Ranji Trophy Final: मुंबई पुन्हा चॅम्पियन! ‘हे’ खेळाडू ठरले गेम चेंजर

Ranji Trophy Final:  मुंबईने पुन्हा एकदा दमदार कामगिरी करत विदर्भ विरोधात खेळण्यात आलेल्या रणजी ट्रॉफी 2023-24 च्या अंतिम सामन्यात विजेते पटकावले आहे.    मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबईने विदर्भाचा 169 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव करत 42 व्यांदा विजेतेपद पटकावले.  मुंबईसाठी वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर आणि सरफराज खानचा भाऊ मुशीर खान यांनी पुन्हा एकदा चमकदार कामगिरी केली. या सामन्यात मुंबईने शार्दुल ठाकूरच्या 75 धावांच्या खेळीच्या जोरावर पहिल्या डावात 224 धावा केल्या. प्रत्युत्तरात विदर्भाचा संघ अवघ्या 105 धावांत आटोपला. दुसऱ्या डावात मुंबईने शानदार फलंदाजी करत मुशीर खानच्या 136 धावा, श्रेयस अय्यरच्या 95 धावा, कर्णधार रहाणेच्या 73 धावा आणि शम्स मुलानीच्या 50 धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर 418 धावा केल्या. मुंबईची एकूण आघाडी 537 धावांची असून विदर्भाला 538 धावांचे लक्ष्य देण्यात आले होते. प्रत्युत्तरात विदर्भाचा संघ दुसऱ्या डावात 368 धावांत सर्वबाद झाला. विदर्भाकडून कर्णधार अक्षय वाडकरने 103 धावांचे शतक झळकावले. त्यांच्याशिवाय करुण नायरने 74 आणि हर्ष दुबेने 65 धावा केल्या. करुण नायर आणि अक्षय वाडकर यांनी पाचव्या विकेटसाठी 173 चेंडूत 90 धावांची भागीदारी केली. मुंबईकडून दुसऱ्या डावात तनुष कोटियनने सर्वाधिक चार बळी घेतले. तर मुशीर खान आणि तुषार देशपांडे यांना प्रत्येकी दोन यश मिळाले. धवल कुलकर्णी आणि शम्स मुलाणी यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. यासह मुंबईने हा सामना 169 धावांनी जिंकला.

Ranji Trophy Final: मुंबई पुन्हा चॅम्पियन! ‘हे’ खेळाडू ठरले गेम चेंजर Read More »