DNA मराठी

राजकीय

शेतकऱ्यांना दिलासा, ‘ई-नाम’ योजनेच्या प्रभावी अंमलबाजवणीसाठी अधिनियमात सुधारणेस मान्यता

Maharashtra Politics: राज्यातील शेतकऱ्यांना शेतमालाला रास्त व वाजवी भाव मिळावा यासाठी ‘ई-नाम’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत राष्ट्रीय नामांकित बाजारतळ स्थापन करणे सुलभ व्हावे यासाठी महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. केंद्र व राज्य शासन, कृषि उत्पन्न बाजार समितीतील कृषि उत्पन्नाच्या व्यापारामधील अडसर कमी व्हावे यासाठी राज्यातील १३३ कृषि उत्पन्न बाजार समित्यांमध्ये ई-नाम योजना राबवित आहे. कृषि उत्पन्नाच्या व्यापारासाठी ऑनलाईन पद्धती कार्यान्वित करीत आहे. पण अजूनही राज्यात ई-नाम अंतर्गत “सिंगल युनिफाइड लायसन्स” ची तरतूद नसल्याने, इंटरमंडी व इंटर स्टेट ट्रेड सुरु होऊ शकलेले नाहीत. दरम्यान, केंद्र शासनाच्या कृषि व शेतकरी कल्याण विभागाने कृषि उत्पन्न आणि पशुधन पणन (प्रचालन व सुविधा) अधिनियम, २०१७ (मॉडेल अॅक्ट) प्रकाशित केला आहे. या अनुषंगाने राज्याच्या महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मध्ये सुधारणा करण्यासाठी सन २०१८ च्या हिवाळी अधिवेशनात विधेयक मांडण्यात आले होते. विधेयकातील तरतुदींबाबत सुधारणांसाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली होती. या उपसमितीने सुधारणांची शिफारस केली आहे. त्यानुसार केंद्राच्या मॉडेल अॅक्ट मधील तरतुदीनुसार राज्यातील ज्या मोठ्या बाजार समित्यांकडे अन्य किमान २ राज्यांतून शेतमाल येतो, अशा बाजार समित्यांना राष्ट्रीय नामांकित बाजार समित्या घोषित करण्याची तरतूद करण्यात येणार आहे. अशा बाजार समित्या राष्ट्रीय नामांकित बाजार समित्या घोषित केल्यानंतर या बाजार समित्यांवर शासनाचे थेट नियंत्रण होऊन निर्णय प्रक्रिया व पणन प्रक्रिया सुलभतेने व वेगाने होणार आहे. याशिवाय केंद्र शासनाच्या सदर मॉडेल अॅक्ट २०१७ नुसार “सिंगल युनिफाइड लायसन्स” संदर्भातील तरतुदींचा समावेश करण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसेच कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या सचिवांचे केडर तयार करण्याची शिफारस करण्यात आली आहे. जेणेकरून सचिव हा या कार्यालयाच्या थेट नियंत्रणाखाली येऊन शासन व बाजार समिती यामधील दुवा म्हणून तो काम करेल, तसेच कृषि उत्पन्न बाजार समित्यांवर देखील प्रभाव नियंत्रण ठेवता येईल. यासाठी सचिवाला पर्यवेक्षणाबाबतचे कामकाज सोपविले जाणार आहे सदर सचिवांचे पगार देखरेख शुल्कामधून जमा होणाऱ्या रकमेमधून करण्यात येणार आहे. याकरिता कृषि उत्पन्न बाजार समित्यांकडून आकारण्यात येणारी देखरेख शुल्काची रक्कम शासनाऐवजी पणन विभागाला सुपूर्द करावी, अशी सुधारणाही अधिनियमात करण्यात येणार आहे. या अधिनियमातील सुधारणांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्थानिक स्तरावर सनिंयत्रण समिती स्थापन करण्यासही मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

शेतकऱ्यांना दिलासा, ‘ई-नाम’ योजनेच्या प्रभावी अंमलबाजवणीसाठी अधिनियमात सुधारणेस मान्यता Read More »

मोठी बातमी! पिंपरी-चिंचवड येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र तसेच दिवाणी न्यायालयाची स्थापना होणार

