DNA मराठी

Jitendra Awhad

‘माझा महाराष्ट्र कुठे चाललाय

Padalkar Awhad विधानभवनात गोंधळाचे राजकारण: लोकशाहीचा अपमान

Padalkar Awhad :- नागपूर :- महाराष्ट्र विधिमंडळ हे राज्याच्या लोकशाही व्यवस्थेचे सर्वोच्च मंदिर. या मंदिरात जनतेच्या प्रश्नांवर गंभीरपणे चर्चा होणे अपेक्षित असते. मात्र १७–१८ जुलै रोजी जे काही घडले ते या संस्थेच्या लोकशाहीला कलंक ठरावे असेच आहे. भाजपचे (BJP) आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद गट) (NCP) चे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यातील वैयक्तिक राजकीय वैर विधानभवनाच्या चार भिंतींमध्ये दारुण राड्याचे कारण ठरले. समर्थकांनी एकमेकांवर शिवीगाळ आणि धक्काबुक्कीसारखे प्रकार करत लोकशाहीच्या सर्वोच्च संस्थेच्या प्रतिष्ठेचा विध्वंस केला. हे प्रकरण केवळ राजकीय असभ्यता नसून ती राज्यकारभाराच्या गंभीरतेवरच गदा आणणारी घटना आहे. या घटनांमुळे विधानसभेचे कामकाज काही काळासाठी थांबवावे लागले. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी घेतलेला निर्णय — आता केवळ आमदार, आमदारांचे वैयक्तिक सहाय्यक, विधान परिषद सदस्य आणि अधिकृत शासकीय अधिकारी यांनाच विधानभवनात प्रवेश असेल — हा आवश्यक असला, तरी लोकशाही प्रक्रियेमधील खुलेपणावर प्रश्न उपस्थित करणारा ठरतो. लोकशाहीत वाद होणं सहाजिक आहे, पण तो वाद संवादाच्या चौकटीतच होणं अपेक्षित असतं. ‘मी कोणत्या पक्षाचा’ हे सांगण्यापेक्षा ‘मी जनतेचा प्रतिनिधी’ या भूमिकेचा विसर गेल्यानेच अशा घटना घडत आहेत. ही केवळ पक्षीय कुरघोडी नव्हे, तर जनतेच्या विश्वासाला तडा देणारी राजकीय बेशिस्त आहे. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे,(Eknath Shinde)  आणि विरोधी पक्षनेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मिळून अशा घटना रोखण्यासाठी आचारसंहिता आखावी. केवळ व्यक्तिकेंद्रित राजकारणाने विधिमंडळाचा अपमान होतो, आणि या अपमानाचे दुष्परिणाम सर्वसामान्य जनतेवर उमटतात. तर ‘माझा महाराष्ट्र कुठे चाललाय? राज्य विधिमंडळाच्या पायऱ्यांवर हाणामारी झाली, आणि त्या गोंधळात सहभागी असलेल्यांपैकी काही जणांवर आधीपासूनच गंभीर गुन्हे दाखल असल्याचं समोर येतं. अशा व्यक्तींना राजकीय नेत्यांकडून खुलेआम पाठींबा दिला जातो, त्यांच्यासह विधानभवनात किंवा सभागृह परिसरात वावरण्याची मुभा दिली जाते — हे लोकशाहीच्या अंगावर काटा आणणारे चित्र आहे. जर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना आमदारांचे समर्थन लाभत असेल आणि तेच लोक मारहाणीच्या घटनांमध्ये सक्रिय असतील, तर ‘माझा महाराष्ट्र कुठे चाललाय?’ हा प्रश्न प्रत्येक जागरूक नागरिकाच्या मनात उमटल्याशिवाय राहत नाही. हे दृश्य सामान्य माणसाच्या दृष्टीने नुसते चिंताजनकच नाही, तर भविष्याबद्दल असुरक्षिततेची जाणीव निर्माण करणारे आहे. जर विधिमंडळात गुन्हेगारांचा ठसा उमटू लागला, तर कायदा आणि सुव्यवस्थेची व्याख्याच मोडीत निघेल. मग रस्त्यावर न्याय मागणाऱ्या सामान्य नागरिकासाठी कोणता दरवाजा उरेल? शेवटी एकच प्रश्न राहतो: जर विधिमंडळातच कायदा-संविधानाची पायमल्ली होत असेल, तर रस्त्यावर सामान्य नागरिकाकडून काय अपेक्षा ठेवायची? राजकारणाला पुन्हा शिस्त, संवाद आणि शिष्टाचार या मार्गावर आणणं ही सध्याची काळाची गरज आहे. नाहीतर जनता मतदान करताना ‘नेते नाही, तर नाटके’ या शब्दातच आपला उद्वेग व्यक्त करेल.

