DNA मराठी

राजकीय

img 20260202 wa0016

Pimpari Chinchwad Municipal Corporation : उपमहापौर पदाच्या निवडीत पिंपरीत शेवटच्या क्षणी ट्विस्ट: भाजपने दुसरा उमेदवार अन् राष्ट्रवादीकडूनही अर्ज दाखल

Pimpari Chinchwad Municipal Corporation : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये भाजपने महापौर पदासाठी रवी लांडगे यांचे नाव जाहीर करताच अनेक घडामोडी घडल्या. महापौर पदासाठी अनेक जण इच्छुक होते. मात्र, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महापौर पदासाठी लांडगे आणि उपमहापौर पदासाठी शितल उर्फ गोरख शिंदे यांच्या नावाचे पत्र पाठवले. त्यानंतर मोठे नाराजी नाट्य घडले. शितल उर्फ गोरख शिंदे यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज भरण्यास नकार दिला. ते महापौर किंवा स्थायी समितीच्या अध्यक्ष पदासाठी इच्छुक होते. मात्र, उपमहापौर पदासाठी नाव आल्याने ते नाराज झाले आणि पालिकेतून निघून गेले. त्यानंतर भाजपने शर्मिला बाबर यांचे नाव निश्चित केले. त्यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी काँग्रेसकडून वैशाली काळभोर यांनीही उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केला. शितल उर्फ गोरख शिंदे यांनी नकार दिल्यानंतर कैलास कुटे, संजय काटे यांची नावे चर्चेला आली होती. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसकडून वैशाली काळभोर यांनी अर्ज दाखल केला. त्यामुळे भाजपकडून ही महिला उमेदवार देण्यात आला. त्यानंतर शर्मिला बाबर यांनी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैशाली काळभोर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही तर सहा तारखेला उपमहापौर पदासाठी निवडणूक होईल. त्यामध्ये भाजपचाच उमेदवार निवडून येईल कारण भाजपकडे 85 नगरसेवक आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे 37 नगरसेवक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत गेली तर त्यांना उपमहापौर पद मिळू शकते. अशी चर्चा आहे. मात्र, या बाबतीत कोणताही निर्णय झालेला नाही. पिंपरी भाजपमध्ये सगळे काही आलबेल नाही आहे. भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे हे महापौर पदासाठी इच्छुक होते. मात्र, प्रदेश पातळीवरून त्यांचे नाव न आल्याने ते नाराज होते. त्यामुळे ते भाजपचे उमेदवार रवी लांडगे यांचा महापौर पदासाठी चा अर्ज भरताना गैरहजर होते. त्याची चर्चा महापालिका वर्तुळात झाली.

Pimpari Chinchwad Municipal Corporation : उपमहापौर पदाच्या निवडीत पिंपरीत शेवटच्या क्षणी ट्विस्ट: भाजपने दुसरा उमेदवार अन् राष्ट्रवादीकडूनही अर्ज दाखल Read More »

sujay vikhe

Ahilyanagar Municipal Corporation: विखे की कर्डिले? अहिल्यानगरच्या निर्णयातून उलगडणारा राहुरीचा अदृश्य मतदारसंघ