Devendra Fadnavis: पिंपरी-चिंचवड (जि. पुणे) येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर अशा दोन न्यायालयांची स्थापना करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या दोन्ही न्यायालयांसाठी आवश्यक पदांनाही मान्यता देण्यात आली. या निर्णयानुसार जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयासाठी 43 नियमित पदे मंजूर करण्यात आली असून 11 मनुष्यबळांच्या सेवा बाह्ययंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तरसाठी 20 नियमित पदे मंजूर करण्यात आली असून 4 मनुष्यबळांच्या सेवा बाह्ययंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड परिसरातील नागरिकांसाठी पुणे न्यायालयाचे अंतर दूर पडत असल्याने, शिवाय न्यायदान कक्षाची उपलब्धता, प्रलंबित प्रकरणांची संख्या, निवासस्थानांची उपलब्धता विचारात घेता या नवीन न्यायालयांची स्थापन करणे गरजेचे होते. नव्याने स्थापन झालेल्या या न्यायालयांमुळे पिंपरी-चिंचवड येथील प्रलंबित प्रकरणे जलद गतीने चालविणे सुलभ होईल व नागरिकांची व पक्षकारांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे.

मोठी बातमी! पिंपरी-चिंचवड येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र तसेच दिवाणी न्यायालयाची स्थापना होणार Read More »

donald trump

Donald Trump ने भारताला दिला मोठा धक्का; लावला 25% कर

Donald Trump : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा करत 1 ऑगस्टपासून भारतावर 25 टक्के टॅरिफ लावल्याची माहिती दिली आहे. तसेच रशियाकडून तेल आणि लष्करी उपकरणे खरेदी केल्याबद्दल भारतावर अतिरिक्त दंड देखील आकारला जाणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. याबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ट्रुथ सोशल’ वर ट्रम्प यांनी माहिती दिली आहे. भारत आणि अमेरिकेतील व्यापार गेल्या काही वर्षांपासून खूपच कमी आहे कारण भारताचे टॅरिफ दर खूप जास्त आहेत आणि तेथील गैर-मौद्रिक व्यापार अडथळे देखील खूप गुंतागुंतीचे आणि आक्षेपार्ह आहेत. असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. तर भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल आणि लष्करी उपकरणे खरेदी करत आहे, ज्यामुळे युक्रेन युद्धाविरुद्ध अमेरिकेची मोहीम कमकुवत होते. असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. अतिरिक्त दंड भरावा लागणार भारत आता 1 ऑगस्टपासून 25% टॅरिफ भरेल आणि अतिरिक्त दंड देखील भरावा लागेल, जो रशियासोबतच्या संबंधांची किंमत असेल असं ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांनी लिहिले की भारत त्याच्या लष्करी गरजांसाठी रशियावर दीर्घकाळ अवलंबून आहे आणि सध्या तो रशियाकडून ऊर्जेचा सर्वात मोठा खरेदीदार आहे. ते रशियाकडून मोठ्या प्रमाणात लष्करी उपकरणे खरेदी करत आहेत आणि चीनसह ऊर्जेचा सर्वात मोठा खरेदीदार आहेत, अशा वेळी जेव्हा संपूर्ण जगाला रशियाने युक्रेनमध्ये हत्या थांबवावी असे वाटते, तेव्हा या सर्व गोष्टी चांगल्या नाहीत.

Donald Trump ने भारताला दिला मोठा धक्का; लावला 25% कर Read More »

