्यात आले होते. तपासणीदरम्यान पोलिसांनी मोठ्या प्रमाणात विदेशी दारू जप्त केली असून टँकरसह एकूण १ कोटी १ लाख २७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती राहुल गायकवाड (उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत) यांनी दिली.

Raigad Police : नेरळ पोलिसांची धडाकेबाज कारवाई; पाण्याच्या टँकरमधून सुरू असलेली दारू तस्करी उधळली Read More »

crime

Dhavalpuri Case : ढवळपुरी प्रकरण; श्रद्धेच्या आवरणामागचे भयावह वास्तव

Dhavalpuri Case: अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे उघडकीस आलेले अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरण केवळ एक गुन्हेगारी घटना म्हणून पाहून चालणार नाही ते समाजाच्या नैतिक अध:पतनाचे आणि आंधळ्या श्रद्धेच्या धोकादायक परिणामांचे गंभीर उदाहरण आहे. वारकरी संप्रदायाची परंपरा ही संत विचार, नैतिकता, समता आणि मानवतेच्या मूल्यांवर उभी आहे. मात्र, याच परंपरेच्या नावाखाली समाजात प्रतिष्ठा मिळवलेल्या व्यक्तीकडून असा अमानुष प्रकार घडल्याचा आरोप होणे, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. या प्रकरणात आरोपीने अल्पवयीन मुलीवर दीर्घकाळ अत्याचार केल्याचा आरोप असून, पीडितेला धमक्या देत गप्प ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. अधिक धक्कादायक म्हणजे, यापूर्वीही त्याच व्यक्तीवर बलात्कारासंदर्भातील गुन्हे दाखल झाले होते. एका प्रकरणात निर्दोष मुक्तता झाली असली, तरी दुसरे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची माहिती समोर येते. यामुळे प्रश्न केवळ एका आरोपीपुरता मर्यादित राहत नाही तर समाज आणि व्यवस्थेने अशा संकेतांकडे वेळेत गांभीर्याने पाहिले का, हा मूलभूत प्रश्न उपस्थित होतो. भारतीय समाजात धार्मिक व्यक्तींना सहजपणे नैतिक श्रेष्ठत्व बहाल केले जाते. ‘महाराज’, ‘बाबा’, ‘कीर्तनकार’ अशा पदव्या अनेकदा प्रश्न विचारण्याची प्रवृत्तीच नष्ट करतात. परिणामी, पीडितांना आवाज उठवणे अधिक कठीण होते. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील सीमारेषा पुसली गेली की सत्तेचा गैरवापर सुरू होतो. ढवळपुरी प्रकरण हे त्याचेच उदाहरण मानावे लागेल. या घटनेत पीडित मुलीने अनेक वर्षे भीतीपोटी मौन बाळगल्याचे दिसते. हे मौन समाजाच्या अपयशाचे प्रतीक आहे. कुटुंब, शाळा, ग्रामव्यवस्था आणि स्थानिक समाजरचना या सर्व स्तरांवर मुलांना सुरक्षित वातावरण मिळणे अपेक्षित असते. परंतु जेव्हा प्रभावशाली व्यक्तीविरुद्ध तक्रार करण्याची भीती निर्माण होते, तेव्हा न्यायव्यवस्था उशिरा का होईना, हस्तक्षेप करते पण तोपर्यंत मोठी हानी झालेली असते. या पार्श्वभूमीवर दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. पहिली म्हणजे, धार्मिक किंवा सामाजिक प्रतिष्ठा ही कायद्यापेक्षा मोठी नाही, हा संदेश ठामपणे पोहोचणे आवश्यक आहे. दुसरी म्हणजे, अल्पवयीनांवरील अत्याचार प्रकरणांमध्ये तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया अधिक विश्वासार्ह आणि संवेदनशील बनवणे गरजेचे आहे. पोलिसांनी नागरिकांना पुढे येण्याचे केलेले आवाहन ही सकारात्मक बाब असली, तरी समाजानेही पीडितांच्या बाजूने उभे राहण्याची मानसिकता विकसित करणे तितकेच आवश्यक आहे. वारकरी संप्रदाय हा संत तुकाराम, ज्ञानेश्वरांच्या विचारांनी घडलेला आहे. करुणा, संयम आणि सत्य यांची शिकवण देणारा. त्यामुळे अशा घटनांमुळे संप्रदाय नव्हे, तर त्याच्या नावाचा गैरवापर करणाऱ्या व्यक्ती उघडकीस येतात, हे समाजाने लक्षात ठेवले पाहिजे. अन्यथा, काही व्यक्तींच्या कृत्यामुळे संपूर्ण परंपरेवर संशयाची सावली पडण्याचा धोका निर्माण होतो. ढवळपुरी प्रकरण हे केवळ गुन्हेगारी बातमी नाही; ते समाजाला स्वतःकडे पाहण्यास भाग पाडणारे आरसे आहे. श्रद्धा ठेवावी, पण प्रश्न विचारण्याची क्षमता गमावू नये हाच या घटनेतून घ्यायचा सर्वात मोठा धडा आहे.

Dhavalpuri Case : ढवळपुरी प्रकरण; श्रद्धेच्या आवरणामागचे भयावह वास्तव Read More »