Ahilyanagar Municipal Corporation : अहिल्यानगर महानगरपालिकेच्या महापौरपदी ज्योती गाडे यांची सव्वा वर्षासाठी झालेली निवड केवळ महापालिकेपुरती मर्यादित राजकीय घटना मानणे भोळेपणाचे ठरेल. ही निवड स्थानिक स्वराज्य संस्थेतील सत्तावाटपापेक्षा अधिक, जिल्ह्यातील येऊ घातलेल्या राजकीय हालचालींचा पूर्वसंकेत आहे. विशेषतः राहुरी मतदारसंघात स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या पोकळीच्या पार्श्वभूमीवर ही निवड अधिक अर्थवाही ठरते. राधाकृष्ण विखे पाटील हे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे जलसंपदा मंत्री असताना, भाजपचे जिल्ह्यातील राजकारण विखे कुटुंबाच्या अवतीभवती फिरत आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. त्याचवेळी माजी खासदार सुजय विखे पाटील आणि त्यांच्या पत्नी धनश्री विखे यांच्या वाढत्या हालचाली, विशेषतः राहुरी मतदारसंघातील घाटाखालच्या गावांतील सततचे दौरे, गाठीभेटी आणि सामाजिक संपर्क, हे सगळे केवळ योगायोग म्हणून पाहता येणार नाही. राहुरी मतदारसंघावर विखे पाटील घराण्याचे पारंपरिक वर्चस्व आहे. ‘मारणारा-मानणारा’ असा मोठा वर्ग आजही या घराण्याशी जोडलेला आहे. स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांनी कोणतीही मोठी संस्थात्मक उभारणी न करता, केवळ जनसंपर्क, उपस्थिती आणि व्यक्तिगत नात्यांच्या जोरावर या मतदारसंघात आपली पकड निर्माण केली होती. बाणेश्वर संस्थेपुरते मर्यादित कार्यक्षेत्र असतानाही, जनतेशी थेट संवाद ठेवत त्यांनी स्वतःचा स्वतंत्र राजकीय अवकाश तयार केला होता. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी अजूनही भरून निघालेली नाही. याच पोकळीतून भाजपकडून स्वर्गीय आमदारांचे सुपुत्र अक्षय कर्डिले यांचे नाव पुढे येत आहे. सहानुभूतीचा घटक, कर्डिले घराण्याची ओळख आणि स्थानिक कार्यकर्त्यांचा पाठिंबा यामुळे त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, राजकारणात सहानुभूती ही कायमस्वरूपी भांडवल ठरत नाही, हे इतिहासाने वारंवार सिद्ध केले आहे. याचवेळी माजी खासदार सुजय विखे किंवा धनश्री विखे यांची नावे चर्चेत असणे, हे भाजपच्या अंतर्गत सत्तासंतुलनाचे सूचक आहे. ‘विखे की कर्डिले’ ही चर्चा केवळ व्यक्तींची नाही, तर जिल्ह्यात भाजपचा चेहरा कोण असावा, याविषयीची आहे. महापालिकेतील घडामोडी याच संदर्भात पाहाव्या लागतील. महानगरपालिकेच्या सत्तेचे सूत्र आमदार संग्राम जगताप यांच्या खांद्यावर देण्यात आले होते. महापौर निवडीपासून ते सत्ता-समीकरणांपर्यंत, अंतिम निर्णय त्यांच्याच भूमिकेवर अवलंबून राहिला. अशा परिस्थितीत स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांची कन्या आणि गाडे कुटुंबाची सून असलेल्या ज्योती गाडे यांची महापौरपदी निवड, ही केवळ कौटुंबिक किंवा स्थानिक समतोल साधणारी बाब नाही, तर कर्डिले गटाला दिलेला एक राजकीय ‘संकेत’ म्हणूनही पाहिली जात आहे. त्याचवेळी विखे पाटील घराण्याचे नाव या निवडीभोवती फिरणे, हे सत्तेतील अदृश्य हात स्पष्ट करते. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे आमदार आणि माजी मंत्री प्रसाद तनपुरे हेही या सगळ्या गणितात एक महत्त्वाचा घटक आहेत. त्यांनी जर “तीन वर्षांसाठी आमदार व्हायचे कशाला?” असा राजकीय निर्णय घेत माघार घेतली, तर ही पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता निर्माण होते. मात्र, अशा माघारीचा निर्णय हा केवळ वैयक्तिक नसून, तो व्यापक राजकीय भाग असू शकतो. अहिल्यानगरच्या महापौरपदाची निवड त्यामुळे एका नगरसेविकेपुरती मर्यादित राहत नाही. ती राहुरीच्या आगामी पोटनिवडणुकीचा ट्रेलर ठरते. सत्तेची केंद्रे, घराणी, सहानुभूती आणि संधीसाधूपणा या सगळ्यांच्या छेदनबिंदूवर आज जिल्ह्याचे राजकारण उभे आहे. प्रश्न एवढाच आहे की, या संघर्षात जनतेचा मुद्दा केंद्रस्थानी राहतो की पुन्हा एकदा सत्ताकारणाचाच खेळ वरचढ ठरतो? अहिल्यानगरच्या राजकारणाचे उत्तर लवकरच राहुरीच्या रणांगणात मिळणार आहे.

