DNA मराठी

ताज्या बातम्या

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोफत बियाणे व खते द्या; हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी

Harshwardhan Sapkal: राज्यातील शेतकरी संकटाचा सामना करत असतानाच मुसळधार पावसाने पुन्हा त्याला संकटात टाकले आहे. या पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेले पिकही वाहून गेले आहे. निसर्ग लहरी झाला असून राज्यातील फडणविसांचे सुलतानी सरकार शेतकरी व जनतेच्या मुळावर उठले आहे. संकटातील शेतकऱ्याला मदतीची गरज असून सरकारने पंचनाम्याचे सरकारी सोपस्कर बाजूला ठेवून नुकसानग्रस्तांना एकरी 20 हजार रुपये मदत तातडीने द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे. गांधी भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, बळीराजा संकटात आल्यास त्याला तातडीने मदत करण्याचे काम काँग्रेसचे सरकार असताना अनेकदा केले आहे. पिकावर रोग पडला, लाल्या पडल्या, गारपीट झाली, अवकाळी पावसाने नुकसान झाले की सरकारने कशाचीही पर्वा न करता शेतकऱ्याला मदत दिली आहे. आताचे सरकार मात्र शेतकऱ्याला मदत करण्याच्या विचाराचे नाही. केवळ पंचनामे करण्याचे आदेश देऊन, कोरडी आश्वासने देऊन चालणार नाही, शेतक-यांना तातडीने मदत पोहचवली पाहिजे. खरिप हंगामाच्या सुरुवातीलाच मोठे संकट आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कर्जमाफी अद्याप जाहीर केलेली नाही, कर्जाचे पुनर्गठन तरी करून द्यावे. सरकारचे खरिपाचे काहीच नियोजन नाही याकडेही लक्ष वेधून अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी मोफत बियाणे व खते द्यावीत, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले. मुसळधार पावसाने भाजपा युती सरकारचे सर्व दावे फोल ठरले आहेत. कालवे फुटल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भ्रष्टाचार तसेच मुंबई तुंबल्याने एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या भ्रष्टाचाराची त्सुनामी बाहेर पडली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करुनही मुंबईत जागोजागी पाणी साचले, सर्व व्यवस्था कोलमडली. भुयारी मेट्रो मुंबईत शक्य नसल्याचा एमएमआरडीएचा अहवाल असतानाही काही लोकांच्या हट्टासाठी हा प्रकल्प राबविला त्याचे परिणाम आज दिसत आहेत. रात्रीच्या अंधारात हजारो वृक्षांची कत्तल करून मेट्रोचा अट्टाहास पूर्ण केला आहे. सत्ताधारी पक्षाचा कथित विकास एका पावसानेच उघडा पाडल्यानंतरही हे लोक आधीच्या सरकारकडे बोट दाखवून जबाबदारी झटकत आहेत. 25 वर्ष भाजपा शिवसेनेसोबत मुंबई महापालिकेत सत्तेत होती, एकनाथ शिंदे सातत्याने नगर विकास खात्याचे मंत्री आहेत मग याकाळात भाजपा व एकनाथ शिंदे यांनी काय केले, असा प्रश्न उपस्थित करून सरकारने आरोप प्रत्यारोपाचा खेळ सोडून आत्मपरिक्षण करावे आणि जनतेला मदत करावी. महाराष्ट्र नैसर्गिक संकटाचा सामना करत असताना राज्याचे मंत्रिमंडळ मात्र अमित शाह यांची खुशामत करण्यात मग्न आहे. आपले मंत्रीपद शाबूत रहावे यासाठी मुख्यमंत्र्यांपासून सर्व मंत्री धडपड करत आहेत. अमित शाह यांनी निवडणुकीच्या प्रचारात दोन सिलिंडर मोफत देणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार, लाडक्या बहिणीला 2100 रुपये देणार, अशा वल्गणा केल्या, त्याचा आता त्यांना विसर पडलेला दिसत आहे. अमित शाह महाराष्ट्रावर ओढवलेल्या संकटावर एक शब्दही बोलले नाहीत. आता दिल्लीला जाण्यापूर्वी तरी त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा करून जावी कारण राज्यातील सरकार अमित शाह यांच्या शब्दाशिवाय कामच करत नाही अशी कोपरखळीही हर्षवर्धन सपकाळ यांनी मारली. या पत्रकार परिषदेला प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी व प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते.