come on rummy, maharaj, but where is the action rohit pawar o

“वाजपेयी-यशवंतरावांचा आदर्श, पण कारवाई कुठे?” – रोहित पवारांचा खोचक सवाल

मुंबई | प्रतिनिधी – राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात सभागृहात रमी खेळल्याचा आरोप झाल्यानंतर निर्माण झालेल्या वादळात आता सरकारसमोर गंभीर नैतिक आणि राजकीय प्रश्न उभे ठाकले आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सरकारने नेमलेली आंतरिम समिती आपला अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्याकडे सुपूर्त केला आहे. मात्र, अहवालात नेमके काय निष्कर्ष आहेत आणि त्यावर सरकार काय भूमिका घेणार, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) चे आक्रमक आमदार रोहित पवार यांनी आज सरकारवर जोरदार हल्ला चढवत, नैतिकतेचा बुरखा फाडण्याचा प्रयत्न केला. “सभागृहात १८ ते २२ मिनिटं कृषी मंत्री रमी खेळत असल्याचे स्पष्ट व्हिडिओ पुरावे समोर आहेत. हे संपूर्ण प्रकरण म्हणजे शेतकऱ्यांच्या समस्या, त्यांच्या अपेक्षा आणि त्यांच्या प्रश्नांवर पांघरुण घालण्याचा प्रयत्न आहे. इतक्या महत्त्वाच्या पदावर असलेला मंत्री जर सभागृहात असा वेळ घालवत असेल, तर त्या मंत्र्याच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होतं,” असे तीव्र शब्दात टीका करत रोहित पवार यांनी सरकारला कोंडीत पकडले. “वारसा सांगून काही होत नाही, कृतीतून दाखवा!” या मुद्द्यावरून रोहित पवार यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना लक्ष्य केले. “फडणवीस साहेब अटल बिहारी वाजपेयी यांचा वारसा सांगतात आणि दादा (अजित पवार) यशवंतराव चव्हाणांचा आदर्श घेतात, पण हे आदर्श केवळ भाषणात नको, कृतीतही दिसले पाहिजेत. आता प्रश्न आहे – या मंत्र्याने सभागृहात रमी खेळल्याच्या स्पष्ट पुराव्यानंतर तुम्ही काय निर्णय घेता?” असा खोचक सवाल रोहित पवार यांनी केला. सरकारची भूमिका स्पष्ट होणार? मंत्रीपद धोक्यात? सरकारकडून अद्याप या अहवालावरील भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. अहवालात समितीने नेमके काय निष्कर्ष मांडले, दोष निश्चित केला का? मंत्री कोकाटेंना पाठीशी घालण्यात येणार का? की नैतिकतेच्या आधारावर कठोर निर्णय घेतला जाणार – या साऱ्या प्रश्नांची उत्तरे महाराष्ट्राला लवकरच मिळणार आहेत, अशी अपेक्षा आहे. या संदर्भात बोलताना रोहित पवार पुढे म्हणाले – “सरकारकडे अहवाल गेला आहे, पण तो जनतेसमोर आणणे आवश्यक आहे. पारदर्शक कारभार म्हणजे काय याचे भान सरकारला राहिले आहे का? की एकमेकांचे पाप लपवण्याचा उद्योग सुरु आहे?“ सभागृहाचा अपमान की शेतकऱ्यांची अवहेलना? कृषी विभाग हे राज्याच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आणि शेतकऱ्यांशी संबंधित मंत्रालय आहे. अशा परिस्थितीत कृषी मंत्रीच जर सभागृहात रमी खेळत असेल, तर हा केवळ सभागृहाचा अपमान नाही, तर शेतकऱ्यांच्याही विश्वासाला तडा जाण्याचा प्रकार आहे, असे मत राजकीय वर्तुळात मांडले जात आहे.  रोहित पवार यांचा (प्रतिक्रिया): “सभागृह म्हणजे लोकशाही मंदिर आहे. त्या ठिकाणी एखादा मंत्री २० मिनिटं रमी खेळत असेल, तर तो लोकशाहीचा, शेतकऱ्यांचा आणि जनतेच्या प्रश्नांचा अवमान आहे. अहवाल आला आहे, आता सरकारची खरी कसोटी सुरू झाली आहे. कारवाई झाली नाही, तर तुमच्या आदर्शांचा फोलपणा उघड होईल.”  महत्त्वाचे मुद्दे:

“वाजपेयी-यशवंतरावांचा आदर्श, पण कारवाई कुठे?” – रोहित पवारांचा खोचक सवाल Read More »

savedi maharashtra til adarsh scam dna marathi

सत्य लपवण्याचा ‘फेरफार’?