Ahilyanagar Municipal Corporation: विखे की कर्डिले? अहिल्यानगरच्या निर्णयातून उलगडणारा राहुरीचा अदृश्य मतदारसंघ Read More »

Ajit Pawar Memorial : मोठी घोषणा, राज्यात ‘या’ ठिकाणी बांधले जाणार अजित अजित पवारांचे स्मारक

Ajit Pawar Memorial : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती येथे एक स्मारक उभारले जाणार आहे. हे स्मारक पवार कुटुंबाने स्थापन केलेल्या प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थेच्या विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात बांधले जाईल. अजित पवार यांचे जवळचे सहकारी आणि पवार कुटुंबाचे दीर्घकाळ विश्वासू किरण गुजर यांनी ही माहिती दिली. किरण गुजर यांनी सांगितले की, अजित पवार यांच्यावर ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले त्याच ठिकाणी स्मारक उभारण्याचा प्रस्ताव आहे. रविवारी मुंबईला जाण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्यासह अंत्यसंस्कार स्थळाला भेट दिली. यावेळी त्यांनी विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्तांशी आणि इतर संबंधित व्यक्तींशी चर्चा केली आणि अजित पवारांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्मारक बांधण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले. गुजर यांनी सांगितले की, शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितले होते की स्मारकात अजित पवार यांचे सार्वजनिक जीवन, योगदान आणि बारामतीतील समर्पण प्रतिबिंबित झाले पाहिजे. स्मारकाच्या स्वरूपाबाबत लवकरच सविस्तर चर्चा केली जाईल. विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्तांसोबत डिझाईन, लेआउट आणि रचनेला अंतिम स्वरूप देण्यासाठी बैठक घेतली जाईल, असे गुज्जर यांनी सांगितले. अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक शक्तिशाली आणि प्रभावशाली नेते होते, त्यांनी बारामती आणि आसपासच्या परिसराच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली. बारामती हा पवार कुटुंबाचा राजकीय गड मानला जात आहे आणि अजित पवार यांना या प्रदेशातील विकास नेते म्हणूनही ओळखले जात होते. चार दशकांहून अधिक काळ पवार कुटुंबाशी संबंधित असलेल्या किरण गुज्जर यांना अजित पवार यांच्या सर्वात विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक मानले जात असे. सुनेत्रा पवारांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ अजित पवार यांच्या निधनानंतर तीन दिवसांनी शनिवारी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांना उत्पादन शुल्क, क्रीडा, अल्पसंख्याक विकास आणि औकाफ विभागांची जबाबदारी देण्यात आली. पण पूर्वी अजित पवारांकडे असलेले वित्त आणि नियोजन सारखे महत्त्वाचे खाते त्यांना देण्यात आले नाही. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी 62 वर्षीय सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला. सुनेत्रा पवार सध्या राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्य नाहीत, परंतु असे मानले जाते की त्या बारामती विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवू शकतात, ज्याचे प्रतिनिधित्व पूर्वी अजित पवार करत होते.

Ajit Pawar Memorial : मोठी घोषणा, राज्यात ‘या’ ठिकाणी बांधले जाणार अजित अजित पवारांचे स्मारक Read More »

sunetra pawar

Sunetra Pawar: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रितीसंगमावर केले स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

Sunetra Pawar: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज कराड येथील प्रितीसंगमावर महाराष्ट्राचे शिल्पकार आणि पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर, खासदार सुनील तटकरे, खासदार नितीन पाटील, माजी खासदार श्रीनिवास पाटील, माजी आमदार बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, कराडचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच कराड येथे येऊन स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन पुष्पचक्र अर्पण केले. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांचे आणि स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळाचे नातेही अत्यंत जिव्हाळ्याचे होते. ते वारंवार कराड येथे येऊन स्वर्गीय यशवंतराव चव्हाण त्यांच्या समाधीचे दर्शन घेऊन अभिवादन करत होते. त्यांची आठवण यावेळी उपस्थितांना झाली. सुनेत्रा पवार यांनी 31 जानेवारी रोजी राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेते पदी एकमताने निवड केली आहे. मंत्रिमंडळात त्यांना उत्पादन शुल्क, क्रीडा, अल्पसंख्याक विकास आणि औकाफ विभागांची जबाबदारी देण्यात आली आहे.

