DNA मराठी

ताज्या बातम्या

Loksabha Election : महाराष्ट्र दिल्ली पुढं कधी झुकणार नाही – अमोल कोल्हे

Loksabha Election :  2024 ची लोकसभा निवडणूक ही प्रतिष्ठेची असेल सर्वसामान्य माणसांच्या स्वाभिमानाचे असेल त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ही सर्वसामान्य जनता मतदानातून उत्तर देईन, महाराष्ट्र दिल्ली पुढे कधीही झुकला नाही आणि झुकणारही नाही. असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) खासदार अमोल कोल्हे यांनी सत्ताधारी महायुतीला दिला आहे.   अजित पवार यांनी शिरूरमध्ये अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली होती यावर बोलताना अमोल कोल्हे म्हणाले एवढ्या मोठ्या नेत्यावर मी काय बोलणार मला तीन वेळेस सांसद रत्न पुरस्कार मिळाला आहे. ज्या पद्धतीने शिरूर मतदार संघामध्ये काम सुरू आहे त्यामुळे हे काम बोलेल त्यामुळे दादांच्या टिकेवर भाष्य करणे मला उचित वाटत नाही त्यांच्या टीकेला उत्तर द्यायला मी बांधील नाही मी आदरणीय शरद पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो त्यामुळे पवार साहेब बोलतील त्या गोष्टीला मी बांधील. याच बरोबर आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडी महायुतीपेक्षा जास्त लोकसभा जागांवर विजय प्राप्त करणारा असा विश्वास देखील त्यांनी DNA मराठीशी बोलताना व्यक्त केला.

Loksabha Election : महाराष्ट्र दिल्ली पुढं कधी झुकणार नाही – अमोल कोल्हे Read More »

Jamkhed News: धक्कादायक! मुकादमावर गोळीबार, दोघांवर गुन्हा दाखल

Jamkhed News : जामखेड तालुक्यातील पाटोदा येथे मुकादमावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  दिड वर्षांपुर्वी जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केल्याच्या रागावरून गोळीबार करण्यात आल्याची बातमी मिळाली आहे.   या गोळीबारात मुकादमाच्या पायाला गोळी लागून जखमी झाले आहेत. त्यांनाला पुढील उपचारासाठी अहमदनगर येथे पाठविण्यात आले.  गोळीबार करणारे दोन आरोपी फरार असून त्यांच्यावर जामखेड पोलीस स्टेशनला जीवे मारण्याचा प्रयत्न व आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपींचा शोध नगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व जामखेड पोलीस लक्ष ठेवून आहेत.   बाबुलाल पठाण  हे ऊसतोड कामगारांचे मुकादम आहेत. याच्याकडे लक्ष्मण कल्याण काळे  हा ऊसतोड मजुर कामाला होता. सदर मजुर लक्ष्मण काळे यास आर्थिक कारणावरून दिड वर्षांपुर्वी यातील आरोपी अक्षय उर्फ विश्वनाथ मोरे याने मारहाण केली होती. म्हणून दिड वर्षां पुर्वी जामखेड पोलीस स्टेशनला अक्षय मोरे विरोधात तक्रार नोंदवली होती.  याचाच मनात राग धरून 3 मार्च रोजी रात्री एक वाजता आरोपी अक्षय ऊर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने फिर्यादी आबेद पठाण यांच्यावर तीन राऊंड फायर केले. यामध्ये एक गोळी आबेद पठाण यांच्या पायाला लागल्याने ते या गोळीबारात जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने नगर येथील शासकीय दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  गोळीबार झाल्यावर आरोपी एका कलाकेंद्र चालकाच्या नातेवाईकाची गाडी घेऊन फरार झाला आहे. त्यामुळे  पोलिसांनी सध्या चौकशीसाठी दोन जणांना ताब्यात घेतले आहेत.

Jamkhed News: धक्कादायक! मुकादमावर गोळीबार, दोघांवर गुन्हा दाखल Read More »

Ahmednagar News : खासदार विखेंच्या हस्ते कर्तृत्ववान महिलांचा सन्मान!