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोफत बियाणे व खते द्या; हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी Read More »

धनगर आरक्षणासाठी यशवंत सेनेचं पुन्हा आमरण उपोषण; कीर्ती स्तंभाजवळ आंदोलन सुरू

Dhangar Reservation : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर चोंडी गाव सज्ज होत असतानाच, याच गावात कीर्ती स्तंभाजवळ यशवंत सेनेने पुन्हा एकदा आपल्या मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केलं आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण मिळावे, या दीर्घकालीन मागणीसाठी संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले, शिंदे समितीचे सदस्य माणिकराव दांगडे, अण्णासाहेब रुपनवर व इतर कार्यकर्ते पुन्हा रस्त्यावर उतरले आहेत. “शासनाने फक्त अहवाल स्वीकारून वेळ मारून नेली” यशवंत सेनेने दोन वर्षांपूर्वीही आंदोलन छेडले होते. त्यावेळी राज्य सरकारने ‘शिंदे समिती’ची स्थापना करून धनगर समाजाच्या मागण्यांकडे लक्ष दिल्यासारखं केलं. समितीचा अहवालही स्वीकारण्यात आला. मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झालीच नाही, असा आरोप यशवंत सेनेच्या नेत्यांनी केला आहे. “निवडणुकीपूर्वी आश्वासने, नंतर दुर्लक्ष” बाळासाहेब जोडतले म्हणाले, “शासनाने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी आरक्षणाचा मुद्दा गाजवला. मात्र निवडणुका झाल्यानंतर आम्हाला विसरलं. आजही आमची मागणी तशीच प्रलंबित आहे. शासनाने निव्वळ आमची फसवणूक केली.” राजकीय उपस्थितीत आंदोलकांचा दबाव शिंदे समितीचे सदस्य माणिकराव दांगडे यांनीही तीव्र नाराजी व्यक्त करताना सांगितलं, “शासन आमच्या मागण्यांकडे लक्ष देत नसेल, तर आम्ही जन्मगावात अहिल्यादेवींच्या चरणी सत्याग्रह करतोय. ही केवळ मागणी नाही, तर आमचा हक्क आहे.” सरकारकडे अपेक्षेची नजर यंदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंत वर्ष मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. 31 मे रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि राज्यपाल रमेश बैस यांची चोंडी येथे उपस्थिती निश्चित आहे. अशा वेळी सुरू झालेल्या या आंदोलनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. सरकारने या आंदोलकांच्या आवाजाकडे कितपत लक्ष दिलं जातं, आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर निर्णायक पावलं उचलली जातात का, याची उत्सुकता आता सर्वत्र आहे.

धनगर आरक्षणासाठी यशवंत सेनेचं पुन्हा आमरण उपोषण; कीर्ती स्तंभाजवळ आंदोलन सुरू Read More »

नगरकरांनो, जिल्ह्यासाठी यलो अलर्ट; 28 मेपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा

Rain Alert: जिल्ह्यात 28 मेपर्यंत वीजांच्या कडकडाटासह वादळी वारा व मुसळधार पाऊस होण्याचा शक्यता भारतीय हवामान खात्यामार्फत वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यासाठी यलो अलर्टही जारी करण्यात आला असुन नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यात भिमा नदीच्या मुक्त पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे भिमा नदीस दौंड पुल येथे १९ हजार ५५ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. भिमा नदीकाठावरील श्रीगोंदा व कर्जत तालुक्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नदीकाठावरील गावांनी स्थानिक प्रशासनाद्वारे देण्यात आलेल्या सुचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मेघगर्जनेच्‍या वेळी, वीजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्‍यावा. गडगडाटीच्‍या वादळादरम्‍यान व वीजा चमकतांना कोणत्‍याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. वीजेच्‍या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्‍टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल/सायकल यांचेपासून दूर रहावे. तसेच अतिवृष्टीमुळे भूस्खलन होण्याची व दरडी कोसळण्याची शक्यता असते. त्यादृष्टीने डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या लोकांनी दक्षता घ्यावी व वेळीच सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. घाटरस्त्याने शक्यतो प्रवास करणे टाळावे. शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीमध्‍ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा त्‍याप्रमाणे नियोजन केले असेल, तर सदर मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्‍यावी.जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्‍थलांतर करावे. असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