Sunetra Pawar: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रितीसंगमावर केले स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन Read More »

budget 2026

Budget 2026 : अर्थसंकल्पात महाराष्ट्राला मिळणार सुमारे 1 लाख कोटी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Budget 2026 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा विकसित भारताकडे दमदार वाटचाल करणारा आहे. केंद्रीय करातून महाराष्ट्राला मिळणारा वाटा हा 98,306 कोटी रुपये इतका असणार आहे. याशिवाय अर्थसंकल्पाचे प्राथमिक आकलन करता, 12,355 कोटी विविध प्रकल्पांसाठी आहेत. त्यामुळे सुमारे 1 लाख कोटी महाराष्ट्राला मिळतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना माध्यमांशी ते बोलत होते. शहरीकरणाला नियोजनबद्ध करुन, उद्योग आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देऊन, गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीसाठी खंबीर उपाययोजना या अर्थसंकल्पातून करण्यात आल्या आहेत. पायाभूत सुविधा क्षेत्रात 12 लाख कोटींची गुंतवणूक सरकार करणार आहे, पूर्वी जी केवळ 1 लाख कोटी असायची. 5 लाख लोकसंख्या असलेल्या शहरातील विकासाचा विचार करुन शहरीकरणाच्या एकात्मिक विचार करण्यात आला आहे. यातून विविध क्षेत्रांना दिशा, गती आणि निधी प्राप्त होणार आहे. याचा मोठा लाभ महाराष्ट्राला होणार आहे. शेती, पशुपालन, मत्स्यव्यवसाय आणि सिंचन यासाठी भरीव तरतुदी करण्यात आल्या आहेत. लखपती दिदी योजनेच्या यशानंतर महिलांसाठी स्वतंत्र मॉल्स आणि उद्योगांच्या संधी तयार करण्याची योजना अत्यंत महत्त्वाची आहे. प्रत्येक जिल्ह्यात उच्च शिक्षण घेणार्‍या मुलींसाठी वसतीगृहांची योजना तयार करण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयात आपात चिकित्सा व्यवस्था उभी करण्याचा निर्णय आरोग्य क्षेत्रात मोलाचा ठरेल. मुंबई-पुणे, पुणे-हैदराबाद हायस्पीड कॉरिडॉरमुळे जीडीपीत मोठी वाढ होईल. पुणे-हैदराबाद कॉरिडॉरचा मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राला मोठा लाभ होईल. ग्रोथहबसाठी 5000 कोटी प्रत्येकी 5 वर्षांत प्राप्त होणार आहेत, याचा लाभ मुंबई महानगर (एमएमआर), पुणे महानगर, नागपूर महानगर ग्रोथहबला होणार आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. महाराष्ट्रासाठी काय? महाराष्ट्र ग्रामीण रस्ते प्रकल्प : 378.38 कोटी महाराष्ट्र अ‍ॅग्रीबिझनेस प्रकल्प : 167.28 कोटी सर्वसमावेशक विकासासाठी इकॉनॉमिक क्लस्टर : 283.77 कोटी महाराष्ट्र टर्शरी केअर आणि वैद्यकीय शिक्षण विकास कार्यक्रम : 385.78 कोटी उपसा सिंचन योजनांचे सौर ऊर्जीकरण : 207.10 कोटी शेती आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प : 646.24 कोटी मानवी विकासासाठी कौशल्य आणि अप्लाईड नॉलेज प्रकल्प : 313.65 कोटी जिल्ह्यांमध्ये संस्थात्मक संरचना क्षमतावृद्धीसाठी : 240.90 कोटी मुंबई-अहमदाबाद हायस्पीड कॉरिडॉर : 6103 कोटी मुंबई मेट्रो : 1702 कोटी एमयुटीपी 3 : 462 कोटी एमएमआरमध्ये ग्रीन मोबिलिटी : 155.32 कोटी समृद्धी महामार्गावर आयटीएस : 680.79 कोटी पुणे मेट्रो : 517.74 कोटी (ही केवळ मुंबई, पुण्यातील प्राथमिक आकडेवारी आहे. एकूण : 12,355 कोटी)