Ahmednagar News:  जनसेवा फाउंडेशनच्या वतीने येणाऱ्या महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर जामखेड येथे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान आणि सांस्कृतिक महोत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आले होते. जामखेड महाविद्यालय येथे हा भव्य कार्यक्रम संपन्न झाला असून यावेळी महिला भगिनींनी कार्यक्रमासाठी प्रचंड गर्दी करत उपस्थिती दर्शविली.  यावेळी विविध क्षेत्रांमध्ये आपल्या अनमोल कार्याने आपला ठसा उमटविणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सन्मानित करण्यात आलेल्या सर्व महिला भगिनींचे खासदार विखेंनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देत त्यांच्या माध्यमातून होणाऱ्या कार्याला सदिच्छा दिल्या. यावेळी महिला भगिनींचे मनोरंजन करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले होते. या कार्यक्रमात भव्य लकी ड्रॉ, पैठणी आणि बरच काही.. या थीम अंतर्गत विविध स्पर्धांचे देखील आयोजन करण्यात आले होते. तसेच या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. सोनालीने आपल्या नृत्याने उपस्थितांची मने जिंकत हा सोहळा अधिक खास बनवला.  विशेष म्हणजे जामखेड मध्ये पहिल्यांदाच असा कार्यक्रम झाला की त्या कार्यक्रमात महिलांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी पाहायला मिळाली. या आधी इतक्या प्रचंड संख्येने कोणत्याच कार्यक्रमाला गर्दी पहायला मिळाली नव्हती. तालुक्यातील व जामखेड शहरातील असंख्य महिलांनी सहभागी होत या कार्यक्रमाचा उत्साह द्विगुणित केला. जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाची संपूर्ण तालुक्यात चर्चा होत आहे.  उत्कृष्ट नियोजन आणि महिलांचे संघटन काय असते हे या कार्यक्रमाकडे बघून सर्वांना समजले. मुळात म्हणजे महिला भगिनींनी अतिशय मनसोक्तपणे या कार्यक्रमाचा आनंद लुटला. तसेच ज्या महिलांचा सन्मान येथे करण्यात आला त्या महिलांकडून सर्वांनी प्रेरणा घ्यावी आणि त्या दिशेने वाटचाल करावी. मदतीसाठी विखे कुटुंबीय सदैव तत्पर आहे असे संबोधित केले. या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्या शोभा आरोळे, शिक्षण क्षेत्रात योगदान देणाऱ्या बेबी हसीना खान, सामाजिक कार्यकर्त्या उमा जाधव, बचत गटाच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणाऱ्या मनीषा मोहळकर, नॅशनल खेळाडू माधुरी भोसले, पीएसआय गायत्री राळेभात, जनविकास सेवाभावी संस्था चालविणाऱ्या लक्ष्मीताई पवार, सामाजिक कार्यकर्त्या निलम साळवे, उत्कृष्ट शेती करणाऱ्या काजल मासाळ, बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांचे संघटन करणाऱ्या मनिषा वडे, आधुनिक शेती आणि शेतीपूरक दूध व्यवसाय करणाऱ्या पल्लवी बरबडे, पार्वती खेतमाळस, विविध प्रकारचे मसाले तयार करणारे इंद्रजीत कांबळे, अगरबत्ती व समई वात करणाऱ्या राणी गावडे, दुग्ध प्रक्रिया उद्योग चालविणाऱ्या जयश्री बेंद्रे आदी कर्तृत्ववान महिलांना सन्मानित करण्यात आले.

Ahmednagar News : खासदार विखेंच्या हस्ते कर्तृत्ववान महिलांचा सन्मान! Read More »

Ahmednagar News: महाविद्यालयात येणारा विद्यार्थी कोचिंग क्‍लासकडे का वळाला? राधाकृष्‍ण विखे पाटील