Padalkar Awhad विधानभवनात गोंधळाचे राजकारण: लोकशाहीचा अपमान Read More »

raj thackeray

कोणाच्या हातात दिला महाराष्ट्र? आमदार पडळकर आव्हाड प्रकरणात Raj Thackeray स्पष्टच बोलले

Raj Thackeray: विधानभवन परिसरात भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याने एकच खळबळ उडाली असून आता या प्रकरणावरून राजकारण देखील तापायला सुरुवात झाली आहे. काल रात्री आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांसमोर ठिय्या आंदोलन करत आरोपींवर कारवाईची मागणी केली आहे. तर आता या प्रकरणात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया देत काय अवस्था झालीये आपल्या महाराष्ट्राची ? असा प्रश्न उपस्थित केला आहे. राज ठाकरे म्हणाले की, काल विधानभवन परिसरात सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विरोधी पक्षातील आमदार यांच्या कार्यकर्त्यांच्यात तुफान हाणामारी झाल्याची चित्रफीत पाहिली. ही चित्रफीत पाहून मला खरंच प्रश्न पडला, ‘ काय अवस्था झालीये आपल्या महाराष्ट्राची ?’ सत्ता हे साधन असावं साध्य नाही याचा विसर पडल्यामुळे वाट्टेल त्या लोकांना पक्षात घ्यायचं, त्या लोकांचा वापर इतर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांवर गलिच्छ शेरेबाजी करण्यासाठी करायचा आणि पुन्हा राजकीय साधनशुचितेच्या गोष्टी बोलायच्या हा भंपकपणा आता तरी महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आला असेल असं मी मानतो. मी तर मराठी जनतेलाच विचारेन, ‘कोणाच्या हातात दिला आहेत महाराष्ट्र?’ एका दिवसाचा खर्च दीड ते दोन कोटी रुपये मराठी भाषेसाठी, मराठी माणसाच्या अपमानासाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हात उचलला तर त्याच्यावर, आमच्या पक्षावर तुटून पडणारे आता कुठे लपून बसलेत? जेंव्हा मराठी भाषेला किंवा मराठी माणसाच्या गळ्याला कोणी नख लावायचा प्रयत्न केला तर माझा महाराष्ट्र सैनिक त्या व्यक्तीला दणका देतो याचा मला अभिमान आहे कारण ते कृत्य हे व्यक्तिगत हेव्यादाव्यातून येत नाही तर ते माझ्या भाषेसाठी आणि माझ्या मराठी माणसासाठी असतं. माझ्या दिवंगत आमदाराने पण विधानभवनात एका मुजोर आमदाराला दणका दिला होता, तो व्यक्तिगत द्वेषातून नव्हता तर मराठीला कमी लेखायचा प्रयत्न केला होता म्हणून. पण यांचं काय? अचूक आकडेवारी जरी माझ्याकडे नसली तरी, एका जुन्या अंदाजानुसार अधिवेशनाच्या एका दिवसाचा खर्च हा किमान दीड ते दोन कोटी रुपये असतो. हे पैसे तुमच्या व्यक्तिगत शेरेबाजीसाठी वाया घालवायचे? असं राज ठाकरे म्हणाले. पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रात इतके प्रश्न प्रलंबीत आहेत, राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे, कंत्राटदारांची देणी रखडली आहेत, जिल्ह्यांना विकास निधी मिळत नाहीये. सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि मंत्रीच प्रश्न विचारत आहेत की अधिवेशन ही औपचारिकता उरली आहे का? या सगळ्याकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून माध्यमांना खाद्य पुरवण्यासाठी या उथळ गोष्टी घडू दिल्या जात आहेत? आज अशा लोकांना जर माफ केलं गेलं तर यापुढे हे प्रमाण मानून भविष्यात विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी आश्चर्य वाटणार नाही. माध्यमांमध्ये जे काही थोडे सूज्ञ आवाज उरलेत त्यांना विनंती आहे की या भंपक प्रकारणांच्यात तुम्हाला कितीही गुंतवायचा प्रयत्न झाला तरी त्यात अडकू नका आणि सरकारला पण माझं आव्हान आहे की जर थोडी जरी साधनशुचिता शिल्लक असेल तर तुमच्या स्वतःच्या लोकांवर पण कारवाई करून दाखवा. जर ती तुम्हाला करायची नसेल तर हरकत नाही, मग मात्र मुजोर मराठी द्वेष्ट्याना माझे महाराष्ट्र सैनिक हात सोडून सरळ करतील तेंव्हा आम्हाला अक्कल शिकवू नका. असं देखील राज ठाकरे म्हणाले.