Sawedi land scam – प्रशासन जर चुकीच्या नोंदी करणाऱ्यांना वाचवत असेल, गोपनीय माहिती लीक होत असेल आणि बनावट कागदांवर स्वाक्षऱ्या केल्या जात असतील – तर या सगळ्याच्या मुळाशी असलेला जनतेचा प्रशासनावर असलेला विश्वासच उडतो होतो. ही बाब केवळ सावेडीपुरती मर्यादित नाही; ही एक सिस्टम फेल्युअर ची लक्षणं आहेत. Sawedi land scam – अहिल्सायानगर – सावेडी येथील सर्वे नं. २४५/ब२ मधील वादग्रस्त हाडाचा कारखाना आणि त्यासंबंधित फेरफार क्रमांक ७३१०७ प्रकरणात अखेर अहवाल सादर झाला, मात्र तो “फेरपुनरावलोकन” या शिफारसीपलीकडे फारसा पुढे गेलेला नाही. गेले काही महिने याबाबत गंभीर स्वरूपाचे आरोप होत असताना प्रशासनाने केवळ पुनरावलोकनाची शिफारस करणे म्हणजे प्रकरण हलक्याफुलक्या पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न आहे, असे स्पष्टपणे म्हणावे लागेल. ही कारवाई म्हणजे ‘समस्या सोडवणे’ नव्हे तर ‘विलंब करा आणि विसरायला लावा’ अशा शैलीतील जुन्या धोरणाचे उदाहरण आहे. दस्तऐवज बनावट असल्याचे आरोप, खरेदीखत संदिग्ध असल्याचे पुरावे, आणि हस्ताक्षर बनावट असल्याचा स्पष्ट आरोप असूनही, ही बाब गंभीरपणे न घेता तिचा फेरपरीक्षण करून ‘नवीन पेपर तयार करून जुने पेपर’ झाकून टाकण्याचा प्रयत्न होत केला जात आहे. कारवाई होण्याऐवजी ‘जुळवून घेण्याची’ यंत्रणा सक्रिय? अहवाल अद्याप अधिकृतरित्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पोहोचलेला नसतानाही, त्यातील गोपनीय बाबी आधीच संबंधित गटांपर्यंत पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. विशेषतः शहा गटाशी संबंधित काही व्यक्तींनी तत्काळ प्रांत कार्यालयात धाव घेतल्याचे चित्र दिसून आले. ही बाब केवळ संयोग नव्हे, तर प्रशासकीय यंत्रणेमधील ‘फुटलेल्या नळांची साखळी’ पुन्हा अधोरेखित करणारी आहे. याचा थेट अर्थ असा होतो की, अहवाल तयार होण्याच्या आधीच संबंधित व्यक्तींशी समन्वय साधला गेला असावा, आणि त्यांच्या ‘सोयीचा’ मजकूर त्यामध्ये उतरवण्यात आला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा प्रकार निष्पक्ष आणि पारदर्शक प्रशासनाच्या मूळ मूल्यांनाच सुरुंग लावणारा असून, यामुळे कारवाई होण्याऐवजी ‘जुळवून घेण्याची’ यंत्रणा सक्रिय आहे, हेच सिद्ध होते. चूक दुरुस्ती लेख – सत्य झाकणारा मुखवटा या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या “चूक दुरुस्ती लेखा”मध्ये मूळ सर्वे नंबर आणि क्षेत्रफळ कायम ठेवत नव्याने दुसरा सर्वे नंबर देण्यात आला, आणि त्यात क्षेत्रफळही वाढवण्यात आलं. हे करताना ज्या व्यक्तीची संमती घेतल्याचा दाखला आहे – त्याच व्यक्तीने “सही माझी नसल्याचा” दावा केला आहे. याहून गंभीर आणखी काय असू शकते? फक्त पुनरावलोकन पुरेसं नाही पुनरावलोकन म्हणजे एका चुकीच्या फाईलला दुसऱ्या फाईलने झाकणे. ही केवळ वेळकाढूपणाची कारवाई आहे. प्रशासकीय कागदोपत्री चुकांमागे नेहमीच एक हेतू असतो – आणि या प्रकरणात तो हेतू कोणाचा फायदा करण्यासाठी होता, हे तपासण्याची जबाबदारी महसूल विभागावर आहे. केवळ अहवाल लिहून आणि पुन्हा चौकशीचा सल्ला देऊन जबाबदारी झटकली जाणार असेल, तर यंत्रणेच्या अस्तित्वावरच प्रश्न उभा राहतो. लोकशाहीत विश्वास नसेल तर काय उरते? प्रशासन जर चुकीच्या नोंदी करणाऱ्यांना वाचवत असेल, गोपनीय माहिती लीक होत असेल आणि बनावट कागदांवर स्वाक्षऱ्या केल्या जात असतील – तर या सगळ्याच्या मुळाशी असलेला जनतेचा प्रशासनावर असलेला विश्वासच उडतो होतो. ही बाब केवळ सावेडीपुरती मर्यादित नाही; ही एक सिस्टम फेल्युअर ची लक्षणं आहेत. चेंडू जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात… आता या अहवालावर जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात, हे महत्त्वाचं ठरणार आहे. त्यांनी या प्रकरणाकडे अधिक गांभीर्याने पाहून संबंधित दोषींवर फौजदारी स्वरूपाची कारवाई केली नाही, तर सावेडी हे प्रकरण इतर शहरातील जिल्हातील आणि इतर जिल्हातील भूमिगत भ्रष्ट व्यवस्थांना नवा आत्मविश्वास देईल. शेवटी एकच प्रश्न उरतो – फेरफाराचा अहवाल आला, पण न्याय कुठे आहे?