Ahmednagar News: नव्‍या शैक्षणिक धोरणाच्‍या अंमलबजावणीमध्‍ये कौशल्‍य शिक्षणाला दिलेले प्राधान्‍य विचारात घेवून औद्योगिक क्षेत्राला आवश्‍यक असलेले मनुष्‍यबळ निर्माण करण्‍याचे काम विद्यापीठाच्‍या उपकेंद्रातून व्‍हावे अशी अपेक्षा महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी व्‍यक्‍त  केली.  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्‍या नगर येथील उपकेंद्राचे उद्घाटन पालकमंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या उपस्थितीत संपन्‍न झाले. उच्‍च व तंत्रशिक्षण मंत्री ना.चंद्रकांत पाटील दुरदृष्‍य प्रणालीव्‍दारे या कार्यक्रमात सहभागी झाले होते.  खासदार डॉ.सुजय विखे पाटील, जिल्‍हाधिकारी सिध्‍दराम सालिमठ, जिल्‍हा बॅकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले, विद्यापीठाच्‍या व्‍यवस्‍थापन परिषदेचे सदस्‍य राजेंद्र विखे पाटील, कुलगुरु डॉ.सुरेश गोसावी, प्र.कुलगुरु डॉ.पराग काळकर यांच्‍यासह व्‍यवस्‍थापन परिषदेचे सर्व सदस्‍य याप्रसंगी उपस्थित होते.   मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, नगर येथे उपकेंद्र व्‍हावे यासाठी सुरु असलेल्‍या प्रयत्‍नांना अनेक वर्षांनंतर यश आले. या केंद्रासाठी पुढाकार घेणा-या सर्वांचेच अभिनंदन करुन, उपकेंद्र आता नगर येथे सुरु झाल्याने अधिकची जबाबदारी वाढली आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली केंद्र सरकारने दिलेल्या नव्‍या राष्‍ट्रीय शैक्षणि‍क धोरणाची अंमलबजावणी करण्‍याचे मोठे आव्‍हान आपल्‍या सर्वांपुढे आहे. त्‍यासाठी आता विद्यापीठां बरोबरच महाविद्यालयांनीही पुढाकार घेण्‍याचे त्‍यांनी आवाहन केले.  आज शिक्षणाच्‍या परिभाषा सर्व बदलल्‍या आहेत. एकाच वेळी अनेक विद्या शाखांचे ज्ञान संपादन करण्‍याची प्रक्रीया गतीने पुढे जात आहे. यामध्‍ये पुणे विद्यापीठालाही मागे राहुन चालणार नाही. कारण केवळ बी.ए, बी.कॉम सारख्‍या तत्‍सम पदव्‍या घेवून विद्यार्थी आता स्‍पर्धेत टिकू शकणार नाही.  यासाठी या पदवी शिक्षणा बरोबरच विद्यार्थ्‍यांना कौशल्‍य  आणि तांत्रिक शिक्षणही कसे घेता येईल याचाही विचार व्‍हावा असे सुचीत करुन, मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, नगर येथे सुरु झालेले उपकेंद्र हे कौशल्‍य शिक्षणाचे एक महत्‍वपूर्ण केंद्र ठरावे यासाठी कौशल्‍य विकासाचे सर्व कोर्स येथे तातडीने सुरु करुन, विद्यार्थ्‍यांना संधी देण्‍याची व्‍यवस्‍था  निर्माण करावी.   विद्यापीठाने आता आपली व्‍याप्‍ती वाढविणे गरजेचे आहे. कारण यापुर्वी विद्यापीठं एका चाकोरीमध्‍ये अडकली गेली. ए.आय.सी.टी, यु.जी.सी यांसारख्‍या कमिट्यांच्‍या मार्गदर्शक सुचनांमुळे आजपर्यंत संस्‍था  कार्यरत राहील्‍या. परंतू आता या कमिट्यांचेच योगदान काय? असा प्रश्‍न  विचारण्‍याची वेळ आली आहे असे स्‍पष्‍ट करुन, याबाबत आता केव्‍हा तरी प्रधानमंत्र्यांशी आपण बोलणार असून, जिल्‍ह्यांमध्‍ये असलेल्‍या शैक्षणिक संस्‍थाची संख्‍या लक्षात घेवून प्रत्‍येक जिल्‍ह्यात आता स्‍वतंत्र विद्यापीठ निर्माण करण्‍याची मागणीही त्‍यांनी आपल्‍या भाषणात केली.  शिक्षण व्‍यवस्‍थेमध्‍ये कोचिंग क्‍लासचा वाढलेला हस्‍तक्षेप हे व्‍यवस्‍थेच अपयश आहे. या कोचिंग क्‍लासवर आपण कुठलेही नियंत्रण आणू शकलो नाही. महाविद्यालयात येणारा विद्यार्थी या कोचिंग क्‍लासकडे का वळाला? याचे आत्‍मपरिक्षण करण्‍याची गरज ना.विखे पाटील यांनी आपल्‍या भाषणातून व्‍यक्‍त केली. खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी उपकेंद्राच्‍या इमारतीची निर्मिती ही स्‍व.दादा पाटील शेळके यांची स्‍वप्‍नपुर्ती असून, 25 वर्षे न सुटलेला प्रश्न हा मागील दोन वर्षात मार्गी लागला. या उपकेंद्राच्‍या इमारतीमुळे गावाचे अन्‍य प्रश्‍नही सोडविण्‍याची ग्‍वाही त्‍यांनी दिली.  याप्रसंगी कुलगुरु डॉ.सुरेश गोसावी, डॉ.राजेंद्र विखे पाटील यांनीही आपले मनोगत व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालक सिनेट सदस्‍य सचिन गोर्डे यांनी केले.  विद्यापीठाच्‍या विस्‍तारासाठी जिल्‍हा नियोजन व विकास समितीच्‍या माध्‍यमातून 5 कोटी रुपयांचा निधी तसेच ई-बस उपलब्‍ध  करुन देण्‍याची केलेली मागणी मंत्री विखे पाटील यांनी मान्‍य करुन, या उपकेंद्राकडे येणा-या रस्‍त्‍याचे रुंदीकरण व विद्युतीकरणासाठी मदत करण्‍याचे आश्‍वासन त्‍यांनी दिले.