Budget 2026 : अर्थसंकल्पात महाराष्ट्राला मिळणार सुमारे 1 लाख कोटी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

sunetra pawar

Sunetra Pawar Oath : शपथविधी आणि सत्तेचा वेग; संवेदनांवर मात करणारी राजकीय गणितं

Sunetra Pawar Oath : महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात प्रथमच एका महिलेनं उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सुनेत्रा पवार यांचा शपथविधी हा केवळ एक प्रशासकीय वा घटनात्मक घटना नव्हे, तर पवार कुटुंबाच्या राजकीय प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला. राज्याला महिला उपमुख्यमंत्री मिळाल्याचा हा क्षण अभिमानास्पद मानावा असा असतानाच, या शपथविधीभोवती निर्माण झालेली अस्वस्थता आणि प्रश्न दुर्लक्षित करता येणार नाहीत. कारण हा शपथविधी अशा काळात पार पडला, की ज्यावेळी महाराष्ट्र अजूनही सहा वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले, पण कधीही मुख्यमंत्रीपद न भूषवलेले आणि सर्वसामान्य माणसांच्या मनात मुख्यमंत्री पदापेक्षाही मोठे घर केलेले अजित पवार यांच्या जाण्याच्या धक्क्यातून सावरलेला नाही. सत्ता आणि पद यांपेक्षा लोकांच्या भावविश्वात खोलवर रुजलेलं एक व्यक्तिमत्त्व हरपल्याची जाणीव अजूनही ताजी आहे. अजित पवार हे नाव केवळ राजकीय नव्हतं; ते थेटपणा, स्पष्टता आणि निर्णयक्षमतेचं प्रतीक होतं. अनेक सर्वसामान्य नागरिक असे होते, ज्यांनी कधी अजित पवार यांना प्रत्यक्ष पाहिलं नव्हतं, कधी त्यांच्याशी थेट संबंधही आला नव्हता. तरीही त्यांच्या जाण्याने ते हळवे झाले. सोशल मीडियावर व्हायरल झालेला तो प्रसंग खिशात पैसे नसलेल्या एका रस्त्यावरील माणसाने वृत्तपत्रातील अजित पवार यांच्या छायाचित्राला फुलं वाहणं हा केवळ भावनिक क्षण नव्हता, तर राजकारण आणि सामान्य माणूस यांच्यातील नात्याचं वास्तव दर्शन घडवणारा क्षण होता. अशा पार्श्वभूमीवर, त्यांच्या अंत्यसंस्कारानंतर लगेचच पवार कुटुंबातील सदस्यांनी मुंबई गाठून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणं, हे घटनात्मकदृष्ट्या योग्य असलं तरी सामाजिक आणि सांस्कृतिक पातळीवर प्रश्न निर्माण करणारं ठरलं. भारताची, विशेषतः महाराष्ट्राची राजकीय संस्कृती ही केवळ सत्ता-समीकरणांवर उभी नाही; ती भावनिक आहे, संवेदनशील आहे आणि काही अंशी अध्यात्मिकही आहे. दुःख, शोक आणि अवकाश या गोष्टी इथे सार्वजनिक जीवनाचाही भाग ठरतात. या शपथविधीमागे कारणं अनेक असू शकतात. अजित पवार यांच्या जाण्यानंतर पक्षातील नेतृत्वाची पोकळी निर्माण होऊ नये, काही नेत्यांना पक्ष हातातून निसटतो की काय अशी भीती वाटत असावी, किंवा यामागे मोठ्या राजकीय सत्तासमीकरणांचाही दबाव असण्याची शक्यता नाकारता येत नाही. राजकारण पोकळी सहन करत नाही, हे वास्तव आहे; मात्र सत्ता भरताना संवेदनांचा विचार कितपत केला गेला, हा प्रश्न उरतोच. हा शपथविधी कायदेशीरदृष्ट्या बरोबर आहे, तरी नैतिक आणि सामाजिक पातळीवर तो अनेक वर्षं लोकांच्या मनात प्रश्न विचारत राहील. “घाई कशाची होती?”, थोडा काळ थांबता आलं नसतं का? आणि सत्ता महत्त्वाची की स्मृती? हे प्रश्न सहज पुढे येतात. लोकशाहीत सत्ता ही अंतिम नसते. ती लोकांच्या विश्वासावर उभी असते. आणि हा विश्वास केवळ निर्णयांनी नव्हे, तर निर्णय घेण्याच्या वेळेनेही जोपासला जातो. सुनेत्रा पवार यांचा शपथविधी इतिहासात नोंदला जाईलच, पण तो महाराष्ट्राच्या राजकारणात संवेदनशीलतेच्या कसोटीवर मोजला जाणारा एक संदर्भबिंदू म्हणूनही दीर्घकाळ लक्षात राहील, यात शंका नाही.

