DNA मराठी

Monsoon 2025

नुकसानीचे पंचनामे तत्काळ करा; CM फडणविसांचे आदेश

Monsoon 2025 : राज्यातील अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत आढावा घेण्यात आला असून शेती आणि घरांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावेत आणि नुकसान भरपाई देण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या सुरवातीलाच राज्यातील अतिवृष्टी, धरणातील पाणी साठी, पिक-परिस्थिती याबाबतचा आढावा घेण्यात आला. आपत्ती व्यवस्थापनाशी निगडीत विविध यंत्रणांच्या सज्जतेचा आढावा घेण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आपत्ती व्यवस्थापन मंत्री मंत्री गिरीष महाजन, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, क्रीडा व युवक कल्याण दत्तात्रय भरणे, रोजगार हमी मंत्री भरत गोगावले, मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री निलेश राणे उपस्थित होते. राज्य आपत्कालीन कार्यकेंद्रातून बचाव व मदत कार्यासाठी प्रभावी समन्वयन साधण्यात येत असल्याची माहिती मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी यांनी सादरीकरणाद्वारे दिली. ‘सचेत’ प्रणालीवरून 19 कोटी मोबाईल लघु संदेशाद्वरे पाऊस, वीज सतर्कतेचे संदेश देण्यात येत आहेत. त्यावरून 19 कोटी 22 लाख मोबाईल लघु संदेश पाठविण्यात आले. राज्य आपत्कालीन कार्यकेंद्राला अत्याधुनिक संवाद यंत्रणा व आपत्तींच्या माहितीचे विश्लेषण करणाऱ्या डीएसएस (Decision support system) ने सुसज्ज करण्यात आले आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या नागपूर येथे दोन आणि धुळे येथे दोन अशी चार पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. नांदेड येथे तैनात करण्यात येणारी पथके ही धुळे येथून रवाना झाली आहेत. गडचिरोली येथे तैनात करण्यात येणारी पथके ही नागपूर येथून रवाना होत आहेत. यासह राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्या सज्ज ठेवण्यात आल्याचे सेठी यांनी सांगितले. राज्यात वीज पडून, भिंत कोसळून, झाड पडून, पाण्यात बुडून आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत. या मृतांच्या नातेवाईकांना आवश्यक ती मदत व नियमानुसार आर्थिक मदत तत्काळ पोहचविण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर यांनी उजनी धरणाच्या जलाशयातील जलसाठा अकरा टीएमसीने वाढल्याची माहिती दिली. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे यांनी गेल्या चार दिवसांत झालेल्या पावसामुळे राज्यात टँकरच्या संख्येत काही अंशी घट झाली आहे, तथापि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत अजूनही टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती दिली.

नुकसानीचे पंचनामे तत्काळ करा; CM फडणविसांचे आदेश Read More »

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोफत बियाणे व खते द्या; हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी

Harshwardhan Sapkal: राज्यातील शेतकरी संकटाचा सामना करत असतानाच मुसळधार पावसाने पुन्हा त्याला संकटात टाकले आहे. या पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेले पिकही वाहून गेले आहे. निसर्ग लहरी झाला असून राज्यातील फडणविसांचे सुलतानी सरकार शेतकरी व जनतेच्या मुळावर उठले आहे. संकटातील शेतकऱ्याला मदतीची गरज असून सरकारने पंचनाम्याचे सरकारी सोपस्कर बाजूला ठेवून नुकसानग्रस्तांना एकरी 20 हजार रुपये मदत तातडीने द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे. गांधी भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, बळीराजा संकटात आल्यास त्याला तातडीने मदत करण्याचे काम काँग्रेसचे सरकार असताना अनेकदा केले आहे. पिकावर रोग पडला, लाल्या पडल्या, गारपीट झाली, अवकाळी पावसाने नुकसान झाले की सरकारने कशाचीही पर्वा न करता शेतकऱ्याला मदत दिली आहे. आताचे सरकार मात्र शेतकऱ्याला मदत करण्याच्या विचाराचे नाही. केवळ पंचनामे करण्याचे आदेश देऊन, कोरडी आश्वासने देऊन चालणार नाही, शेतक-यांना तातडीने मदत पोहचवली पाहिजे. खरिप हंगामाच्या सुरुवातीलाच मोठे संकट आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कर्जमाफी अद्याप जाहीर केलेली नाही, कर्जाचे पुनर्गठन तरी करून द्यावे. सरकारचे खरिपाचे काहीच नियोजन नाही याकडेही लक्ष वेधून अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी मोफत बियाणे व खते द्यावीत, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले. मुसळधार पावसाने भाजपा युती सरकारचे सर्व दावे फोल ठरले आहेत. कालवे फुटल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भ्रष्टाचार तसेच मुंबई तुंबल्याने एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या भ्रष्टाचाराची त्सुनामी बाहेर पडली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करुनही मुंबईत जागोजागी पाणी साचले, सर्व व्यवस्था कोलमडली. भुयारी मेट्रो मुंबईत शक्य नसल्याचा एमएमआरडीएचा अहवाल असतानाही काही लोकांच्या हट्टासाठी हा प्रकल्प राबविला त्याचे परिणाम आज दिसत आहेत. रात्रीच्या अंधारात हजारो वृक्षांची कत्तल करून मेट्रोचा अट्टाहास पूर्ण केला आहे. सत्ताधारी पक्षाचा कथित विकास एका पावसानेच उघडा पाडल्यानंतरही हे लोक आधीच्या सरकारकडे बोट दाखवून जबाबदारी झटकत आहेत. 25 वर्ष भाजपा शिवसेनेसोबत मुंबई महापालिकेत सत्तेत होती, एकनाथ शिंदे सातत्याने नगर विकास खात्याचे मंत्री आहेत मग याकाळात भाजपा व एकनाथ शिंदे यांनी काय केले, असा प्रश्न उपस्थित करून सरकारने आरोप प्रत्यारोपाचा खेळ सोडून आत्मपरिक्षण करावे आणि जनतेला मदत करावी. महाराष्ट्र नैसर्गिक संकटाचा सामना करत असताना राज्याचे मंत्रिमंडळ मात्र अमित शाह यांची खुशामत करण्यात मग्न आहे. आपले मंत्रीपद शाबूत रहावे यासाठी मुख्यमंत्र्यांपासून सर्व मंत्री धडपड करत आहेत. अमित शाह यांनी निवडणुकीच्या प्रचारात दोन सिलिंडर मोफत देणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार, लाडक्या बहिणीला 2100 रुपये देणार, अशा वल्गणा केल्या, त्याचा आता त्यांना विसर पडलेला दिसत आहे. अमित शाह महाराष्ट्रावर ओढवलेल्या संकटावर एक शब्दही बोलले नाहीत. आता दिल्लीला जाण्यापूर्वी तरी त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा करून जावी कारण राज्यातील सरकार अमित शाह यांच्या शब्दाशिवाय कामच करत नाही अशी कोपरखळीही हर्षवर्धन सपकाळ यांनी मारली. या पत्रकार परिषदेला प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी व प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते.