Ahmednagar News: महाविद्यालयात येणारा विद्यार्थी कोचिंग क्‍लासकडे का वळाला? राधाकृष्‍ण विखे पाटील Read More »

Ahmednagar Politics: बाळासाहेब तुम्ही आता विधानसभा लढा; कार्यकर्त्यांचा सुर

Ahmednagar Politics : अहमदनगर शहरात लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीच विधानसभेच्या निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली असल्याचे दिसून येत आहे.  महानगरपालिकेमध्ये गेले 35 वर्ष नगरसेवक राहिलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्या समर्थकांनी नुकतीच एक बैठक घेऊन यामध्ये विधानसभेची आता तुम्ही तयारी करा व निवडणूक लढवा असा सूर कार्यकर्त्यांनी बैठकीमध्ये जाहीरपणे मांडला. बाळासाहेब बोराटे हे गेले 35 वर्ष नगरपालिकेचे उपाध्यक्ष त्यानंतर महानगरपालिकेमध्ये नगरसेवक, विरोधी पक्ष नेते, नियोजन समितीचे सभापती यांसह विविध पदांवर आपल्या कार्याची छाप पाडली आहे.   नुकत्याच त्यांच्या समर्थकांनी तीन दिवसापूर्वी एक बैठक नगर येथे घेतली. या बैठकीमध्ये अनेक कार्यकर्ते पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते आणि त्यांनी आपापली भूमिका मांडली. बाळासाहेब बोराटे यांनी नगर शहरांमध्ये विविध सामाजिक, धार्मिक उपक्रमाच्या माध्यमातून एक नावलौकीक मिळविलेला आहे.  त्यामुळे त्यांनी आता मागे न हटता आगामी काळामध्ये नगर शहरांमध्ये विधानसभेसाठी निवडणूक लढवावी अशी भूमिका या बैठकीमध्ये अनेक जणांनी मांडली व त्याला सर्वांनी पाठिंबा सुद्धा दिला.  या बैठकीमध्ये बोराटे यांचा गेल्या 35 वर्षांमध्ये केलेल्या कामाचा आढावा सुद्धा यावेळी मांडला. श्री. बोराटे यांनी सामाजिक, धार्मिक, राजकीय, कला, क्रीडा या सर्व क्षेत्रांमध्ये योग्य तो समतोल राखलेला असल्याने आज सर्वच क्षेत्रातील व्यक्ती त्यांच्याशी आपुलकीचे नाते तयार झाले आहे.  महानगरपालिकेच्या माध्यमातून असो अथवा कुठल्याही क्षेत्रामध्ये असो नागरिकांना जिथे जिथे अडचण होत आहे. तिथे सोडवण्यासाठी ते अग्रेसर राहिलेले आहेत अशी एक ना अनेक उदाहरणे देता येतील नगर शहराच्या प्रत्येक भागांमध्ये त्यांच्या दांडगा संपर्क आहे.  त्यामुळे त्यांनी आता महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आयोजित विधानसभेची निवडणूक लढवावी असे अनेकांचे मत आहे त्या दृष्टिकोनातून सुद्धा या बैठकीमध्ये सविस्तर अशी चर्चा पदाधिकाऱ्यांमध्ये झाली पदाधिकाऱ्यांनी आम्ही बोराटे यांच्या पाठीशी ठामपणे आहोत व राहणार आहोत पण यंदा मागचा सर्व अनुभव पाहता त्यांना सुद्धा पक्षाने उमेदवारी द्यावी अशी सुद्धा अनेकांनी भूमिका मांडलेली आहे.  पण दुसरीकडे यांनी निवडणूक लढवताना विधानसभा हेच ध्येय समोर ठेवावे अशावर सर्वांचे एकमत झालेले आहे.