नगरकरांनो, जिल्ह्यासाठी यलो अलर्ट; 28 मेपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा Read More »

वैष्णवी हगवणे प्रकरणात गंभीर खुलासे; उच्च पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीकडून जबरदस्तीने रुखवत खरेदी

Neelam Gorhe On Vaishnavi Hagavane Case : विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मयुरी जगताप आणि वैष्णवी हगवणे या दोन्ही सूनांच्या तक्रारीवर महत्त्वपूर्ण माहिती दिली. त्या म्हणाल्या की, या दोन्ही प्रकरणांमध्ये हगवणे कुटुंबाच्या विरोधात छळाच्या गंभीर तक्रारी आहेत. काल त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत कस्पटे कुटुंबियांची भेट घेतली असता, त्यावेळी एका नव्या घटनेबाबत माहिती समोर आली. हगवणे कुटुंबाने लग्नावेळी एका उच्च पदस्थ पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीच्या रुखवतातून रुखवत विकत घेण्यासाठी दीड लाख रुपये जबरदस्तीने घेतले, अशी तक्रार संबंधित मुलीच्या कुटुंबाने केली आहे. डॉ. गोऱ्हे यांनी यासंदर्भात पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांशी तपशीलवार चर्चा केल्याचेही सांगितले. मयुरी जगताप या हगवणे कुटुंबाच्या दुसऱ्या सुनेशीही त्यांनी सविस्तर संवाद साधला असून, त्या प्रकरणातील तपशील देखील पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले आहेत. डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, छळाच्या या दोन्ही घटनांमध्ये क्रूरतेची पद्धत स्पष्टपणे दिसते. मयुरी जगतापने दाखल केलेल्या 354 कलमाखालील तक्रारीचे प्रकरण सध्या पौड पोलीस स्टेशनवरून पिंपरी चिंचवड आयुक्तालयात वर्ग करण्यात आले आहे. या प्रकरणाची चार्जशीट अंतिम टप्प्यात असून, लवकरच ती सादर होणार असल्याचे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. त्यांनी स्पष्टपणे म्हटले की, या प्रकरणात कोणत्याही उच्च पदस्थ व्यक्तीला संरक्षण दिले जाणार नाही. साक्षीपुराव्यांमध्ये हस्तक्षेप करणाऱ्यांविरोधातही कठोर कारवाई डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, या प्रकरणात ॲड. राजेश कावेडिया आणि ॲड. उज्वला पवार यांची नावे पुढील कायदेशीर प्रक्रियेत असून, सरकारी वकिलांचीही नेमणूक आवश्यक ठरणार आहे. त्यांनी राज्य सरकारकडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सर्व माहिती सोपविणार असल्याचे सांगितले. राज्य महिला आयोगाच्या संदर्भात डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, त्याच्या कार्यपद्धतीत सुधारणा होणे गरजेचे आहे. त्याला जर राजकीय हेतू म्हणायचं असेल, तर तो दृष्टीकोन चुकीचा आहे. महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दोष सिद्धीचे प्रमाण वाढावे, महिलांना न्याय मिळावा आणि पुनर्वसनाचे काम अधिक प्रभावी व्हावे, यासाठी आयोगाला अधिक निधी, कर्मचारी आणि कार्यक्षमता देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. पुणें, नाशिक, आणि नव्या मुंबईतील अलीकडील महिलांच्या आत्महत्या तसेच राजगुरूनगर येथील बालिका अत्याचार घटनांचा दाखला देत, त्या म्हणाल्या की अशा घटना टाळण्यासाठी वेळेत न्याय देणं गरजेचं आहे. न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना आरोपींना फरार होण्यासाठी वेळ मिळू नये, यासाठी शासनाने ठोस भूमिका घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