कोणाच्या हातात दिला महाराष्ट्र? आमदार पडळकर आव्हाड प्रकरणात Raj Thackeray स्पष्टच बोलले Read More »

jitendra awhad

Jitendra Awhad यांचा पोलिसांच्या गाडीसमोर कार्यकर्त्यांसह ठिय्या; विधान भवनात रात्री घडलं काय?

Jitendra Awhad : विधानभवन परिसरात काल दुपारी झालेल्या राड्याचे पडसाद रात्रभर उमटले. आमदार जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख याला पोलिसांनी रात्री 12 वाजता विधानभवनात अटक केली. मात्र, ही गोष्ट जितेंद्र आव्हाड यांना कळताच ते तात्काळ विधानभवन परिसरात पोहोचले आणि पोलिसांच्या गाडीसमोर कार्यकर्त्यांसह ठिय्या दिला. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आमदार रोहित पवार देखील दाखल झाले. जितेंद्र आव्हाड ठिय्या आंदोलनावर ठाम असताना पोलिसांनी दीड वाजता आंदोलकांची धरपकड केली. जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांची गाडी अडवून ठेवली, पोलिसांनी आव्हाडांना गाडी खालून खेचत बाहेर काढले आणि नितीन देशमुख यांना पोलीस घेऊन गेले. या वेळी आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मकोकाचा आरोपी पसार होतो, जो मार खातो त्यांना पोलीस घेऊन जातात. विधानसभा अध्यक्षांनी शब्द दिला होता नितीनला सोडणार. मात्र, त्यांनी शब्द फिरवला, आम्हाला फसवलं. रात्री 1 वाजता या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आमदार रोहित पवार हे दाखल झाले. असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. तर दुसरीकडे रोहित पवार यांनी देखील या प्रकरणावरून राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. आम्ही नितीन देशमुखला पाठिंबा देतो. विधिमंडळात आव्हाड यांच्यावर हल्ला करायला मकोकाचे 4 माणसं तुम्ही घेऊन येतात. इथे बॉस अध्यक्ष आहेत, त्यांनी दिलेला शब्द जर ते पळत नसतील तर ही लोकशाहीची चेष्टा होत आहे. यांचा हा माज उतरवावं लागेल नाहीतर हे एवढे पुढे जातील , तुमच्या जमिनी घेतील आणि तुमच्या आया बहिणीला हात लावतील अशा विचारसरणीचे काही नेते आहेत. असं रोहित पवार म्हणाले. यानंतर जितेंद्र आव्हाड, रोहित पवार तसेच राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते हे मारिन ड्राइव्ह पोलीस स्टेशनला गेले, मात्र तिथे नितीन देशमुख हे नव्हते. पोलिसांनी आव्हाडांना सांगितले नितीन देशमुख यांना आझाद मैदान पोलीस स्टेशनला ठेवण्यात आलय. जितेंद्र आव्हाड, रोहित पवार हे पोलीस स्टेशनला पोहचले. मात्र, तिथेही नितीन देशमुख नसल्याने कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली. आव्हाड यांना कळले की नितीन देशमुख यांना मेडिकलसाठी जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलय. त्यानंतर आव्हाड, पवार कार्यकर्यांसह रुग्णालयात पोहोचले आणि नितीन देशमुख यांची भेट घेत त्यांची विचारपूस केली.