Ahmednagar Politics: बाळासाहेब तुम्ही आता विधानसभा लढा; कार्यकर्त्यांचा सुर Read More »

Tattoo Disadvantage : सावधान, टॅटू काढणं पडू शकतं महागात, जाणून घ्या ‘हे’ धोके

Tattoo Disadvantage : आज अनेकजण स्टायलिश दिसण्यासाठी किंवा जवळच्या मित्रमैत्रिणींनीमुळे शरीरावर  टॅटू काढतात. जर तुम्ही देखील टॅटू काढण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे.   परमनंट टॅटू काढणं तुमच्या ह्रदयासाठी महागात पडू शकतं. कारण याबाबत करण्यात आलेल्या एका नव्या संशोधनात असं आढळून आलं आहे की, टॅटू काढलेल्या लोकांना ह्रदय समस्या होण्याचा धोका जास्त असतो. याचं कारण असं क टॅटू काढलेल्या त्वचेखालील ग्रंथींचे नुकसान झाल्यामुळे अशा त्वचेवर घाम येत नाही. ज्यामुळे तुमच्या शरीराचे तापमान नियंत्रित राहत नाही आणि ह्रदयाचे नुकसान होऊ शकते.  कारण शरीराचे कार्य सुरळीत सुरू राहण्यासाठी तुमच्या शरीराचे तापमान नियंत्रित राहणे फार गरजेचं आहे. जर्नल ऑफ अप्लाइड फिजिओलॉजीमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधनानुसार टॅटू काढलेल्या त्वचेवर घाम येण्याची क्षमता कमी होते. टॅटू काढलेल्या त्वचेवर का येत नाही घाम? घाम येणं ही शरीराची एक नैसर्गिक व्यवस्था आहे. कारण घामामुळे तुमच्या शरीराचे तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते. शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठीच आपल्या शरीरावर रोमछिद्रे असतात. ज्यातून सतत घाम पाझरत असतो आणि घामामुळे तुमचे शरीर थंड होते आणि शरीराचे तापमान नियंत्रित राहते.  टॅटू काढल्यामुळे त्वचेखाली घाम निर्माण करणाऱ्या ग्रंथींचे नुकसान होते. कारण टॅटू काढताना तुमच्या त्वचेवर एका मिनीटामध्ये जवळजवळ तीन हजारांपेक्षा जास्तवेळा सुई टोचली जाते. त्वचेवर असे वेदन झाल्यामुळे त्वचेखालील ग्रंथीचे नुकसान होते आणि त्यांचे कार्य मंदावते. याचाच परिणाम असा होतो की अशा त्वचेवर घाम कमी प्रमाणात येतो.  घामाचे प्रमाण कमी झाल्यामुळे तुमच्या शरीराचे तापमान वाढत जाते. काही संशोधनात असंही आढळलं आहे की टॅटू काढलेल्या त्वचेवर येणाऱ्या घामात सोडिअमचे प्रमाण जास्त असते. याचा अर्थ अशा त्वचेखाली घाम निर्माण करणाऱ्या ग्रंथीचे कार्य व्यवस्थित सुरू नाही असा होतो.  टॅटूमुळे ह्रदय विकार होण्याची शक्यता वाढते टॅटू काढल्यामुळे तुमच्या त्वचेवर खूप कमी घाम येतो. ज्याचा परिणाम तुमच्या शरीराच्या तापमानावर आणि पर्यायाने ह्रदयावर होतो. टॅटू काढलेल्या लोकांना हार्ट अटॅक येण्याची शक्यता जास्त असते. कारण हार्ट अटॅक तेव्हा येतो जेव्हा तुमच्या शरीराचे तापमान जास्त प्रमाणात वाढते.  हार्ट अॅटकमुळे जीवाला धोका असल्यामुळे लवकर उपचार मिळणं गरजेचं असतं. शिवाय जरी अशा परिस्थितीतून रूग्ण वाचला तरी आयुष्यभर त्याचे ह्रदय कमजोरच राहते. म्हणूनच परमनंट अथवा संपूर्ण शरीरावर टॅटू काढून घेणं तुमच्या ह्रदयाच्या आरोग्यासाठी हितकारक नाही. त्यामुळे स्टायलिश दिसण्यासाठी टॅटू काढा पण त्यामुळे तुमच्या शरीर आणि आरोग्यावर काही परिणाम होणार नाही याची अवश्य काळजी घ्या.  कारण फक्त फॅशन म्हणून एखादी गोष्ट करण्यापूर्वी त्यामुळे जर तुमच्या आरोग्याचं नुकसान होणार असेल तर याबाबत वेळीच सावध राहणं गरजेचं आहे.