वैष्णवी हगवणे प्रकरणात गंभीर खुलासे; उच्च पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीकडून जबरदस्तीने रुखवत खरेदी Read More »

माजी आमदार आर.टी. जिजा देशमुख यांचे अपघाती निधन

R.T. Jija Deshmukh Dies: भाजपाचे माजी आमदार आर.टी. जिजा देशमुख यांचे अपघाती निधन झाल आहे. ही दुःखद घटना रविवारी संध्याकाळी घडली. लातूर जिल्ह्यातील औसा जवळील बेळकुंड येथे त्यांच्या गाडीचा अपघात झाला. या दुर्घटनेत गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी लातूरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने बीड व लातूर जिल्ह्यांतील राजकीय, सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. प्राथमिक माहितीनुसार, आर.टी. जिजा हे औसाकडे प्रवास करत असताना, बेळकुंडजवळ त्यांच्या गाडीच्या काचांवर रस्त्यावरील पाणी अचानक आल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे वाहनाने तीन ते चार पलटी घेतल्या. गाडी (क्रमांक एमएच ४४ २७९७) अपघातग्रस्त झाल्यामुळे त्यात बसलेले जिजा देशमुख गंभीररित्या जखमी झाले. अपघातानंतर तातडीने त्यांना लातूरमधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र वैद्यकीय उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने एक तळागाळातील समाजाशी नाळ असलेला नेता हरपल्याची भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले असून, त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

माजी आमदार आर.टी. जिजा देशमुख यांचे अपघाती निधन Read More »

राज्यात विक्रमी मान्सून धडक, 68 वर्षांचा विक्रम मोडला

Maharashtra Rain Alert: राज्याच्या हवामान इतिहासात एक नवा अध्याय लिहिला गेला आहे. भारतीय हवामान विभागाने २६ मे २०२५ रोजी मुंबईत मान्सून दाखल झाल्याची अधिकृत घोषणा केली असून, ही नोंद गेल्या ६८ वर्षांत सर्वात लवकर झालेली आहे. सरासरी मान्सून आगमनाची तारीख ११ जून असून, यंदा तब्बल १६ दिवस आधी मान्सूनची दमदार एंट्री झाली आहे. इतिहासातले सर्वात लवकर मान्सून आगमन — संदर्भीय नोंदी गेल्या काही दशकांतील सर्वात लवकर मान्सून आगमन खालीलप्रमाणे: १९५६: २९ मे १९६१: २९ मे १९७1: २९ मे २०९१ ते २०२४ पर्यंत: बहुतांश वेळा ७ जून ते १३ जून दरम्यान २०२५: २६ मे (सर्वात लवकर!) ही नोंद केवळ मुंबईसाठीच नव्हे तर पश्चिम किनारपट्टीसाठीही एक ऐतिहासिक बदल मानली जात आहे. हवामानतज्ज्ञांच्या मते, अरबी समुद्रावरील कमी दाबाचा पट्टा आणि बदललेली वाऱ्यांची दिशा यामुळे यंदाचा मान्सून गतीने पुढे सरकला. पावसाचा पहिला जोर: मुंबई जलमय २६ मे रोजी सकाळी ८:३० ते ११:३० यावेळेतील पावसाची नोंद: कुलाबा: १०५.२ मिमी सांताक्रूज: ५५ मिमी मुंबईत अनेक सखल भाग जलमय झाले असून वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला आहे. नागरिकांनी सोशल मीडियावर पावसाचे व्हिडीओ आणि परिस्थिती शेअर करत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. आपत्ती व्यवस्थापन सज्ज — गिरीश महाजन मैदानात उतरले राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मंत्रालयातील राज्य आपत्ती नियंत्रण कक्षात थेट उपस्थित राहून सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नियंत्रण कक्षालाही भेट दिली. विशेष म्हणजे, महापालिकेच्या नियंत्रण कक्षात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः उपस्थित होते. त्यांनी स्थानिक यंत्रणांशी समन्वय साधून उपाययोजनांचा आढावा घेतला. गिरीश महाजन यांनी सांगितले की, “सध्या मी स्वतः मंत्रालयात उपस्थित असून राज्य नियंत्रण कक्षातून सतत जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी मी सातत्याने समन्वय साधत आहे. सर्व आपत्कालीन यंत्रणा सज्ज आहेत. नागरिकांनी सहकार्य करावे, हीच विनंती.” नागरिकांना प्रशासनाचे आवाहन अनावश्यक प्रवास टाळावा पाण्याच्या प्रवाहात किंवा साचलेल्या भागात जाणे टाळावे समुद्रकिनाऱ्यांवर फिरायला जाणे पूर्णतः टाळावे हवामान खात्याच्या सूचना आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अपडेट्सवर सतत लक्ष ठेवावे पूर्वीचा अनुभव, यंदाची तयारी २०१९ साली मुंबईत मुसळधार पावसामुळे संपूर्ण यंत्रणा विस्कळीत झाली होती. ट्रेन सेवा बंद पडली होती, शाळांना सुट्ट्या जाहीर झाल्या होत्या, आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. मात्र यंदा गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज असून, पहिल्याच दिवशी योग्य उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. सरकार सज्ज, जबाबदारी सर्वांची राज्य सरकारने यंत्रणा तातडीने कामाला लावली आहे. मात्र पावसामुळे निर्माण होणाऱ्या आपत्तीतून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी नागरिकांनीही सावधगिरी बाळगणे अत्यावश्यक आहे.