सत्य लपवण्याचा ‘फेरफार’? Read More »

rahul gandhi

Rahul Gandhi on PM Modi : इंदिरा गांधी सारखी हिम्मत असेल तर पंतप्रधानांनी ट्रम्प खोटे बोलत आहेत सांगावे; राहुल गांधींचे आव्हान

Rahul Gandhi on PM Modi: लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी आज लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर होत असलेल्या चर्चेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी संसदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प खोटे बोलत आहेत असे सांगावे असे आव्हान केले आहे. या चर्चेत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, चूक सैन्याची नाही तर सरकारची होती. ट्रम्प यांनी 29 वेळा म्हटले आहे की आम्ही युद्ध थांबवले आहे. जर हिंमत असेल तर पंतप्रधानांनी सभागृहात सांगावे की ट्रम्प खोटे बोलत आहेत. जर त्यांच्यात इंदिरा गांधींच्या 50 टक्केही हिंमत असेल तर ते येथे सांगतील. असं राहुल गांधी म्हणाले. तसेच सरकारने सांगितले की ही कारवाई पहाटे 1.27 वाजेपर्यंत सुरू होती. पाकिस्तानला 1.35 वाजता फोनवरून माहिती देण्यात आली. ही माहिती थेट पाकिस्तानला का देण्यात आली? तुम्ही पाकिस्तानला सांगितले की तुम्हाला लढायचे नाही. सरकारने पाकिस्तानसमोर शरणागती पत्करली. आम्ही 30 मिनिटांत शरणागती पत्करली. सरकारकडे लढण्याची इच्छाशक्ती नव्हती. अशी टीका देखील राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर केल. तर भारतीय सैनिक वाघ आहेत. वाघांना स्वातंत्र्य दिले पाहिजे. सैन्याच्या वापरासाठी इच्छाशक्ती आवश्यक आहे. जर सैनिकांना देशासाठी काम करायचे असेल तर त्यांना स्वातंत्र्य द्यावे लागेल. मी राजनाथ सिंह यांचे भाषण ऐकले. त्यांनी ऑपरेशन सिंदूरची तुलना 1971 शी केली. राहुल म्हणाले की, 1971 मध्ये सरकारकडे इच्छाशक्ती होती. 1971 मध्ये आम्ही अमेरिकेचे ऐकले नाही. असा टोला देखील राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना लावला. मी पाकिस्तान आणि चीनला वेगळे ठेवण्याचे म्हटले होते. सरकारचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरले. खरी लढाई चीनशी होती. पहलगाम हल्ल्यामागे मुनीरचा हात होता. पाकिस्तान आणि चीनने हातमिळवणी केली. सरकारला वाटले की आपण पाकिस्तानशी लढत आहोत. प्रत्यक्षात आपण पाकिस्तान आणि चीन दोघांशीही लढत आहोत. असं देखील यावेळी राहुल गांधी म्हणाले.