Tattoo Disadvantage : सावधान, टॅटू काढणं पडू शकतं महागात, जाणून घ्या ‘हे’ धोके Read More »

Ice Cream Benefits : काय सांगता, आईस्क्रिम खाल्ल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे

Ice Cream Benefits : राज्यात आता उन्हाळा सुरू झाला आहे. यामुळे आता राज्यात आंबे, फणसची मागणी वाढली आहे.  उन्हाळ्याच्या दिवसात जसे आंबे, फणस खाल्ल्याचा मोह अनेकांना आवरत नाही त्याचप्रमाणे कडक उन्हात आईस्क्रिमची चव चाखणं अनेकांना आवडते. अधिक आईस्क्रिम खाल्ल्यास सर्दी, खोकल्याचा त्रास होतो असे सांगत लहान मुलांना आईस्क्रिम खाण्यापासून दूर केले जाते परंतू प्रमाणात आईस्क्रिम खाल्ल्यास आरोग्याला फायदादेखील होतो हे तुम्हांला ठाऊक आहे का ?   आरोग्यदायी आईस्क्रिम    आईस्क्रिम हे आरोग्यदायी असल्याचे काही संशोधनातून समोर आले आहे. हावर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ रिसर्चच्या अहवालानुसार आईस्क्रिममध्ये नाइसिन, थाइमिन आणि व्हिटामिन A,D,B हे घटक मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे प्रमाणात आईस्क्रिमचे सेवन केल्यास आरोग्याला त्याचा फायदा होऊ शकतो.   कॅल्शियम  आईस्क्रिममध्ये व्हिटॅमीन डी मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे शरीरात कॅल्शियमचे शोषण उत्तमप्रकारे होण्यास मदत होते.  डोळ्यांसाठी फायदेशीर  आईस्क्रिममधील व्हिटॅमिन ए डोळ्यांच्या आरोग्याला फायदेशीर ठरते.  उर्जा स्त्रोत  आईस्क्रिममध्ये कार्ब्स, फॅट्स आणि प्रोटीन हे घटक मुबलक प्रमाणात असतात. यामुळे शरीराला उर्जा मिळते.   रक्ताचा प्रवाह सुधारतो   आईस्क्रिममधील व्हिटॅमिन के शरीरातील रक्ताचा प्रवाह सुधारण्यास मदत करतो.  मेटॅबॉलिझम   आईस्क्रिममध्ये बी 6 व्हिटॅमिन मुबलक प्रमाणात असल्याने शरीरातील मेटॅबॉलिझम सुधारण्यास मदत होते.  स्मरणशक्ती तल्लख  आईस्क्रिममध्ये बी 12 व्हिटॅमिन असल्याने स्मरणशक्ती तल्लख राहण्यास मदत होते.  वजन घटवणं   वजन घटवण्यसाठी आईस्क्रिम मदत करते. आईस्क्रिम थंड स्वरूपाचे असते. त्याला सामान्य स्थितीमध्ये आणण्यासाठी शरीराला मेहनत घ्यावी लागते. यामुळे वजन घटवण्यास मदत होते.  अ‍ॅसिडीटीचा त्रास कमी करण्यासाठी व्हेनिला आईस्क्रिम मदत करते. व्हेनिला आईस्क्रिम हे कोणतेही प्रिझर्व्हेटीव्ह न मिसळाता, घरच्या घरी किंवा शुद्ध स्वरूपात बनवलेले असेल तर त्यामुळे अ‍ॅसिडीटीचा त्रास कमी होण्यास मदत होते.

Ice Cream Benefits : काय सांगता, आईस्क्रिम खाल्ल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे Read More »