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोफत बियाणे व खते द्या; हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी Read More »

राज्यात विक्रमी मान्सून धडक, 68 वर्षांचा विक्रम मोडला

Maharashtra Rain Alert: राज्याच्या हवामान इतिहासात एक नवा अध्याय लिहिला गेला आहे. भारतीय हवामान विभागाने २६ मे २०२५ रोजी मुंबईत मान्सून दाखल झाल्याची अधिकृत घोषणा केली असून, ही नोंद गेल्या ६८ वर्षांत सर्वात लवकर झालेली आहे. सरासरी मान्सून आगमनाची तारीख ११ जून असून, यंदा तब्बल १६ दिवस आधी मान्सूनची दमदार एंट्री झाली आहे. इतिहासातले सर्वात लवकर मान्सून आगमन — संदर्भीय नोंदी गेल्या काही दशकांतील सर्वात लवकर मान्सून आगमन खालीलप्रमाणे: १९५६: २९ मे १९६१: २९ मे १९७1: २९ मे २०९१ ते २०२४ पर्यंत: बहुतांश वेळा ७ जून ते १३ जून दरम्यान २०२५: २६ मे (सर्वात लवकर!) ही नोंद केवळ मुंबईसाठीच नव्हे तर पश्चिम किनारपट्टीसाठीही एक ऐतिहासिक बदल मानली जात आहे. हवामानतज्ज्ञांच्या मते, अरबी समुद्रावरील कमी दाबाचा पट्टा आणि बदललेली वाऱ्यांची दिशा यामुळे यंदाचा मान्सून गतीने पुढे सरकला. पावसाचा पहिला जोर: मुंबई जलमय २६ मे रोजी सकाळी ८:३० ते ११:३० यावेळेतील पावसाची नोंद: कुलाबा: १०५.२ मिमी सांताक्रूज: ५५ मिमी मुंबईत अनेक सखल भाग जलमय झाले असून वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला आहे. नागरिकांनी सोशल मीडियावर पावसाचे व्हिडीओ आणि परिस्थिती शेअर करत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. आपत्ती व्यवस्थापन सज्ज — गिरीश महाजन मैदानात उतरले राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मंत्रालयातील राज्य आपत्ती नियंत्रण कक्षात थेट उपस्थित राहून सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नियंत्रण कक्षालाही भेट दिली. विशेष म्हणजे, महापालिकेच्या नियंत्रण कक्षात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः उपस्थित होते. त्यांनी स्थानिक यंत्रणांशी समन्वय साधून उपाययोजनांचा आढावा घेतला. गिरीश महाजन यांनी सांगितले की, “सध्या मी स्वतः मंत्रालयात उपस्थित असून राज्य नियंत्रण कक्षातून सतत जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी मी सातत्याने समन्वय साधत आहे. सर्व आपत्कालीन यंत्रणा सज्ज आहेत. नागरिकांनी सहकार्य करावे, हीच विनंती.” नागरिकांना प्रशासनाचे आवाहन अनावश्यक प्रवास टाळावा पाण्याच्या प्रवाहात किंवा साचलेल्या भागात जाणे टाळावे समुद्रकिनाऱ्यांवर फिरायला जाणे पूर्णतः टाळावे हवामान खात्याच्या सूचना आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अपडेट्सवर सतत लक्ष ठेवावे पूर्वीचा अनुभव, यंदाची तयारी २०१९ साली मुंबईत मुसळधार पावसामुळे संपूर्ण यंत्रणा विस्कळीत झाली होती. ट्रेन सेवा बंद पडली होती, शाळांना सुट्ट्या जाहीर झाल्या होत्या, आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. मात्र यंदा गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज असून, पहिल्याच दिवशी योग्य उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. सरकार सज्ज, जबाबदारी सर्वांची राज्य सरकारने यंत्रणा तातडीने कामाला लावली आहे. मात्र पावसामुळे निर्माण होणाऱ्या आपत्तीतून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी नागरिकांनीही सावधगिरी बाळगणे अत्यावश्यक आहे.

राज्यात विक्रमी मान्सून धडक, 68 वर्षांचा विक्रम मोडला Read More »