Rahul Gandhi on PM Modi : इंदिरा गांधी सारखी हिम्मत असेल तर पंतप्रधानांनी ट्रम्प खोटे बोलत आहेत सांगावे; राहुल गांधींचे आव्हान Read More »

img 20250729 wa0004

अजित पवारांची मोठी खेळी, प्रहार,वंचित अन् उबाठाच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Ajit Pawar: अकोला जिल्ह्यातील प्रहार जनशक्ती आणि वंचित आघाडीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी व हिंगोलीतील माजी नगराध्यक्ष व नगरसेवकांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेश कार्यालयात जाहीर प्रवेश केला. आमदार अमोल मिटकरी यांच्या नेतृत्वाखाली वंचित आणि प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी तर वसमतचे आमदार राजू नवघरे यांच्या नेतृत्वाखाली वसमत नगरपंचायतीचे नगराध्यक्ष व नगरसेवकांनी आज प्रवेश केला. यामध्ये प्रहारचे अकोला उपजिल्हाप्रमुख अरविंद पाटील, पातुर तालुकाप्रमुख सतिश नेहवाल, बाळापूर युवक तालुकाध्यक्ष भूषण पारसकर आदींसह असंख्य पदाधिकाऱ्यांनी तर वसमत नगर परिषदेमधील नगराध्यक्ष वैजनाथ गुंडाळे, उबाठा गटाचे गटनेता दिलीप हाळवे पाटील, नगरसेवक धनंजय गोरे, वसंत चेपुरवार आदींसह असंख्य पदाधिकाऱ्यांनी पक्षात प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार अमोल मिटकरी, आमदार राजू नवघरे, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी आदी उपस्थित होते.

अजित पवारांची मोठी खेळी, प्रहार,वंचित अन् उबाठाच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश Read More »

Devendra Fadnavis: राज्य सरकारचा मोठा निर्णय, ‘या’ जिल्ह्यांमध्ये स्थापन होणार विशेष न्यायालय

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्ष खाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज काही मोठे निर्णय घेण्यात आले आहे. या निर्णयानुसार राज्यात ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राबवण्यात येणार आहे. अभियानात अत्युत्कृष्ट काम केलेल्या ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याचा निर्णय देखील मंत्रिमंडळाने घेतला आहे. या निर्णयानुसार एकूण १ हजार ९०२ पुरस्कार दिले जाणार आहे. तसेच ‘उमेद’- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत १० जिल्ह्यात ‘उमेद मॉल’ (जिल्हा विक्री केंद्र) ची उभारणी करण्यात येणार आहे. राज्यातील ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ आता उपलब्ध होणार असल्याची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. याच बरोबर राज्यात ‘ई-नाम’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय नामांकित बाजारस्थळ स्थापन होणार. त्यासाठी कृषि उत्पन्न बाजार समित्यांचे सनियंत्रण करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मध्ये सुधारणा करण्यास मान्यता मंत्रिमंडळाने दिली आहे. तर दुसरीकडे महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे निकाली काढण्यासाठी गोंदिया, रत्नागिरी आणि वाशिम येथे विशेष न्यायालय स्थापन करण्यात येणार आहे. तसेच पिंपरी-चिंचवड (जि. पुणे) येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय व दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर अशा दोन न्यायालयांची स्थापना होणार आहे.

Devendra Fadnavis: राज्य सरकारचा मोठा निर्णय, ‘या’ जिल्ह्यांमध्ये स्थापन होणार विशेष न्यायालय Read More »

operation sindoor 'they were not from the country,

ऑपरेशन सिंदूर’द्वारे दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर; ‘ते देशातले नव्हते,