Maharashtra Politics : MVA मध्ये एकमत! ‘इतक्या’ जागांवर काँग्रेस लढवणार निवडणूक

Maharashtra Politics: महाविकास आघाडीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसाठी एक मत झालं आहे. MVA ने 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला असून याचा औपचारिक घोषणा दोन दिवसांत होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गट राज्यातील लोकसभेच्या 48 पैकी 20 जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस किमान 10 जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. तर काँग्रेस लोकसभेच्या 18 जागांवर निवडणूक लढवणार आहे. याशिवाय प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला दोन जागा मिळतील. उद्धव गट व्हीबीएला दोन जागा देणार आहे. व्हीबीएने पाच जागांची मागणी केली होती.  तर पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस अपक्ष म्हणून राजू शेट्टी यांना पाठिंबा देणार आहे. वृत्तानुसार, उद्धव ठाकरेंची शिवसेना मुंबईतील लोकसभेच्या सहापैकी चार जागा लढवणार आहे. त्यापैकी मुंबई नॉर्थ ईस्टची एक जागा व्हीबीएला देता येईल. विशेष म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष दोन गटात विभागले गेले असून त्यांचा प्रत्येक गट हा बहुतांश आमदारांसह सत्ताधारी महायुतीच्या युतीचा भाग आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने भाजपसोबत युती करून 23 जागा लढवल्या होत्या. यामध्ये भाजपला 23 तर शिवसेनेला 18 जागांवर यश मिळाले.  शिवसेनेने मुंबईच्या दक्षिण मध्य आणि उत्तर-पश्चिमच्या जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसने 25 जागा लढवून केवळ चंद्रपूर जिंकले, तर राष्ट्रवादीने 19 जागा लढवून चारवर विजय मिळवला.  अविभाजित शिवसेनेने 2019 ची निवडणूक भाजपसोबत युती करून लढवली होती आणि लोकसभेच्या 18 जागा जिंकल्या होत्या. मात्र तत्कालीन शिवसेना आता दोन गटात विभागली गेली आहे. त्यापैकी केवळ 5 खासदार उद्धव यांच्यासोबत आहेत, तर उर्वरित 13 खासदार  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडे आहेत. भाजपसाठी महाराष्ट्र जिंकणे महत्त्वाचे भाजपने महाराष्ट्रात लोकसभेच्या 45 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. खरे तर, उत्तर प्रदेश (80 जागा) नंतर महाराष्ट्रात लोकसभेच्या सर्वाधिक 48 जागा आहेत. त्यामुळे ही दोन्ही राज्ये भाजपसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. त्यासाठी विशेष रणनीतीही आखण्यात आली आहे. 2019 मध्ये निकाल कसे लागले? गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपसह शिवसेनेने 23 जागा लढवल्या होत्या. तेव्हा शिवसेनेला 18 जागा मिळाल्या होत्या. तर, काँग्रेसने 25 ठिकाणी निवडणूक लढवली आणि त्यांना केवळ एक जागा जिंकता आली. राष्ट्रवादीने 19 जागा लढवून चार जागा जिंकल्या. तेव्हा प्रकाश आंबेडकर यांच्या पक्ष व्हीबीएने लोकसभेच्या 48 पैकी 47 जागा लढवल्या होत्या. मात्र, एकही जागा जिंकता आली नाही. पण व्हीबीएला सुमारे सात टक्के मते मिळाली. त्यावेळी राज्यात भाजपला सुमारे 28 टक्के, शिवसेनेला 23 टक्के, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला 16 टक्के मते मिळाली होती. असदुद्दीन ओवेसी यांच्या एआयएमआयएमला एक टक्क्यांहून कमी मते मिळाली, परंतु औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात एआयएमआयएमला यश मिळाले.

Maharashtra Politics : MVA मध्ये एकमत! ‘इतक्या’ जागांवर काँग्रेस लढवणार निवडणूक Read More »

Mahadev Jankar : ठरलं! महादेव जानकार ‘या’ मतदारसंघातून लाढवणार लोकसभा निवडणूक, कोणाला बसणार फटका ?

Mahadev Jankar : देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे  वारे वाहत आहे.  सत्ताधारी भाजपसह सर्व राजकीय पक्ष आपल्या आपल्या ताकदीनुसार आगामी निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे. तर राज्यातील 48 लोकसभेच्या जागांसाठी एमव्हीए आणि एनडीएमध्ये ‘काटे कि टक्कर’ पाहायला मिळत आहे.  आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात एमव्हीए कि एनडीए यापैकी कोणाला सर्वात जास्त जागा मिळणार याकडे केवळ राज्याचे नाहीतर संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे.  यातच राज्याच्या राजकारणातील एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकार राज्यातून लोकसभा निवडणूक लढवणार आहे. यासाठी त्यांनी तयारी देखील सुरू केली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार यावेळी ते माढा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. तर यापूर्वी ते परभणी किंवा उत्तर प्रदेशममधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली होती मात्र आता ते माढा मतरदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे.   याबाबत आमच्याशी बोलताना राष्ट्रीय समाज पक्षाचे युवा नेते अजित पाटील म्हणाले कि, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे माजी मंत्री महादेव जानकार यांनी आपल्या काळात राज्यसाठी खूप कामे केली आहे. यामुळे राष्ट्रीय समाज पक्षाने जानकार यांना माढा लोकसभा मतदारसंघातून दिल्लीला पाठवायचं संकल्प केला आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील लोकांमध्ये सध्या विद्यमान खासदारबद्दल निराशा आहे. या मदतदारसंघात गेल्या पाच वर्षात कोणतेही विकास कामे पूर्ण झालेली नाही.  तर या मतदारसंघाचा आणि महादेव जानकार यांच्या एक वेगळा नातं आहे. महादेव जानकार यांनी 2009 मध्ये देखील या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती आणि त्यावेळी एक लाखांपेक्षा जास्त मत घेतले होते. मात्र आता परिस्थिती बदली आहे आणि यावेळी महादेव जानकार यांच्या जिंकण्याची शक्यता जास्त असल्याची प्रतिकिया त्यांनी यावेळी दिली.  महादेव जानकार आगामी लोकसभा निवडणूक एमव्हीएकडून लढवणार असल्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे.