Jitendra Awhad यांचा पोलिसांच्या गाडीसमोर कार्यकर्त्यांसह ठिय्या; विधान भवनात रात्री घडलं काय? Read More »

pawar's ncp has a new president, jitendra awhad's explanation

जयंत पाटील यांच्या राजीनाम्याच्या चर्चांवर – जितेंद्र आव्हाडांचे स्पष्टीकरण

पवारांच्या राष्ट्रवादीत नवा अध्यक्ष ? या चर्चांना स्वतः पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उघडपणे फेटाळून लावले आहे मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात एक नवा पेच निर्माण झाला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अध्यक्षपदावरून राजीनामा दिल्याच्या चर्चा शनिवारी दिवसभर रंगल्या. मात्र, या चर्चांना स्वतः पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उघडपणे फेटाळून लावले आहे. “ही केवळ खोडसाळपणाची अफवा आहे,” असे आव्हाड यांनी स्पष्ट केले. शनिवारी संध्याकाळनंतर विविध माध्यमांवर जयंत पाटील यांच्या राजीनाम्याची माहिती झपाट्याने पसरू लागली. अनेकांनी या घडामोडींचा अर्थ पक्षातील अंतर्गत उलथापालथ म्हणून लावायला सुरुवात केली. मात्र, आव्हाड यांनी ट्विट करत सांगितले की, “जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि राहणार. त्यांच्या राजीनाम्याच्या अफवा त्या-त्या मंडळींनी स्वतःसाठी तयार केलेल्या आहेत. पक्षात अशा पद्धतीने निर्णय घेतले जात नाहीत.” दरम्यान, जयंत पाटील यांनी यापूर्वीच (१० जून) पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात सूचक विधान केले होते – “नवीन चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे.” यामुळेच त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चांना पुन्हा एकदा बळकटी मिळाली. मात्र, अधिकृतरीत्या त्यांनी कोणताही लेखी राजीनामा दिलेला नाही, असे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शशिकांत शिंदे यांच्या नावाचीही चर्चा रंगली आहे. ते नवा प्रदेशाध्यक्ष म्हणून नेमले जाऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. काही माध्यमांच्या माहितीनुसार, १५ जुलैला या संदर्भात पक्षाकडून अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. राजकीय निरीक्षकांचे मतया चर्चांमुळे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात नेतृत्वबदलाची प्रक्रिया सुरू झाली आहे का, यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अजित पवार गटाच्या तुलनेत आपला पक्ष अधिक तरुण, लढाऊ आणि परिवर्तनशील आहे, हे दाखवण्यासाठी शरद पवार यांच्यासह जयंत पाटील यांचा मार्ग वेगळा आहे का, हा देखील प्रश्न निर्माण होतो. राजीनामा झाला की नाही, याचा निर्णय अधिकृतपणे होईपर्यंत जयंत पाटील यांच्या पुढील वाटचालीकडे राज्यातील राजकीय वर्तुळांचे लक्ष लागले आहे. मात्र, सध्या तरी पक्षाच्या अधिकृत भूमिकेनुसार, पाटीलच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि त्यांचे नेतृत्व अखेर शरद पवारांच्या सल्ल्यानुसारच ठरणार आहे, हे स्पष्ट दिसते.

जयंत पाटील यांच्या राजीनाम्याच्या चर्चांवर – जितेंद्र आव्हाडांचे स्पष्टीकरण Read More »