Review Process ची शिफारस – दोषींना वाचवण्याचा प्रयत्न? ऑपरेशन महादेव -“या हल्ल्यातील दहशतवादी घरगुती नव्हते, ते पाकिस्तानातूनच आले होते. आणि त्याचे स्पष्ट पुरावे – दोन दहशतवाद्यांची भारतीय मतदार ओळखपत्रे, तसेच हत्यारांचे फॉरेन्सिक अहवाल – संसदेत अमित शाहांचा पाकिस्तानवर हल्लाबोल नवी दिल्ली | प्रतिनिधी – ऑपरेशन महादेव पाहलगाममध्ये घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमध्ये घडवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या लष्करी कारवाईबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज लोकसभेत विस्तृत माहिती दिली. “ही केवळ बदला घेण्याची कारवाई नव्हती, तर भारताची नवी सुरक्षा भूमिका आणि पाकिस्तानला दिलेला स्पष्ट इशारा होता,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. २२ एप्रिल रोजी पाहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ७ मे रोजी भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या १०० किमी आत घुसून जैश-ए-मोहम्मद व लष्कर-ए-तैबाच्या नऊ अड्ड्यांवर लक्षवेधी हल्ले केले. ऑपरेशन सिंदूर – ठळक बाबी: * १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा* पाकिस्तानातील १५ हवाई तळं, कंट्रोल युनिट्स पूर्णतः नष्ट* फक्त २३ मिनिटांत कारवाई यशस्वी* ब्रह्मोस, स्कल्प मिसाईल्स, AASM Hammer बॉम्ब्स यांसारख्या अत्याधुनिक शस्त्रांचा वापर गृहमंत्री शाह म्हणाले, “या हल्ल्यातील दहशतवादी घरगुती नव्हते, ते पाकिस्तानातूनच आले होते. आणि त्याचे स्पष्ट पुरावे – दोन दहशतवाद्यांची भारतीय मतदार ओळखपत्रे, तसेच हत्यारांचे फॉरेन्सिक अहवाल – आमच्याकडे आहेत.” विरोधकांवर निशाणा: विरोधकांकडून यावर प्रश्न उपस्थित करण्यात आले. काही जणांनी परदेशी माध्यमांच्या अहवालांवर अवलंबून भारत सरकारच्या भूमिकेवर टीका केली. यावर अमित शाह यांनी *परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे विधान उद्धृत करत विचारले, “तुम्ही आपल्या मंत्र्यांपेक्षा परदेशी पत्रकारांवर जास्त विश्वास ठेवता का?” ऑपरेशन महादेव – थेट हल्लेखोरांचा खात्मा: २८ जुलै रोजी ऑपरेशन महादेव अंतर्गत पाहलगाम हल्ल्यात थेट सहभागी असलेल्या सुलेमान, अफगन व जिब्रान या तीन दहशतवाद्यांचा खातमा करण्यात आला. “त्यांचे मृतदेह, शस्त्रे आणि घटनास्थळी सापडलेल्या गोळ्यांची फॉरेन्सिक तपासणी केली असता, सर्व दुवे जोडले गेले,” अशी माहिती शाह यांनी दिली. “ऑपरेशन सिंदूरने हल्लेखोरांना पाठवणाऱ्यांना, तर ऑपरेशन महादेवने *ते अंमलात आणणाऱ्यांना संपवलं,” असं स्पष्ट करत अमित शाह यांनी सरकारच्या निर्णायक भूमिकेवर शिक्कामोर्तब केलं. निष्कर्ष: * ऑपरेशन सिंदूर आणि महादेव हे भारताच्या सामरिक निर्णयक्षमतेचं प्रतीक* पाकिस्तानमधील दहशतवादी तळं उद्ध्वस्त करत ठोस कारवाईचं उदाहरण* संसदेत सादर केलेले पुरावे पाकिस्तानच्या भूमिकेचा पर्दाफाश करणारे* विरोधकांनी राजकारण न करता राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य द्यावं, असा स्पष्ट इशारा

ऑपरेशन सिंदूर’द्वारे दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर; ‘ते देशातले नव्हते, Read More »

img 20250728 wa0006

सावेडी जमीन घोटाळा : अखेर मुहूर्त सापडला, अहवालाच्या उशिरावरून निर्माण झाला संशयाचा धूर