Mahadev Jankar : ठरलं! महादेव जानकार ‘या’ मतदारसंघातून लाढवणार लोकसभा निवडणूक, कोणाला बसणार फटका ? Read More »

Ahmednagar News: अहमदनगर येथील नमो महारोजगार मेळाव्यास तरुणांचा प्रतिसाद

Ahmednagar News:-  इयत्ता दहावी ते पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या युवक-युवतींना एकाच छताखाली रोजगाराच्या संधी आणि स्वयंरोजगाराबाबत मार्गदर्शन मिळावे यासाठी अहमदनगर येथील भिस्तबाग महलाशेजारील मैदानावर दोन दिवसीय विभागीय नमो महारोजगार मेळावा आणि करिअर मार्गदर्शन शिबीर संपन्न झाले. या मेळाव्यास विभागातील अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार व जळगाव या पाचही जिल्ह्यातील तरुण-तरुणींनी प्रचंड असा प्रतिसाद दिला. एकाच छताखाली त्यांच्या शिक्षणानुसार नोकरीच्या संधी प्राप्त झाल्याने जगण्याला अधिक बळ मिळाल्याची भावना तरुण-तरुणींनी व्यक्त केल्या. नोकरीमुळे जीवनाला मिळाली नवी दिशा अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील रहिवाशी असलेल्या गोविंदा मोरे या तरुणाने राहाता येथुन बी.कॉम पर्यंतचे शिक्षण पुर्ण केले. गेल्या दोन वर्षापासुन नोकरीच्या शोधात होता. परंतु नोकरीची संधी मिळाली नाही. महाविद्यालयातील प्राचार्यांनी महारोजगार मेळाव्याबाबत माहिती दिली. महारोजगार मेळाव्यात सहभागी होऊन नोकरीसाठी मुलाखत दिली. पहिल्याच प्रयत्नात यश येऊन रिंकल्स ॲकवा या कंपनीत नोकरीची संधी मिळाली. नोकरीमुळे जीवनाला एक नवी दिशा मिळाली आहे. शासनाने आयोजित केलेल्या या महारोजगार मेळाव्यामुळे गोरगरीब व होतकरु तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध असल्याची भावनाही गोविंदाने व्यक्त केली. महारोजगार मेळाव्यामुळे नामांकित कंपनीमध्ये नोकरी संधी  नंदुरबार जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या किरण रावताळे व विकास गावित या तरुणांना महारोजगार मेळाव्यातुन पहिल्याच प्रयत्नात महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीमध्ये नोकरीची संधी मिळाली आहे. आयटीआय मधुन मोटार मेकॅनिकचा कोर्स केल्यानंतर नोकरीच्या शोधात होतो. शासनाने आयोजित केलेल्या या मेळाव्याची माहिती भेटली आणि लगोलग अहमदनगर गाठले. महिंद्रा अँड महिंद्रासारख्या नामांकित कंपनीमध्ये नोकरीची संधी मिळाल्याने या संधीच सोन करत अर्थाजनाबरोबरच नवीन टेक्नॉलॉजीची माहिती यातुन होणार आहे. शासनाच्या या उपक्रमामुळे एक नवी उभारी मिळाल्याचेही तरुणांनी सांगितले. महारोजगार मेळाव्यामुळे कंपन्यांना मनुष्यबळाची उपलब्धता  शासनाने आयोजित केलेल्या नमो महारोजगार मेळाव्यामुळे एकाच छताखाली वेगवेगळे कौशल्य असलेले मनुष्यबळ कंपनीस उपलब्ध झाले.  यातुन अनेक तरुण-तरुणींना रोजगारही देता आला.  प्रशासनाने या महारोजगार मेळाव्याचे उत्कृष्टपणे व्यवस्थापन करण्यात आले होते. या ठिकाणी आयोजित केलेल्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे तरुण-तरुणींच्या करिअरला एक नवी दिशा मिळाली. दरवर्षी अशाप्रकारचे मेळावे आयोजित करण्यात येऊन कंपन्यांना मनुष्यबळ व उद्योगांना मनुष्यबळ मिळणे सोईचे होणार असल्याची भावना इंडोस्कल्प ऑटोकॉम्प प्राइवेट लिमिटेडचे रघुनाथ कलकर, श्‍नायडर इलेक्ट्रीक इंडिया प्रा.लिमिटेडचे विरेंद्र दहिफळे यांच्यासह विविध उद्योजकांनी बोलुन दाखवली.

Ahmednagar News: अहमदनगर येथील नमो महारोजगार मेळाव्यास तरुणांचा प्रतिसाद Read More »