Sunetra Pawar Oath : शपथविधी आणि सत्तेचा वेग; संवेदनांवर मात करणारी राजकीय गणितं Read More »

sunetra pawar dcm

सुनेत्रा पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ

राज्याचे पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी आज शपथ घेतली आहे. अजित पवार यांचा बारामती येथे एका विमान अपघातात झालेल्या निधनानंतर आज राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून या शपथविधीनंतर सुनेत्रा पवार बारामतीला जाणार आहे. पुढील 10 दिवस सुनेत्रा पवार बारामतीतच मुक्काम करणार असल्याचे सांगितले जात आहे.

सुनेत्रा पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ Read More »

mahesh landge

Mahesh Landge : अजितदादांच्या स्मरणार्थ पिंपरी-चिंचवडमध्ये ‘अजित सृष्टी’ उभारा; आमदार महेश लांडगे

Mahesh Landge : महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे लोकनेते, उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या स्मरणार्थ पिंपरी-चिंचवडमध्ये नवीन प्रशासकीय इमारतीच्या आवारात भव्य स्मारक उभारण्यात यावे अशी मागणी भाजप आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. यासाठी त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देखील दिले आहे. या निवेदनात महेश लांडगे म्हणाले की, ”दिवंगत अजितदादांच्या स्मरणार्थ पिंपरी-चिंचवड शहरात ‘अजित सृष्टी’ उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार आहे. यासंदर्भात पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाला तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नवनिर्वाचित नगरसेवकांच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत या प्रस्तावास मंजुरी देण्यात येणार आहे. “पिंपरी-चिंचवड शहर देशातील क्रमांक एकचे शहर बनवण्याचे दिवंगत अजितदादांचे स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.” ‘अजित सृष्टी’च्या माध्यमातून अजितदादांची विकासदृष्टी, लोककल्याणाची भावना आणि शहराच्या प्रगतीसाठीचे योगदान पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.” अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या सर्वांगीन विकासाला गती दिली. पायाभूत सुविधा, नागरी सेवा, प्रशासकीय निर्णयक्षमता आणि विकासाभिमुख धोरणांमुळे महाराष्ट्राला वेगळी ओळख मिळाली. असे नेतृत्व अकाली काळाच्या पडद्याआड जाणे ही राज्याची मोठी हानी आहे, त्यांच्या कार्याची जपणूक होणे ही गरज आहे. त्यामुळे नवनिर्वाचित नगरसेवकांच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत अजितदादांच्या स्मारकाचा प्रस्ताव मंजूर करून शहरवासी यांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात यावी, यासाठी आम्ही आग्रही आहोत. तत्पूर्वी जुन्या महापालिका सभागृहात अजितदादांचे तैलचित्र तातडीने बसवण्यात यावे, अशी सूचना प्रशासनाला केली आहे, असल्याचे लांडगे यांनी सांगितले. नवीन प्रशासकीय इमारतीच्या आवारात उभारण्यात येणारे स्मारक, सभागृहाला दिले जाणारे त्यांचे नाव आणि ‘अजित सृष्टी’ ही संकल्पना भविष्यातील पिढ्यांना लोकसेवेची प्रेरणा देत राहील. याबाबत महापालिका प्रशासन सकारात्मक निर्णय घेईल, असा मला पूर्ण विश्वास आहे. त्यासाठी आम्ही सर्वोतोपरी पाठपुरावा करणार आहोत, असे आमदार लांडगे म्हणाले.