Sawedi Land Scam: सावेडी येथील सर्वे नं. २४५/ब२ मधील वादग्रस्त हाडाचा कारखाना आणि फेरफार क्रमांक ७३१०७ (मंजूर दिनांक १७ मे २०२५) प्रकरणी अखेर आज संबंधित अहवाल अप्पर तहसीलदारांना सादर करण्यात आला. महसूल विभागाच्या विलंबित कारवाईवरून अनेक प्रश्न उपस्थित होत असतानाच, प्रांत कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सकाळीच अहवाल स्वीकारला असून त्यात फेर पुनरावलोकनाची शिफारस करण्यात आली आहे. हा अहवाल वरिष्ठ स्तरावर पाठवला जाणार असला तरी त्यातील गोपनीय माहिती काही व्यक्तींना आधीच मिळाल्याची चर्चा आहे. त्यामुळेच शहा गटाशी संबंधित काही व्यक्तींनी तत्काळ प्रांत कार्यालयात धाव घेतल्याची माहिती मिळत आहे. ही माहिती आधीच बाहेर कशी पोहोचली, यावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. या वादात फेरफार मंजुरीसाठी आधारभूत दस्तावेज – खरेदी दस्त क्रमांक ४३०/१९९१, दिनांक १५ ऑक्टोबर १९९१ – संदिग्ध असून, त्यात कुळकायद्याचे स्पष्ट उल्लंघन केल्याचा आरोप तक्रारकर्त्यांनी केला आहे. अर्जदार अजीज डायाभाई आणि साजीद डायाभाई यांच्या वतीने मुखत्यार रमाकांत सोनवणे यांनी २३ जून २०२५ रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे फेरफार रद्द करण्याची मागणी केली होती. प्रांत कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सकाळीच अहवाल स्वीकारत त्यामध्ये फेर पुनरावलोकनाची स्पष्ट शिफारस नोंदवली आहे. मात्र, या पुनरावलोकन प्रक्रियेत वारंवार त्रुटी करणारे कर्मचारी आणि त्यामागील हेतू काय, हा प्रश्न कायमच उपस्थित राहणार आहे. चुकीच्या नोंदी, बनावट दस्तऐवज आणि संदिग्ध मंजुरी प्रक्रिया यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर संशय निर्माण झाला आहे. त्यामुळे केवळ फेरपरीक्षण न करता, संबंधित दोषी कर्मचाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाची कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. सावेडी प्रकरणात “चूक दुरुस्ती लेख” दाखल करण्यात आला असून, त्यामध्ये मूळ खरेदीखतातील सर्वे नंबर आणि क्षेत्रफळ कायम ठेवत नव्याने वेगळा सर्वे नंबर देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, त्या नवीन सर्वे नंबरमध्ये क्षेत्रफळात वाढ दर्शवण्यात आली आहे. हा दस्त तयार करताना देखील अनेक त्रुटी आढळून येत असून, त्या चुका इतक्या गंभीर स्वरूपाच्या आहेत की, सध्या त्यावर अधिक बोलणं टाळलं जात आहे – कारण अशा परिस्थितीत आणखी एक चूक दुरुस्ती लेख तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या दस्तामध्ये कासम अब्दुल अजित यांचे नाव ‘संमती देणारे’ म्हणून नमूद करण्यात आले असून, दस्तावर त्यांच्या नावाची सही आहे. मात्र, ती सही आपली नसल्याचा स्पष्ट दावा कासम यांनी केला आहे, त्यामुळे या दस्ताच्या वैधतेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, १९९० ते १९९३ या काळात झालेल्या व्यवहारांमध्ये अनेक खरेदी-विक्री प्रक्रिया बेकायदेशीर पद्धतीने झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्या काळात सादर करण्यात आलेल्या दस्तांमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्याचे निदर्शनास येत असून, त्याअनुषंगाने महसूल विभाग आणि दुय्यम निबंधक कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. दस्तऐवजांच्या बनावट स्वरूपामुळे आणि त्यातील विसंगतींमुळे संबंधित कर्मचाऱ्यांनी जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याचीही शंका उपस्थित होत आहे. प्रश्न असा की, इतक्या गंभीर आरोपांनंतरही अहवाल पाठवण्यास इतका उशीर का झाला? आणि आता जो अहवाल वरिष्ठांकडे जाणार आहे, त्यावर काय कार्यवाही होते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. महसूल खात्यातील हा प्रकरण पुढील काळात प्रशासनासाठी मोठं आव्हान ठरू शकतो.

सावेडी जमीन घोटाळा : अखेर मुहूर्त सापडला, अहवालाच्या उशिरावरून निर्माण झाला संशयाचा धूर Read More »