राज्यात विक्रमी मान्सून धडक, 68 वर्षांचा विक्रम मोडला Read More »

मोठी बातमी! शहीद संदीप गायकर यांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची

Uday Samant : शहीद संदीप गायकर यांच्या ब्राम्हणवाडा गावी त्यांच्या कुटुंबीयांची उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार शहीद संदीप गायकर कुटुंबाला रोख पाच लाख रुपयांची आर्थिक मदत सुपूर्द केली. उद्योगमंत्री डॉ. सामंत यांच्या हस्ते शहीद संदीप गायकर यांच्या पत्नी दिपाली गायकर तसेच त्यांच्या माता-पित्यांकडे पाच लाख रुपयांची रोख रक्कम देण्यात आली. या प्रसंगी जुन्नर तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे, पदाधिकारी राम रेपाळे, बाजीराव दराडे, एकनाथ यादव तसेच ब्राम्हणवाडा गावचे उपसरपंच सुभाष गायकर, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी आरोटे आदी उपस्थित होते. शहीदाच्या कुटुंबाशी संवाद साधताना डॉ. उदय सामंत यांनी आपल्या भावना व्यक्त करत गायकर कुटुंबाला मानसिक आधार दिला. “शहीदाचे बलिदान देश विसरणार नाही. त्यांच्या कुटुंबीयांच्या मागे राज्य शासन नेहमीच उभी राहील,” अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

मोठी बातमी! शहीद संदीप गायकर यांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची Read More »

