Mumbai Crime: रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई: चोरट्यांच्या टोळीला गजाआड, 22 लाखांचा मुद्देमाल जप्त
Mumbai Crime : मुंबई रेल्वे पोलिसांनी मेल आणि एक्सप्रेस गाड्यांमधील प्रवाशांच्या बॅगा फाडून चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत ३१५.४६० ग्रॅम सोनं, रोकड अशा मिळून तब्बल २२ लाख २४ हजार ७६९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात नोंद झालेल्या तक्रारीनंतर युनिट -३ गुन्हे शाखेच्या पथकाने संशयितांचा पद्धतशीर अभ्यास करून दोन आरोपींना अटक केली. वकार आलम तौकीर खान आणि जुगल किशोर ओमप्रकाश विश्वकर्मा या दोघांना कल्याण रेल्वे स्थानक परिसरातून पकडण्यात आले असून चौकशीत त्यांनी साथीदारांसह गुन्ह्यांची कबुली दिली. या कारवाईमुळे कल्याण, कर्जत, डोबिवली आणि ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यातील १६ प्रकरणांचा उलगडा झाला असून आरोपींना पुढील चौकशीसाठी पोलिस कोठडीत ठेवण्यात आले असल्याची माहिती विवेक कलासागर पोलीस आयुक्त GRP मुंबई यांनी दिली आहे.