Mahesh Landge : अजितदादांच्या स्मरणार्थ पिंपरी-चिंचवडमध्ये ‘अजित सृष्टी’ उभारा; आमदार महेश लांडगे Read More »

new chapter in the power struggle within the nationalist party

Sharad Pawar: वारसा, घाई आणि भीती : राष्ट्रवादीतील सत्तासंघर्षाचा नवा अध्याय

Sharad Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली. स्पष्टवक्तेपणा, निर्णयक्षमता आणि प्रशासनावरची पकड यामुळे ‘दादा’ हे केवळ एक व्यक्तिनाम न राहता एक राजकीय प्रवाह बनले होते. मात्र त्यांच्या पार्थिवाचे विसर्जन होण्याआधीच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये जी घाई सुरू झाली, ती केवळ अस्वस्थ करणारीच नव्हे तर अनेक प्रश्न उपस्थित करणारी ठरते. स्वर्गीय अजित पवार यांच्या जाण्यानंतर अवघ्या काही तासांत पक्षाची सूत्रे हातात घेण्याची धडपड सुरू झाली. प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ हे चार नेते अचानक केंद्रस्थानी आले. प्रश्न असा की, इतक्या वेगाने निर्णय घेण्याची गरज नेमकी कुणाला आणि का भासली? शोक, आत्मपरीक्षण आणि संघटनात्मक संवाद याऐवजी सत्तेची घाई दिसणे, हेच या साऱ्या प्रक्रियेचे भयावह वास्तव आहे. खरे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पुन्हा एकत्र यावेत, ही इच्छा शरद पवार आणि अजित पवार या दोघांचीही होती. त्या दिशेने प्रयत्नही झाले होते. मात्र शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली जाण्यास या चौघांचा ठाम विरोध होता, हे आता उघडपणे समोर येत आहे. मग प्रश्न उरतो हा विरोध राजकीय मतभेदांचा होता की वैयक्तिक भीतीतून जन्मलेला? आज सुमित्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. त्यांच्याकडे पक्षाची राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारीही जाऊ शकते. अजित पवार यांचा कणखरपणा, निर्णयातील ठामपणा आणि संघर्ष करण्याची वृत्ती सुमित्रा पवार यांच्यात कितपत उतरते, हे येणारा काळच ठरवेल. मात्र एवढे निश्चित की त्यांच्यासमोरचा रस्ता सोपा नाही. या साऱ्या घडामोडींमध्ये सर्वाधिक गोंधळात टाकणारा मुद्दा म्हणजे या चार नेत्यांना नेमकी कसली भीती वाटते? अजित पवार आणि शरद पवार एकत्र येऊ नयेत यासाठी पडद्यामागे प्रयत्न झाले, भाजपाचा हात धरला गेला, हेही आता लपून राहिलेले नाही. दादांचा निर्णय मात्र वेगळा होता. पक्ष स्वबळावर उभा राहावा, हीच त्यांची भूमिका होती. आज मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटात नेतृत्वाचा ठोस चेहरा दिसत नाही. उलट पक्ष ‘कोणी चालवत आहे’ यापेक्षा ‘कोणाच्या दबावाखाली चालतो आहे’ असा प्रश्न अधिक ठळकपणे समोर येतो. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ या चौघांवरही भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यामुळे भाजपाच्या राजकीय चौकटीबाहेर जाण्याची त्यांची क्षमता मर्यादित आहे. परिणामी, हा पक्ष स्वतंत्र राजकीय भूमिका घेण्याऐवजी भाजपाच्या छायेत चालेल, अशी भीती वाटणे साहजिक आहे. दरम्यान, सुमित्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री शपथविधीची माहिती शरद पवार यांना नव्हती, असा त्यांचा दावा आहे. हे खरे असेल तर दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या एकत्र येण्याच्या शक्यतेवर सध्या तरी पडदा पडतो. संवादाऐवजी अविश्वास, समन्वयाऐवजी सत्तासंघर्ष आणि वारशाऐवजी स्वार्थ अशी ही सध्याची स्थिती आहे. अजित पवार यांचा राजकीय वारसा केवळ पदांनी जिवंत राहत नाही;तो मूल्यांमधून, निर्णयांमधून आणि स्वाभिमानातून पुढे जातो. तो वारसा टिकवायचा असेल तर घाई नव्हे, धैर्य लागेल. अन्यथा, राष्ट्रवादीतील ही घडामोड इतिहासात एका संधीच्या अपव्यय म्हणूनच नोंदली जाईल.