IPL 2025 : एमएस धोनी निवृती घेणार? स्वतः केली मोठी घोषणा

IPL 2025: महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जसाठी आयपीएल 2025 खूप खराब केला असून या स्पर्धेच्या अंतिम चारमध्ये संघाला पोहचता आलेला नाही. मात्र संघाने या स्पर्धेचा शेवट विजयाने केला आहे. डेव्हॉन कॉनवे आणि डेवाल्ड ब्रेव्हिस यांच्या अर्धशतकांनंतरच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर धोनीच्या संघाने रविवारी त्यांच्या शेवटच्या लीग सामन्यात गुजरात टायटन्सचा 83 धावांनी पराभव केला. चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल 2025 मध्ये 14 पैकी फक्त चार सामने जिंकले आणि 10 सामने गमावले. संघ आठ गुणांसह पॉइंट टेबलमध्ये सर्वात खाली 10 व्या स्थानावर राहिला. आयपीएल 2025 मधून बाहेर पडल्यानंतर आता धोनीच्या भविष्याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. चाहत्यांना वाटले की हा धोनीचा शेवटचा हंगाम आहे आणि तो या हंगामानंतर निवृत्त होईल. पण हंगाम संपल्यानंतर, 43 वर्षीय धोनीने त्याचे पत्ते उघड केले आहेत. सीएसकेच्या कर्णधाराने पुढील हंगामात खेळणार की नाही हे सांगितले आहे. सामन्यानंतर धोनी म्हणाला, “आमचा हंगाम चांगला नव्हता, पण हा एक उत्तम कामगिरी होता. या हंगामात आमचे क्षेत्ररक्षण चांगले नव्हते, पण आज आम्ही अनेक चांगले झेल घेतले. निर्णय घेण्यासाठी माझ्याकडे 4-5 महिने आहेत, घाई नाही.” तो म्हणाला, “शरीर तंदुरुस्त ठेवणे महत्वाचे आहे. आता मी रांचीला जाईन, काही बाईक राईड्सचा आनंद घेईन. मी असे म्हणत नाही की मी आता निवृत्त होत आहे, आणि मी असे देखील म्हणत नाही की मी परत येत आहे. माझ्याकडे खूप वेळ आहे. मी विचार करेन आणि नंतर निर्णय घेईन.” आयपीएल 2025 मध्ये धोनीची कामगिरी कशी होती? आयपीएल 2025 मध्ये गुजरातविरुद्ध संघाच्या शेवटच्या लीग सामन्यात धोनीला फलंदाजीची संधी मिळाली नाही. धोनीने आयपीएल 2025 मध्ये 13 डावांमध्ये 135.17 च्या स्ट्राईक रेटने 196 धावा केल्या. त्याने या हंगामात 12 चौकार आणि 12 षटकार मारले. आयपीएल 2025 च्या काही सामन्यांनंतर धोनी सीएसकेचा कर्णधार बनला, परंतु त्याच्या नेतृत्वाखालीही संघाची कामगिरी निराशाजनक राहिली.

IPL 2025 : एमएस धोनी निवृती घेणार? स्वतः केली मोठी घोषणा Read More »

आजही पावसाचा ऑरेंज अलर्ट, पुण्यात पूरसदृश परिस्थिती; जाणून घ्या ताजे अपडेट

Pune Rain Alert: रविवारी संपूर्ण महाराष्ट्रात मुसरधार पावसाने हजेरी लावली. रविवारी पुणे जिल्ह्यातील बारामती आणि इंदापूर तालुक्यात मुसळधार पाऊस पडला आहे. पुण्यात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूकही विस्कळीत झाली आहे. त्यामुळे मदत आणि बचाव कार्य त्वरित सुरू करण्यात आले ज्यासाठी एनडीआरएफ टीम तैनात करण्यात आली. मुसळधार पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी भारतीय हवामान खात्याने आज पुण्यात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. अनेक नाले आणि नद्या दुथडी भरून वाहत आहेत, ज्यामुळे घरांमध्ये पाणी शिरले आहे आणि रस्ते पाण्याखाली गेले आहेत. लोक त्यांच्या घरात अडकले आहेत आणि प्रशासन मदत कार्यात व्यस्त आहे. बारामतीत 150 घरांमध्ये पाणी जिल्हा अधिकाऱ्यांच्या मते, इंदापूरमधील सुमारे 70 वस्त्यांमध्ये आणि बारामतीतील सुमारे 150 घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. बारामतीमध्ये 19 घरांचे अंशतः नुकसान झाले. घरात पाणी साचल्याने एकाच कुटुंबातील सात जण अडकले.

आजही पावसाचा ऑरेंज अलर्ट, पुण्यात पूरसदृश परिस्थिती; जाणून घ्या ताजे अपडेट Read More »

मोठी बातमी! जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

Ahilyanagar News : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी अरुण उंडे यांनी मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये २६ मे २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे. सदरचे आदेश धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, लग्न मिरवणुका, किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना, सभा अगर मिरवणूका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही. आदेशाचा भंग करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

मोठी बातमी! जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी Read More »