Sharad Pawar: वारसा, घाई आणि भीती : राष्ट्रवादीतील सत्तासंघर्षाचा नवा अध्याय Read More »

sunetra pawar dcm

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार होणार महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री; संध्याकाळी शपथविधी ?

Sunetra Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झाल्यानंतर अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होणार आहे. सुनेत्रा पवार आज संध्याकाळी 5 वाजता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. यापूर्वी दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांना विधिमंडळाच्या गटनेते पदी निवड करण्यात येणार आहे. बुधवारी सकाळी बारामतीला जाताना अजित पवार यांचे विमान कोसळले, त्यात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सुनेत्रा पवारांशी बोलून त्यांना जबाबदारी स्वीकारण्यास सांगितले आहे. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री होण्यास सहमती दर्शविली आहे.   महाराष्ट्राचे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले की, शनिवारी विधिमंडळ पक्षाची बैठकही बोलावण्यात आली आहे, जिथे सुनेत्रा पवार यांना नेतेपद देण्यात येईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार यांना उत्पादन शुल्क आणि क्रीडा मंत्रालय मिळेल, तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्थखाते राहील. सुनेत्रा पवार सध्या राज्यसभेच्या खासदार आहेत आणि भविष्यात त्या अजित पवारांच्या जागेवरून निवडणूक लढवू शकतात असे म्हटले जात आहे. सुनेत्रा पवार यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, परंतु सुप्रिया सुळे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) कार्यालयात पत्रकारांशी बोलताना भुजबळ म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, जर पक्षाच्या विधिमंडळ पक्षाने यावर निर्णय घेतला तर शनिवारीच त्यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी समारंभाला त्यांना कोणतीही अडचण नाही. भुजबळ म्हणाले, “राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाची बैठक शनिवारी बोलावली जाईल, ज्यामध्ये सुनेत्रा पवार यांना नेते बनवले जाईल. अनेक नेत्यांना वाटते की त्यांना उपमुख्यमंत्री बनवावे.” ते म्हणाले की, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे विधिमंडळ पक्षनेते आणि नंतर उपमुख्यमंत्रीपदाचे रिक्त पद भरणे. तर दुसरीकडे अजित पवार यांच्या मृत्यूची चौकशी राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपवण्यात आली आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे ग्रामीण पोलिस सुरुवातीला या प्रकरणाचा तपास करत होते. पुणे ग्रामीण पोलिसांनी या अपघातासंदर्भात भारतीय नागरी सुरक्षा संहितेच्या कलम 194 अंतर्गत अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला होता. सरकारने पुणे ग्रामीण पोलिसांना आतापर्यंत गोळा केलेले प्रकरणाचे तपशील आणि पुरावे राज्य सीआयडीकडे सोपवण्याचे निर्देश दिले आहेत.

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार होणार महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री; संध्याकाळी शपथविधी ? Read More »